Year: 2017

  • त्रिपुरान्तकाय नमः

    त्रिपुरान्तकाय नमः

    प्राचीन संहिता, पुराणकथा आणि त्यामध्ये गुंफलेल्या काही संकल्पना या मूर्त रुपाला जन्म देत असतात. रुद्र या संकल्पनाचा विस्तार रुद्राय नमः या मागच्या लेखामध्ये आपण बघितला आहे. हाच रुद्र हातामध्ये धनुष्य धारण करून रथात आरूढ होणारा त्रिपुरान्तक शिव या संहारक रूपातून व्यक्त होताना दिसतो. तैत्तिरीय संहिता आणि शतपथ ब्राह्मणासारखे काही प्राचीन ग्रंथ आणि महाभारत, लिंगपुराण आणि शिवपुराणांतून आलेल्या रोचक कथा शिल्पकारांना ही तितीक्याच आव्हानात्मक ठरलेल्या दिसतात. या पुराणांमध्ये त्रिपुरान्तक आख्यानाचे अतिशय सुंदर आणि मनोरंजक वर्णन प्रस्तुत केलेले आहे.

    शिवपुत्र कार्त्तिकेय, दैत्यासुर तारकाचा वध करतो आणि सुरु होते कथा त्रिपुर निर्माणाची. तारकासुराचे तीन पुत्र विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष हे तीन अनोख्या पुरांचा निर्माण करतात. मय असुराच्या मदतीने सुवर्णाचे पूर स्वर्गात बनवून तारकाक्ष त्या दुर्गाचा स्वामी होतो. कमलाक्षचे चांदीचे पूर अंतरिक्षात प्रस्थापित होते. विद्युन्मालीचे पूर भूमीवर निर्माण होते जे लोहाचे असते. या तीनही पुरांवर अधिपत्य करणारे हे दैत्य, देव आणि ऋषीच्या त्रासाचे कारण बनतात. तेव्हा ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून सर्व देवता महादेवाला शरण जातात. शिव सर्व देवतांच्या शक्तीच्या मदतीने त्या तीनही पुरांना भस्मिसात करण्यास सज्ज होतो.

    विश्वकर्मा या कार्यात शिवासाठी महादिव्य सुवर्णाच्या रथाचा निर्माण करतात. या रथाचे उजवे चाक हे सूर्य बनतो. ज्याचे बारा आरे म्हणजे बारा आदित्य असतात. डावे चाक चंद्रमा बनतो. ज्याला सोळा आरे म्हणजे चंद्राच्या सोळा कला असतात. सत्तावीस नक्षत्र या दोनही चाकांची शोभा वाढवत असतात. संवत्सर रथाचा वेग बनतो. कला त्या रथाचे खिळे बनतात. द्युलोक त्या रथाचे छत बनते. स्वर्ग आणि मोक्ष त्याचा ध्वज बनतो. वेदांग, पुराण, न्याय, मीमांसा आणि धर्मशास्त्र त्या रथाचे अलंकार होतात. पुष्कर सारखी तीर्थे रत्नजडित सुवर्णमयी पताका बनतात. चार समुद्र रथाचे आच्छादन वस्त्र बनते. सप्तवायू सुवर्णमयी उत्तम सोपान बनतात.

    साक्षात सृष्टीकरता ब्रह्मदेव या रथाचे सारथी होतात आणि प्रणवाकार ओम चाबूक बनतो. चार वेद रथाचे चार घोडे होतात. शैलराज हिमालय धनुष्य बनून रुद्राच्या हातामध्ये स्थिरावते. शेषनाग त्या धनुष्याची प्रत्येंचा बनतात. श्रुतीरूपिणी सरस्वती देवी त्या धनुष्याची घंटा बनते. जगत्पालक विष्णू त्या दिव्य शक्तिशाली धनुष्याचा महातेजस्वी बाण बनतात. त्या बाणाचे अग्र अग्नी आणि यम त्याची पिसे बनतो. हा सज्ज झालेला दिव्य रथ साक्षात रुद्राच्या स्पर्शाने डगमगतो तेव्हा नंदी त्याच्या बळाचे सहाय्य त्या रथाला देतो. ब्रह्मदेव रथाचा लगाम सावरून रथ त्रिपुरांवर चाल करण्यास सज्ज करतात. ही तीन दिव्य पुरे अनेक वर्षांनी जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा रुद्र त्याच्या दिव्य तेजस्वी बाणाने त्यांच्या भेद घेतो. त्या पुरांचा त्या तीनही दैत्यांसकट सर्वनाश होतो.

    या कथेतील बारकावे शिल्पांत उतरवताना त्या प्रतिमेमागच्या आव्हानांची कल्पना आपल्याला येते. एखादे कथानक शिल्पबद्ध करताना अतिशय मर्यादित जागेत शिल्पांतील बारकावे दाखवावे लागतात. त्यामुळे अश्या मूर्तीमध्ये शिल्पकार त्याचे विशेष कौशल्य, त्याच्या कल्पकतेने मांडत असतो. अनेक शिल्पग्रंथांमध्ये अश्या मूर्तींच्या निर्माण विधीचाही उल्लेख येतो. वेरूळ येथील दशावतार लेणीतील त्रिपुरान्तक मूर्तीत सारथी साक्षात ब्रह्मदेव आणि घोडे रथ ओढताना शिल्पांकित केले आहेत. कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिरात शिव गुडघ्यावर बसून वरच्या दिशेने त्याच्या धनुष्याची प्रत्येंचा ताणलेला शिल्पित केला आहे. याशिवाय मध्य भारतामधील एका शिल्पांत शिवाचा पाय एका वाकलेल्या पुरुषावर स्थित आहे. म्हैसूर येथील त्रिपुरान्तक शिव पंचमुखी, गंगा डोक्यावर धारण केलेला दाखवलेला आहे. तीन दुर्ग आणि त्यातले दैत्य स्पष्ट दिसतायेत. बाणावर विष्णूचे अंकन आहे. चंद्र-सूर्य चाके असलेल्या रथाला चार घोडे आहेत ज्यांचा लगाम ब्रह्मदेवाच्या हातात आहे. शिवाय विनायक म्हणून गणेशही आहे असे दिसते. नंदी रथाला आधार देतो आहे. शेषनागरूपी प्रत्येंचा ताणून धरली आहे. एकूणच संपूर्ण सृष्टी आणि सर्व देवता या त्रिपुरांचा विनाश करण्याच्या कार्यात रुद्र शिवाला सहाय्य करताना अंकित केले आहेत. 

    रुद्र आणि दैत्य यांच्यातील युद्धाचा साक्षात्कार या शिल्पातून अनुभवता येतो. दुर्गांचा विनाश करण्यासाठी बाण सोडण्यपूर्वीचा तो एक क्षण त्या शिल्पांमध्ये गोठवला आहे. शिवाचे रुद्र रूप, त्याची पुरांवर स्थिरावलेली एकाग्र नजर आणि त्यातून त्या शिल्पांत निर्माण झालेल्या एका प्रचंड नाट्याची कल्पना आपल्याला येते. एकूणच त्या त्रिपुरारीच्या अद्भुत शक्तीची अनुभूती या शिल्पातून साकार होते आणि स्वाभाविक भक्ताच्या मनात त्रिपुरान्तकाय नमः च्या लहरी उत्पन्न होतात.

  • रुद्राय नमः

    रुद्राय नमः

    आज सोमवार, श्रावणमास आरंभ होतोय. बोधसूत्र वाचकांसाठी श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवाय नमः या लेख मालिकेतील हा पहिला लेख घेऊन आले आहे.

    देवांचा देव महादेव म्हणून शिव आपल्याला सर्वज्ञात आहे. या महादेवाच्या प्रारंभिक अवस्थेचे मूळ आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडते. पिनाकपाणी रुद्र या देवतेसाठी ऋग्वेदामध्ये तीन ऋचा संकलित केल्या आहेत. हा रुद्र भयानक, उग्र आणि विनाशकारी आहे. पण सोबतच तो मांगल्याचेही प्रतिनिधित्व करणारा म्हणून ओळखला गेला आहे. अनेक वेगवेगळ्या उल्लेखातून रुद्राच्या व्यक्तित्वाची संकल्पना स्पष्ट होताना दिसते. हा गौरवर्णाचा तेजस्वी युवक आहे ज्याची कांती सुवर्णालंकारांनी तेजोमयी झाली आहे. ज्याच्या हातामध्ये पिनाक नावाचे धनुष्य आहे आणि सोबत तीक्ष्ण आणि तीव्र वेगाचा असा बाण आहे. या रुद्राचा देह पुष्ठ आहे आणि त्याचे हात शीतलता देणारे, जीवनदायी आहेत असा उल्लेख येतो. कारण रुद्र वैद्य असून तो जलाष नावाच्या दिव्य औषधीने उपचारही करतो. मूजवान पर्वतामध्ये याचे निवासस्थान आहे. मरुत गणांचे पितृत्व हे रुद्राकडे आहे पण पुढे अथर्ववेदात हे मरुत रुद्राचे सहचारी म्हणून येतात.  

    यजुर्वेदातील शतरुद्रीय, रुद्राच्या शभंर विविध रूपाची ग्वाही देतो. तैत्तिरीय संहितेमध्ये रुद्राच्या नावाचा संबंधित अतिशय रोचक असा कथाभाग आहे. देव-दानव ह्यांच्या युद्धामध्ये देव त्यांची संपत्ती अग्नीकडे ठेवतात. युद्धानंतर ती संपत्ती परत घेण्यासाठी देव येतात तेव्हा अग्नी रडतो. अग्नी रडला म्हणून त्याला रुद्र म्हटले आहे. इथे अग्नी आणि रुद्र यांचा संबंध आपल्याला दिसतो. शतपथ ब्राह्मणामध्ये मात्र रुद्रचा अर्थ होतो रडवणारा. उपनिषदांमध्ये रुद्राचे महेश्वर असे वर्णन येते. महाभारतातील अनुशासन पर्वात रुद्र हे शिवाचे रौद्र तर शिव हे शांत स्वरूप म्हणून सांगितले आहे. याच महाभारतामधील शांती पर्वामध्ये दक्ष, शिवाची स्तुती करतानाचा उल्लेख रुद्राच्या दृष्टीने महत्वाचा आहे. रु म्हणजे संकट आणि द्र म्हणजे द्रावण करणारा म्हणजेच तो संकटे दूर करणारा रुद्र असा उल्लेख दक्ष करतो. अठरा महापुराणांपैकी मत्स्य, वायू, लिंग, शिव पुराणातही या रुद्राचे उल्लेख सापडतात. पुराणांमध्ये शिव कल्याणमय आणि भक्तवत्सल रूपात साकार होतो. इथे मात्र हा भीषण रुद्र त्याचे आधिपत्य ईशान हे मंगलमयी रूप दर्शवतो.

    रुद्र देवतेचे स्वरूप बहुतांशी शिव स्वरूपाच्या जवळ जाणारे आहे. रुद्र हाच त्र्यंबक आहे. त्रि + अंबक म्हणजे तीन नेत्र धारण करणारा असा अर्थ होतो. अग्नीशी संबधित असल्याने या रुद्राचा तिसरा नेत्र म्हणजे अग्नी आहे. रुद्र हा जटाधारी आहे. अनेक ठिकाणी रुद्राचा उल्लेख कपर्दिन असा येतो. कपर्द म्हणजे जटा. रुदाला नवनिर्मितीचा कारक मानला आहे. त्याला वृषभ हे विशेषण येते. त्यामागेही हेच कारण आहे कि रुद्राकडे अपरिमित शक्तीचा संचार आहे. तो पुनरोत्पत्तीचा देव मानला गेला आहे.

    भव आणि शर्व अश्या दोन नावांचा उल्लेख या रुद्राच्या संदर्भात येतो. अथर्ववेदाच्या सुरुवातीला भव आणि शर्व या दोनही देवतांचे एकत्रित स्तवन केले आहे. येथे त्यांना श्रेष्ठ धनुर्धर या उपाधीने गौरविण्यात आले आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये अग्नीच्या अशांत रूपाला भारताच्या पूर्वेकडे म्हणजे बिहार भागात शर्व म्हणत तर पश्चिमेला भागात भव या नावाने पूजले जात, असा उल्लेख येतो. या दोघांना भूपती आणि पशुपती असे संबोधनही आलेले दिसते. भव आणि शर्व ह्या दोन स्वतंत्र देवता असल्या तरी त्यांचा अग्नीशी असलेला संबंध रुद्र स्वरूपाच्या जवळ जाणारा आहे. श्वेताश्वर उपनिषधात रुद्राचा उत्कर्ष साकार होतो आणि तो योगेश्वरत्व प्राप्त करतो.

    प्राचीन ग्रंथातून उमटणाऱ्या भयानक रुद्राच्या संकल्पना पुराणकाळापर्येंत येताना शिव या सौम्य स्वरूपात विलीन होतात दिसतात. पुराणांनी शिवाचे मांगल्य उचलून धरले आणि आपल्यासमोर उभा राहिला तो सर्वमंगलकारी शिव. रुद्र रूपाने झंझावातासारखा येणारा हा महोदेव उन्नत होऊन चराचरात संचार करणारा महादेव होतो. हा पिनाकपाणी रुद्र म्हणजे शिवाचे अलौकिक रूप आहे जो विनाश आणि सृजन ह्याचे एकत्व दाखवतो.

    या रुद्र रूपात अनेक भाव, रंग आणि तत्त्वज्ञान लपलेले आहे. त्यांचे एक एक पदर उलगडणे आवश्यक आहे. शिवाय नमः या लेख मालिकेच्या रूपात त्याची सुरुवात मी केली आहे. शिवाच्या ह्या रुद्र रूपाला रुद्राय नमः म्हणून  अत्तासाठी इथेच पूर्णविराम देते. पुढच्या सोमवारी शिवाय नमः या लेख मालिकेतून रुद्र शिवाच्या दुसऱ्या स्वरूपाची भेट घेऊ.  

  • कथा बुद्धजन्माची, एका कथनशिल्पाची

    कथा बुद्धजन्माची, एका कथनशिल्पाची

    भारताच्या वायव्येकडे स्थित, एक प्रांत म्हणजे गांधार. या प्रांतात बहरलेली कला गांधार कला  या नावाने ओळखली जाते. ही कला, म्हणजे पूर्वेकडील भारत आणि पश्चिमेकडील ग्रीक, रोम, इराण आणि शक कलांची सांस्कृतिक समन्वितता आहे. भारताच्यादृष्टीने गांधार या प्रांताचे एक विशीष्ट स्थान आहे. प्राचीन काळात डोकावताना गांधार क्षेत्र राजकीय, धार्मिक आणि कलात्मक स्थित्यांतरचे ते एक प्रमुख केंद्र होते हे समजते. या प्रांताच्या प्राचीन भौगोलिक सीमारेषा बघता गांधारच्या वायव्येला पाकिस्तान आणि पश्चिमेला हिंदूकुश होता. त्यामुळे भारतातील सांस्कृतिक प्रवाह गांधारच्या कलेवर उमटलेले स्पष्ट दिसतात. कुषाण काळात या कलेला अधिक बहर आलेला दिसतो. विशेषतः कुषाण राजा कनिष्क  याच्या काळात म्हणजे इ.स.2-3 शतक हे गांधार कलेचा सर्वोच्चबिंदू ठरले.कनिष्काच्या काळापर्येंत बौद्धधर्मात नवीन विचारप्रवाह वाहायला सुरुवात झाली होती आणि खरतर बौद्ध महायान पंथाचा प्रभाव वाढत होता. बौद्ध कलेच्या प्राथमिक टप्प्यामध्ये बुद्धाचे अंकन हे मनुष्य रूपात न करता ते चिन्ह (anionic) रूपात होत होते. मात्र महायान पंथाच्या वाटचालीमुळे बुद्ध मूर्ती विकसित होऊ लागल्या होत्या. याच काळात बहरलेली गांधार शैली आणि त्यात निर्माण झालेले एक अप्रतिम कथन शिल्प जे बुद्धजन्म यथादृश्य आपल्या समोर साकारते. तेच  कथनशिल्पं आज आपण बघणार आहोत.

    एक वेगळीच शैली, तिचे वेगळेच अस्तित्व आणि त्या कलेने काही वर्ष सर्वांवर घातलेली सात्विक मोहिनी या सर्वांचे शिल्पाच्या माध्यमातून विवेचन साधण्याचा हा एक प्रयत्न बुद्धजन्माच्या निमित्ताने आज मी करत आहे.

    भारतीय परंपरेतील एक अतिशय महत्त्वाचे आणि प्राचीन माध्यम म्हणजे इथली कथनशिल्पं. कथनशिल्पं यांची वैशिष्टे आहेत. ही मुख्यतः एका कथानकावर आधारित असतात, जी लोकांना ज्ञात आहेत हेच अभिप्रेत असते. त्यामुळे ते संपूर्ण कथानक शिल्पाद्वारा मांडण्यापेक्षा कथानकातील एखादा महत्त्वाचा प्रसंग शिल्पांकित केला जातो. कथन शिल्पांमधेही वैविध्य आहे. ते मांडण्याच्या पद्धत्ती या शैलीनुसार बदलल्या जातात. भारतीय संस्कृतीमध्ये कथन शिल्पांची परंपरा सुरु होते ती शुंग काळामध्ये. भारहूत येथे आपल्याला अनेक कथनशिल्पं बघायला मिळतात ज्यांचा विषय बुद्ध आणि बौद्ध धर्मावर आधारलेला आहे. तशीच कथनशिल्पं कुषाण काळात गांधार शैलीत निर्माण झाली. गांधार शैलीत निर्माण झालेल्या कलाकृतींनी बौद्ध धर्मावर आधारित अनेक भारतीय विषय हाताळले. बुद्धाशी निगडीत जातक कथा, मायादेवीचे स्वप्न, बुद्ध जन्म, सर्वसंगपरित्याग, बोधीप्राप्ती, बुद्धाचे पहिले प्रवचन, महापरीनिर्वाण अश्या बुद्धाच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचे शिल्पांकन गांधार शैलीत बघायला मिळते.

    आज जे कथनशिल्पं आपण बघणार आहोत ते दैवी बुद्धजन्म दर्शवणारे आहे. कुषाण काळातील म्हणजे इ.स. 2 शतकाचा शेवट आणि इ.स. 3 शतकाची सुरुवात हा या शिल्पाचा साधारण काळ म्हणता येईल. गांधार शैलीचे अनेक टप्पे आहेत, त्यापैकी हे शिल्प गांधार कलेच्या अंतिम  टप्प्यातील आणि कौशल्यपूर्ण कलाकृतीची साक्ष देते. गांधार शैलीची स्वतःची काही वैशिष्ट आहेत जी या शिल्पाकृतींमध्येही बघायला मिळतात. गांधार कला हा एक सविस्तर आणि स्वतंत्र अभ्यासाचा विषय असल्याने केवळ आजच्या कथनशिल्पाच्या दृष्टीने गांधार शैलीची वैशिष्ट्य जाणून घेऊया, पण तत्पूर्वी या कथन शिल्पाचा कथाभाग बघू.

    बुद्ध जन्माची कथा

    भारतातील जनपदांपैकी एक जनपद म्हणजे शाक्य. या शाक्य कुळाचा राजा शुध्दोधन आणि त्याची पत्नी देवी महामाया  यांचा पुत्र म्हणून बुद्धाचा जन्म निहित होता. बुद्धजन्माची कथा ललितविस्तर  या पाली साहित्यातून येते. त्यानुसार बुद्ध जन्म होण्यापूर्वी तुषित स्वर्गाचे अधिपतीत्व भविष्यातील बोधिसत्व विश्वपाणी याला देण्यात आले. जो पुढे जाऊन मैत्रेय बुद्ध म्हणून जन्म घेणार आहे. बुद्धजन्माची सर्व सूत्रे विधिलिखित घडत होती. त्याप्रमाणे देवी महामाया हीच्या स्वप्नात एक श्वेत हत्ती ज्याच्या सोंडेमध्ये त्याने कमळ धरले आहे, तो प्रकट झाला आणि त्याने तिच्या उजव्या कुशीतून तिच्या गर्भात प्रवेश केला. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला देवी महामाया तिच्या वडिलांच्या घरी जात असताना लुंबिनी इथल्या वृंदावनात काही क्षण सगळे थांबले. देवी महामायाला प्रसूतीवेदना सुरु झाल्या. देवीने शालवृक्षाच्या एक फांदीचा आधार घेतला आणि तिच्या उजव्या कुशीतून दिव्य अश्या बालकाचा जन्म झाला. त्या बालकाला घेण्यासाठी शक्र म्हणजे इंद्र स्वतः, ब्रह्मा तिथे उपस्थित होते. जन्मल्या जन्मल्या तो बालक सात पावले चालला. त्या दिव्य बालकाच्या पदस्पर्शाने जमिनीवर त्या सात ठिकाणी सात कमळे उमलली.

    कथनशिल्प

    या शिल्पामध्ये केवळ बुद्धजन्म शिल्पांकित केला आहे. पुढे जाऊन तो सात पाऊले चालतो असे शिल्पांकित केलेले काही कथनशिल्पेही आहेत.

    • शिल्पपटामधील पात्रे  
      • देवी महामाया, महाप्रजापती, शक्र, ब्रह्मा, दोन स्त्रिया, इंद्र आणि ब्रह्मा सोबत एक व्यक्ती आणि दोन आकाशगामी पुरुष.
    • वृक्ष 
      • शालवृक्ष आणि अश्वथ (पिंपळ)
    • माध्यम
      • रंगाने हिरवट असलेला सिस्ट हा दगड.
    • कथनशिल्प
      • देवी महामाया हीने शालवृक्षाच्या फांदीचा आधार घेतला आहे. महामायाच्या मदतीला तिची बहिण महाप्रजापती शेजारी तिला आधार देऊन उभी आहे. शेजारी दोन स्त्रिया त्यापैकी एकीच्या हातामध्ये आरसा आहे आणि ती दुसऱ्या हाताने माया देविकडे निर्देश करीत आहे. दुसऱ्या स्त्रीच्या एका हातामध्ये चौकोनी डबा आहे (गांधार शैलीतील इतर काही शिल्पपटांमध्ये या स्त्रीच्या हातात चौकोनी डब्याच्या ऐवजी एक पाण्याचा तोटी असलेला छोटा घडा किंवा भांडे दिसते, साहजिकच ते प्रसुतीला आलेल्या देवी महामायाच्या सुश्रुतेसाठीचे साधन म्हणून किंवा पवित्र पाण्याचा घडा म्हणून येते) आणि दुसऱ्या हातामध्ये वारा घालण्यासाठी लागणारे मयूर पिसांचा पंखा घेतला आहे. देवी महामायाच्या उजव्या कुशीतून बुद्ध जन्माला आला आहे, ज्याच्या डोक्यामागे गोल प्रभावलय दिसते. उजवीकडे हातामध्ये रेशमी वस्त्र घेऊन इंद्र बुद्ध जन्मासाठी तिथे उपस्थित झाला आहे. सोबत मागे ब्रह्मा आणि त्याच्या मागे एक व्यक्ती बुद्धजन्माचा आनंदाने शिट्या वाजवत आहे आणि त्याने त्याचे उपरणे हवेत उडवले आहे. वरती आकाशगामी देवता बुद्धाच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत. काही हात जोडून उभे आहेत तर काहींनी पुष्पवर्षावासाठी हातामध्ये फुले घेतली आहेत.
    • कथनशिल्पातील गांधार शैलीची वैशिष्ट्ये
      • गांधार शैलीवर असलेला Greco- Buddhist कलेचा प्रभाव या कथनशिल्पात दिसतो. Greco- Buddhist कलाशैली म्हणजे ग्रीक तंत्राने घडवलेल्या मूर्ती पण त्यांचे आशय बौद्ध धार्मिक सरणीचे होते.
      • आदर्शवादी वास्तववाद जो आपल्याला Greco- Buddhist कलेत बघायला मिळतो तोच या कथन शिल्पाला उठाव देणारा महत्वाचा घटक ठरला आहे.
      • या कथन शिल्पातील बारकाव्यांकडे बघितले तर सर्व पात्रांची वेशभूषा ही भारतीय पद्धतीची आहे. स्त्रियांनी साडी, लांब कंचुकी आणि कमरेला पट्टा घातला आहे. शिवाय डोक्यावर उष्णीष किंवा गोल शिरोभूषण परिधान केले आहे.
      • पुरुषांच्या वस्त्रांमध्ये उत्तरीय आणि धोतर आणि डोक्यावर उष्णीष किंवा नक्षीदार टोपी आहे.
      • अलंकार तसे कमी असले तरी देवी महामाया आणि इंद्र यांना इतरांपेक्षा अधिक अलंकरण आहे. स्त्रियांच्या गळ्याभोवती एक आणि त्यापेक्षा एक मोठा अलंकार आहे. सर्व स्त्रियांच्या कानामध्ये एकाच प्रकारची कर्णभूषणे आहेत. हातामध्ये दोन बांगड्या आणि पायामध्ये दोन तोडे आहेत. दास्यांच्या पायांमध्ये मात्र एक-एक तोडा दिसतो. त्यांच्या अलंकरणावर कमी काम केले आहे. हे त्यांची कनिष्ठता दर्शवते.
      • पुरुषांनाही अलंकार दिले आहेत. त्यापैकी इंद्राचे अलंकार अधिक कोरीव आहेत.
      • इंद्राचे विशेषत्व दाखवण्यासाठी त्याला नक्षीयुक्त शिरोभूषण, अधिक अलंकरण आणि कपाळावर तिसरा डोळा दाखवला आहे. (इथे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे इथे इंद्राचा तिसरा डोळा उभा दखवल आहे आपण अजिंठा येथील गुंफा क्र. 2 मधील चित्रणात मात्र तो डोळा आडवा चित्रित केला आहे.)
      • या कथन शिल्पांत उष्णीष किंवा शिरोभूषणाचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात.
      • सर्वांच्या वस्त्रांना पडलेल्या चुण्या आणि त्यातून निर्माण होणारा वास्तवतेचा आभास हे गांधार शैलीचे आणखी वैशिष्ट या कथनशिल्पातही कायम आहे.  
      • वृक्षांची समर्पक मांडणी यात दिसते. शालवृक्ष हे या कथाशिल्पाचा गाभा असल्याने मध्यभागी आणि उजवीकडे दाखवले आहे. शिवाय डावीकडे अश्वथही सुरेख कोरलेला आहे, हे त्याच्या पानांच्या सुबकतेवरून समजते.
      • सर्व पात्रांची चेहेरेपट्टी ही भारतीय ठेवलेली दिसते. त्यांच्या चेहऱ्यावरील वेगवेगळे भाव कलाकाराने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
      • देवी महामाया, बुद्ध, इंद्र आणि आकाशगामी देवतांच्या चर्येवर सात्विक भाव प्रकट होतो. तर ब्रह्मा, महाप्रजापती, तिच्या बाजूची एक स्त्री आणि उजविकडील एक पुरुष जो अतिशय आनंदात आहे त्यांच्या चेहऱ्यावर हलके स्मित उठून दिसत आहे.   
      • गौतम बुद्धाचे मानवी अंकन आणि तेही अश्या दिव्यस्वरूपाचे आहे दर्शवण्यासाठी त्याच्या डोक्यामागे प्रभावलय दाखवले आहे. जे त्याचे दैवत्व दर्शवते.
    समारोप

    काही अभ्यासकांच्या मते गांधार शैली ही जरी भारताबाहेरील कलाशैली ते मानत असले, तरी गांधार या प्रांतात झालेल्या अनेक वर्षांच्या राजकीय आणि धार्मिक स्थित्यांतरच्या प्रभावात बहरलेली ही कला, आपल्या दृष्टीने महत्वाची म्हणावी लागेल. तिथले कलाकार कदाचित ग्रीक, रोमन, इराण प्रभावात तयार झाले असले तरी त्यांनी भारतीय विषयांना तितक्याच समर्पकपणे हताळलेले आहे. गांधार कलेचे भारतीय कलेतील योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे कलेच्यादृष्टीने इतर भारतीय कला शैलींप्रमाणेच गांधार शैली ही देखील तितकीच महत्त्वाची आहे.

    संदर्भ

    1. देगलूरकर, डॉ. गो.बं. प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती. अपरांत प्रकाशन; 2015.
    2. Singh Upinder. A History of Ancient and Early Medieval India. Pearson ; 2015.

  • लयनात दडलेला शिल्पातीत महाराष्ट्र

    लयनात दडलेला शिल्पातीत महाराष्ट्र

    मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्रदेशा |
    प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा ||
    राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा |
    प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा ||

    राकट, रांगडा असलेल्या, कणखर असलेल्या या महाराष्ट्र देशाची कल्पक आणि सौंदर्यदर्शक ओळख लपली आहे ती इथल्या लयन (लेणी) स्थापत्यामध्ये; आणि यातूनच साकार झालाय शिल्पातीत महाराष्ट्र. इथल्या ट्रॅप या काळ्या दगडातील शिल्पसंपदा महाराष्ट्राच्या कलात्मकतेची साक्ष पटवून देणारी आहे. इथली शिल्पं आणि त्यातून साकार होणारे विश्व यांची विलोभनीयता अतुलनीय आहे. तरी या शिल्पांतून निर्माण होणारे सौंदर्याचे चिकित्सक परीक्षण करणे आवश्यक आहे. कारण या अभ्यासात्मक दृष्टीकोनातूनच आपल्याला अनेक वेगवेगळ्या घटनांशी, तत्कालीन सामाजिक परिस्थितीशी, आणि समाजातील कलेच्या झालेल्या वाटचालीशी एकरूप होणे शक्य आहे. या कलाप्रवाहात होत गेलेले बदल, त्यातून घडलेल्या विविध शैली, नजरा खिळवून ठेवणारी कथनात्मक शिल्पे, त्यांची वैशिष्ट्ये, विविधता आणि त्यातून निर्माण झालेली रसोत्पत्ती या सर्व गोष्टी, एक कला अभ्यासक म्हणून मला महत्त्वाच्या वाटतात. त्यामुळे आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कलेच्या माध्यमातून, विशेषतः इथल्या कणखर दगडात घडलेल्या शिल्पाकृतीतून प्राचीन महाराष्ट्राचा वेध घेऊया.

    महाराष्ट्रातील लयन शिल्पसंपदा

    महाराष्ट्र आणि इथे बहरलेली शिल्पकला आणि त्यांच्या विविध शैलीचा विचार केला तर महाराष्ट्रात आपल्याला या शिल्पाशैलीचेही विविध टप्पे बघायला मिळतात. दगडाच्या अंतरंगातून उमटलेल्या शिल्पाकृती या वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या शैलीची एक स्वतंत्र छाप दाखवतात. लयनांमध्ये दडलेल्या या शिल्पाकृतींमध्ये भव्यता, सौष्ठवता आणि कमनीयता, भावदर्शी शिल्पपट आणि आणि त्यातून निर्माण होणारी रसोत्पत्ती, नक्षीकाम आणि अलंकरण ही वैशिष्टे आहेत. ज्यामुळे भारतीय आणि परदेशी नागरिकांची महाराष्ट्रातील लयन स्थापत्याला अधिक पसंती असते.  यासाठीच महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, घारापुरी सारखे लेणी समूह हे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जागतिक आणि राष्ट्रीय वारसा यादीतही नोंदवले गेले आहेत.

    महाराष्ट्रामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन या तीन धर्मियांची लयन परंपरा दिसते. हे स्थापत्य प्रस्तर किंवा दगडात झाल्याने अनेक वर्ष टिकून आहे त्यामुळे लयन स्थापत्य ही स्थापत्य शैलीतील प्राथमिक अवस्था म्हणून बघतात. महाराष्ट्रातील शिल्पं बघताना आपल्याला भाजे  या लेणीतील शिल्पांपासून सुरुवात करावी लागते.

    शुंगकालीन शिल्पसंपदा

    महाराष्ट्रातील प्राचीन शिल्पावशेष म्हणायचे झाले तर प्राचीनतम शिल्पं आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील, एक महत्वाचे लेणे भाजे येथे बघायला मिळतात. भाजे इथल्या विहारात कोरलेल्या कमी उठावाचे शिल्प, शुंग कालीन शिल्पशैलीचा नमुना आहे. रथात आरूढ एक व्यक्ती शिल्पांकित केली आहे. वासुदेवशरण अग्रवाल यांच्या मते हा शिल्पपट दिव्यावदान या महायान ग्रंथात वर्णन केलेल्या विजिगीषु राजा मांधाता याच्या उत्तर कुरुतील स्वारीचे शिल्पांकन आहे. कारण अशीच एक शिल्पाकृती जी या शिल्पपटाला समकालीन म्हणता येईल अशी आहे, ती पवनी येथील उत्खननात सापडली आहे. पवनी आणि भाजे इथले हे दोन्ही शिल्पपट भारहूत येथील शुंग शिल्पशैलीशी साम्य दर्शवणारे आहेत.  यातील शिल्पे ही अत्यल्प उठावातील आहेत. या शिल्पांमधील मानवी आकृती या काहीश्या चापट्या दिसतात. त्रिमितीचा अभाव इथल्या शिल्पकलेत दिसतो.  स्वाभाविक आहे, शिल्पशैलीचा हा प्राथमिक टप्पा असल्याने शुंगकालीन शिल्पे बघताना त्यातील तंत्राच्या मर्यादाही जाणवतात.  हा महाराष्ट्रातील शिल्पशैलीचा प्राथमिक टप्पा म्हणावा लागेल.

    सातवाहनकालीन शिल्पसंपदा

    भारतातील लयन स्थापत्याची परंपरा जरी मौर्य काळात सुरू झाली असली तरी तिला बहर मात्र सातवाहन काळात म्हणजे इ. स. पूर्व 1 ले शतक ते इ. स. 3  शतकात आला. भारतातील जवळजवळ 80% लेण्या या महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या गर्भात निर्माण झाल्या आहेत. सातवाहनकालीन शिल्पशैलीमध्ये शुंग शैलीपेक्षा सुबकपणा आलेला दिसतो. कलाकाराची माध्यमावर आणि ते माध्यम हाताळण्याच्या तंत्रावर आलेली पकड ही त्या शिल्पांमधून व्यक्त होताना दिसते. अनेक मानवी शिल्पे ज्यात यक्ष, द्वारपाल, स्त्री-पुरुष यांशिवाय प्राणी यांची शिल्पांकने आहेत. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील दुसरे महत्वाचे प्राचीन लेणे म्हणजे पितळखोरा.

    पितळखोरा येथील यक्षमूर्ती महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतीय शिल्पकलेतील उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. सातवाहनकालीन मानवी शिल्पांमध्ये एक प्रकारचा भारदस्तपणा दिसतो. इथे जिवंत हत्तींच्या आकाराच्या हत्तींची एक रांग, त्यांच्यापुढे माहूत, विहाराच्या प्रकाराच्या व प्रवेशद्वारापाशी दोन सशस्त्र पाहरेकरी, काही जातक कथा आणि बुद्धचरित्रातील काही प्रसंग दाखवणारी शिल्पे, काही स्वतंत्र यक्ष मूर्ती कोरलेल्या होत्या असे दिसते. एवढ्या शिल्पाकृती या काळातील इतर कोणत्याही लयन  समूहात आढळत नाही.

    याच सातवाहन काळातील शिल्पशैलीचा परमोच्च बिंदू म्हणजे महाराष्ट्रातील कार्ले हे लेणे. कार्ले लेणीच्या दर्शनी भिंतीवर स्त्री-पुरुषांच्या जोड्या दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर हलक्या हास्यछटा उमटवण्यात कलाकाराला यश आले आहे. वस्त्रांमधील चुण्या, त्याचा तलमपणा हा दगडासारख्या कठीण माध्यमातून दाखवणे आता शक्य झाले होते. शिरोभूषणे आणि अलंकरण कल्पकतेने घडवलेले आहेत.

    वाकाटककालीन शिल्पसंपदा

    जसा काळ पुढे सरकतो तसे भारताचे खऱ्या अर्थाने सुवर्णयुग मानले जाणारे गुप्त घराणे पुढे येताना दिसते. पण याच काळात महाराष्ट्रातील सुवर्णयुग आपल्याला दिसते ते गुप्त घराण्याला समकालीन असलेले, महाराष्ट्रातील वाकाटक घराण्याच्या रूपाने. वाकाटक नृपती हरिषेण या  काळात बहरलेले औरंगाबाद येथील अजिंठा, हे तर महाराष्ट्राचे गौरवस्थान आहे. अजिंठा हे तिथल्या चित्रशैलीसाठी प्रसिद्ध असले तरी तेथील शिल्पकलाही उल्लेखनीय आहे. मानवाकृती, पशुपक्षी, फुलापानांच्या नक्षी येथे कोरल्या आहेत. अजिंठा लेणी क्र. 10 ही कालानुक्रमाने प्राचीन आहे. या लेणीजवळ नागराज आणि नागराणी यांच्या शिल्पाकृती आहेत. अजिंठ्यातील शिल्पं त्यावर मातीचा लेप लाऊन रंगवलेली होती. कालांतराने हे रंग गेले असले तरी त्या रंगाचे काही अवशेष शिल्पांवर आजही बघायला मिळतात. इथल्या शिल्पांना कथानकांची जोड मिळाली आहे. त्यामुळे बुद्ध जीवनातील अनेक प्रसंग इथे बघायला मिळतात.

    कलचुरीकालीन शिल्पसंपदा

    इ.स. 9 वे शतक उजाडताना महाराष्ट्रात पुन्हा एक अप्रतिम कलाविष्कार साकार होतो आणि आपल्या पुढे साक्षात उभा राहतो तो कलचुरी घराण्याच्या काळातील घारापुरी येथील लेणी समूह. या काळातील शिल्पशैली बघताना शिल्पांमध्ये लय आणि सुडौलपणा येताना दिसतो. भाव-उत्कटता इथल्या प्रत्येक शिल्पांमधून पदोपदी जाणवते. घारापुरी येथे शिल्पकला आणि त्यासोबत शिल्पांमधून तत्त्वज्ञानाचा संचार होताना दिसतो आणि त्याच धर्तीवर घडलेली सदाशिवाची भव्य मूर्ती आपले डोळे दिपवून टाकते. शिवपार्वतीची संयुक्त प्रतिमा, अर्धनारीश्वर या  शिल्पांत पुरुष आणि प्रकृती ही दोन तत्त्वे एकाच शरीरात सामावलेली दाखवताना शिवस्वरूपातील भारदस्तपणा आणि पार्वती स्वरूपातील नाजूकपणा या दोन्हींचा समतोल शिल्पकाराने साधलेला दिसतो. शिवपार्वतीच्या कल्याणसुंदर मूर्तीमध्ये विवाह प्रसंग असल्याने धार्मिक विधी, गोष्टी यांचे बारीकसारीक तपशिलासह शिल्पांकन केलेले आहे. याशिवाय अंधकासुरवध, गंगाअवतरण अशी अनेक शिल्पे उल्लेखनीय आहेत.

    राष्ट्रकुटकालीन शिल्पसंपदा

    कलचुरींना समकालीन असलेल्या राष्ट्रकुट राजघराण्याच्या काळात निर्माण झालेली शिल्पशैली ही देखील तितकीच विलोभनीय आहे. औरंगाबाद येथील वेरूळ म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतीय शिल्पशैलीचा एक अद्वितीय नमुना आहे. वेरूळ लेणीसमूह हा बौद्ध, जैन आणि हिंदू तीनही धर्मांना समर्पित लेणीसमूह असल्याने शिल्पातील वैविध्य इथे दिसते. विश्वकर्मा, तीन थाल, जांभाल या बौद्ध गुहा शिल्पाकृतींनी सुशोभित केलेल्या आहेत. यात बुद्धाच्या जीवनाशी निगडित कथात्मक प्रसंग असून प्रारंभी द्वारपालांच्या भव्य मूर्ती आहेत. सर्व बुद्धमूर्तींचे वस्त्र अत्यंत तलम दाखविले असून त्यातून बुद्धाचे अंगसौष्ठव उत्तम रीतीने व्यक्त होते. येथील रूपकांना जिवंतपणा आहे, त्याचप्रमाणे उठावातील या शिल्पांत त्रिमिती शिल्पांकनामुळे नजरा खिळून राहतात. याशिवाय दशावतार, रामेश्वर, धुमार, रावण की खाई इ. लेण्यांमधूनही विपुल शिल्पांकन आहे. रामेश्वर लेण्यात गंगा-यमुनाच्या सुरेख मूर्ती आढळतात. भव्यता आणि सोबतच कमनीयता हे इथल्या शिल्पांमध्ये दिसते.  वेरूळ येथील जैन लयनांमध्ये तीर्थंकार, चक्रेश्वरी यक्षिणी, पार्श्वनाथ, गोमटेश्वर, अलंकारयुक्त गंधर्व-युग्म आणि नर्तक-नर्तिका यांच्या सुबक मूर्ती उत्कृष्ट कलेची साक्ष देतात. कैलास हे शिवमंदिर वेरूळच्या शिल्पकलेतील मुकुटमणी आहे.  भिंतींवर त्रिपुरांतक, गरुडारूढ नारायण, अर्जुन-सुभद्रा विवाह अशांसारख्या मूर्ती आहेत. जोत्यावर रामायण, महाभारत, विष्णुपुराण यांतील शिल्पपट कोरले आहेत. इथल्या मूर्तींचे वैशिष्ट्ये हे त्यांच्या कलात्मकतेतच दडलेले आहे. प्रत्येक एक शिल्पं त्यांच्या सौंदर्याची एक वेगळीच छाप पाडत राहते.

    समारोप

    महाराष्ट्राची शिल्पसंपदा ही केवळ अतुलनीय आहे. शिल्पांमधील वैविध्य, त्यांचे विशिष्ट तंत्र आणि सादरीकरण या सर्व गोष्टी, थोडक्या शब्दांत मांडता येणे केवळ अशक्य काम आहे. तरीही माझ्या अल्प शब्दांत प्राचीन महाराष्ट्रातील या कलाकृतींच्या वेगवेगळ्या शैलींचा एक छोटासा आढावा घायचा, मी प्रयत्न या लेखातून केला आहे. शिल्पकला आणि त्यातून आपल्याला लाभलेला कलेचा हा सांस्कृतिक वारसा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आपली ही ओळख आपण जपूयात.
    जय महाराष्ट्र..!!

  • पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे, थाथेर

    पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे, थाथेर

    पंजाब, भारतातील उत्तर पश्चिमी भाग हा तिथल्या मेहनती लोकांसाठी आणि तिथल्या दमदार संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. अमृतसर जवळील जन्दियाला गुरु, पंजाब इथे एक विलक्षण संस्कृती बघायला मिळते जी फाळणीनंतरच्या स्थलांतराचा परिणाम आहे.

    जन्दियाला गुरु ह्या ठिकाणी काही लोकं तांबे, पितळ आणि काही मिश्रधातू ह्या पासून पारंपारिक पद्धतीने भांडी बनवण्यात कुशल आहेत. तांबे, पितळ सारख्या धातूंचे मोडीत घातलेल्या वस्तू वितळवण्यासाठी जमिनीमध्ये मोठ्या भट्ट्या आहेत.

    वितळलेल्या धातूला बाहेर काढून लोखंडाच्या साच्यात गार केला जातो. हे छोट्या छोट्या साच्यातील धातूच्या तुकड्यांना साच्यातून बाहेर काढून यंत्राद्वारे आवश्यक जाडीनुसार त्याचे थर केले जातात. ह्या भांड्यांना ठोकून अकार दिला जातो. हातोडीने विविध आकारात भांडी घडवण्याची कला ह्या लोकांना अवगत आहे.

    Intangible Heritage of India -Traditional brass and copper craft of utensil making among the Thatheras of Jandiala Guru, Punjab

    थाळ्या, परात, गोल भांडी, उभट पेले अश्या अनेक आकारात ही भांडी तयार होतात. ह्या बनवलेल्या भांड्यांना चकाकी आणण्यासाठीही पारंपारिक पद्धतीने हाताने, सौम्य अम्लांचा वापर करून नंतर चिंचेच्या पाण्याने चकाकी आणतात. नंतर मातीने भांडी चोळली जातात, इथे हे लोक त्यासाठी पायांचा वापर करतात.

    ह्या धातूपासून धार्मिक विधींसाठी उपयोगात आणली जाणारी भांडी वापरली जातात. मधुपर्खा नामक तांबे, झिंक आणि कथील ह्या धातूपासून बनविलेले मिश्र धातूंचे भांडे सुरमा (Kohl) बनवण्यासाठी वापरतात. विजयकंठा नामक तांब्याचे भांडे ज्याचा वापर प्रार्थनेच्यावेळी थाळ वाजवण्यासाठी होतो (Gong). छायापात्र नामक वाटीसारख्या लहान पत्रात तेल भरले जाते. लग्नविधीमध्ये वधु आणि वर त्यांचे प्रतिबिंब ह्यात बघतात.   

    अल्युमिनियम आणि स्टील ह्यांच्या वाढत्या मागणी मुळे ह्या पारंपारिक व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. ह्याचे दुसरे कारण हेही आहे कि लोकांना दैनंदिन जीवनात ह्या भांड्यांची देखभाल करणे आणि ते स्वच्छ ठेवणे कठीण आहे, परंतु आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे.

    त्यामुळेच हळूहळू लुप्त होत चाललेल्या ह्या पारंपारिक कलेला 2014 साली युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.

     

    Photo Credits : UNESCO

  • संकीर्तन

    संकीर्तन

    सत् युगामध्ये विष्णूच्या ध्यानाने, त्रेता युगामध्ये यज्ञीय समर्पणाने, द्वापार युगामध्ये भगवंताच्या चरण सेवेने जे फळ प्राप्त होईल तेच कलीयुगामध्ये केवळ संकीर्तनाने साध्य होईल, हे मानणारी परंपरा म्हणजे मणिपुरमधील संकीर्तन. इ.स. 15 शतकात मणिपूरचा राजा भागचन्द्र सिंह ह्याने संकीर्तन जनसामान्यात रुजवले.

    संकीर्तन म्हणजे ज्ञानाचे माध्यम मानणाऱ्या वैष्णव पंथीय लोकांची परंपरा आहे. मणिपुरी लोक यज्ञीय समर्पण किंवा कोणत्याही विधीविधावतांना मनात नाहीत. प्रार्थना किंवा धार्मिक सण-समारंभासाठी संकीर्तन हेच महत्वाचे मानले जाते.

    संकीर्तानाचे अनेक प्रकार असले तरी त्यांची सुरुवात ही अतिशय क्लिष्ट अश्या धार्मिक विधींनी होते, ज्यात चंदन, दिवा, धूप आणि वस्त्र दानं दिले जातात. संकीर्तानाच्या सादरीकरणाची सुरुवात ही संगीत प्रस्तावनेने होते. ही सुरुवात राग चंद्रिकेत संगीतबद्ध असते.

    मुख्य कथाभाग सांगण्यासाठी कमीत कमी तीन तासांचा कालावधी लागतो. संकीर्तनाच्या कथा ह्या राधा आणि कृष्ण ह्यांवर आधारित असतात. संकीर्तन करताना सादरकर्ते नृत्यही करतात. हे नृत्य करत असताना काही विशिष्ट कल्पनांसाठी विशिष्ट संकेत योजना केली जाते त्याला कर्तालचोलम म्हणतात. वाद्यवृंद विविध प्रकारच्या ताल आणि ठेक्यांद्वारा विविधता प्रस्तुत करतात.

    Intangible Heritage of India – Sankirtana of Manipur

    स्त्रिया आणि पुरुष दोघांचेही संकीर्तन असते. त्यापैकी स्त्रियांचे संकीर्तन हे विलक्षण असून उच्च स्वरात ते गायले जाते. संकीर्तानातील विधी आणि अनुष्ठान इतके सरळ असतात कि प्रेक्षकही त्यांना नेमून दिलेल्या जागांवर बसतात आणि सादरीकरणाच्या मधे उठून जाऊ शकत नाही. प्रेक्षक हे संकीर्तन सदर करणाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यसाठी त्यांना वाकून नमस्कार करतात. कलाकार संकीर्तन सादर करण्याचे पैसे ठरवत नाहीत. लोकं स्वइच्छेने पैसे किंवा इतर गोष्टी, जे अर्पण करतात ते हे कलाकार घेतात. ही गुरु-शिष्य परंपरा आहे.

    पुरुषांच्या संकीर्तन एकूण 14 मृदुंग वादक सादरीकरण करतात. संकीर्तन मणिपुरी वैष्णव पंथी लोकांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगी गायले जाते. जसे लहानपणी कान टोचण्याचा विधी, यज्ञोपवीत धारण करताना, लग्नात वधु संकीर्तनाच्या संगीतावर तालबद्ध पावले टाकते आणि अंत्यविधी साठीही. ह्याशिवाय हिंदू कालनिर्णयाप्रमाणे सर्व सण साजरे करताना संकीर्तन केले जाते. जगन्नाथ रथयात्रेच्या वेळी संकीर्तानाची प्रस्तुती होते त्यावेळी कलाकार नृत्य आणि हाताने टाळ्या वाजून संकीर्तन सदर करतात.  

    झुलन यात्रा पावसाळ्यात साजरी केली जाते, त्यावेळी कलाकार मृदुंग आणि मंजिऱ्या संकीर्तानासाठी वापरतात. तर हिवाळ्यात सोयोन संकीर्तन केले जाते ज्यात कलाकार मृदुंगासह झांज ह्या वाद्यांचा वापर करतात. होलीपाला संकीर्तन हे वसंतऋतूमध्ये सदर करतात, ह्यात वेगवेगळ्या ढोलांचा समावेश असतो.

    मणिपूरचे संकीर्तन हे तिथल्या उत्स्फूर्त जीवनाचे प्रतिक आहे जे लोकांमध्ये एकात्म भाव टिकवून आहे. संपूर्ण समाज संकीर्तन जपण्याच्या दृष्टीने कार्यरत असतो. त्यामुळेच 2013 साली संकीर्तनाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे थाथेर ह्यांची माहिती घेऊया.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO

  • बौद्ध पठण परंपरा, लडाख

    बौद्ध पठण परंपरा, लडाख

    बौद्ध धर्मशाळा आणि लडाख मधील गावात बौद्ध लामा किंवा धर्मगुरू, त्यांच्या पवित्र मंत्राचे पठाण करतात. हे पवित्र मंत्र त्यांचे तत्वज्ञान, बुद्धाची शिकवण सांगणे आहे.

    लडाखमध्ये महायान आणि वज्रयान ह्या पंथाची उपासना चालते. त्यापैकी चार महत्वाचे संप्रदाय मानले जातात. हे संप्रदाय म्हणजे न्यागम, कागयुड, शाक्य आणि गेलूक.

    प्रत्येक संप्रदायाची मंत्र पठणाची एक विशिष्ट पद्धत आहे. हे संप्रदाय त्या मंत्राचे पठण कालचक्र विधी, बौद्ध धर्मातील महत्वाच्या दिवशी किंवा कृषी दिनदर्शिकेप्रमाणे म्हणायची प्रथा आहे. ह्या मंत्र पठणाचा मूळ हेतू हा आहे कि लोकांचे अध्यात्मिक आणि नैतिक कल्याण व्हावे. तसेच मानसिक शुद्धता आणि शांतता प्रस्थापित व्हावी. दुष्ट शक्तींना खुष करून घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हे मंत्र पठण करतात. ह्या मंत्र पठणाने बुद्ध, बोधिसत्व, इतर देवता आणि रिन्पोचे (धर्मगुरु) ह्यांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. हे मंत्र समूहाने म्हणायचे असतात.

    एकतर घरामध्ये किंवा बौद्ध मठामध्ये नृत्य करून हे मंत्र म्हटले जातात. हे मंत्र खाजगी घरांमध्ये किंवा अंगणात म्हणता येतात. बौद्ध मंत्र पठण परंपरा म्हणजे एक कलात्मक अभिव्यक्ती आहे जी बौद्ध अनुयायांचा बौद्ध धर्मावरील विश्वास दर्शवते.

    Intangible Heritage of India – Buddhist chanting of Ladakh
    Shargangrima

    ही गेलूक संप्रदायाची पठण परंपरा आहे. ह्याचे मंत्र पठण हे भिक्षु ही करतात आणि सामान्य लोकही करतात. ह्यांच्या पठणाच्या काही कडक नियमांचे पालन करावे लागते. ह्यात आवाजाचे स्वरनियमन महत्वाचे असते. लामा ह्या मंत्राचे पठण मोठ्याने म्हणून इतर लामा आणि बौद्ध भिक्षुंकडून म्हणवून घेतात.

    Nasthan Phyagdzod

    हे मंत्र हे बुद्धाच्या 16 अर्हतांच्या साठी म्हटले जाते. बुद्धाची शिकवण समजवण्यासाठी हे 16 अर्हत पृथ्वीवर सदैव राहावेत ह्यासाठी ही प्रार्थना केली जाते. ह्यात पद्धतीत भिक्षु प्रतीकात्मक रूपात संगीत, सुगंधी द्रव्ये, नृत्य, फुले, दिवा आणि भोजन ह्या अर्हतांना अर्पण करतात.

    प्रत्येक छंदानंतर मध्ये मध्ये बासरी, झांज, ढोल आणि घंटी वाजवली जाते. भिक्षुंना ह्या मंत्र पठणासाठी गावातील घरांमध्येही बोलावले जाते. हे भिक्षु वाईट शक्तींना किंवा देवतांच्या रागाला शांत करून त्यांच्या कृपाशिर्वादासाठी घरांमध्ये पठण करतात.

    Kunrig

    शाक्य आणि गेलूक संप्रदायातील बौद्ध भिक्षु हे मंत्र पठण करतात. हे मंत्र पठण करताना ते स्वतः ज्ञानप्राप्ती करून घेतली आहे असे समजून विविध हस्त मुद्रा करतात. बुद्धाची शिकवण आणि त्याची इतर विशिष्ट लक्षणे ही ह्या मुद्रांमधून व्यक्त करतात. मंत्र पठण करताना भिक्षु स्वतःला ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी मानतात, जिथे त्यांच्या अजुबाजूला बुद्ध, बोधिसत्व, दिव्य लोकं, संरक्षक देवता, इतर देवता आणि रिन्पोचे असतात. ह्यांचे प्रमुख भिक्षु हे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी समाजात फिरतात.

    Chod

    ह्या मंत्र पठणाच्या परंपरेत भौतिक शरीर हे चैतन्यापासून वेगळे होते. हे मंत्र एकांतात, स्मशानात म्हटले जातात. ह्या मंत्रांसाठी एकाग्रतेची आवश्यकता असते आणि निवडक भिक्षुंनीच ते म्हणायचे असतात. हे भिक्षु त्या मंत्र पठाणाची दीक्षा घेतात.  

    मंत्र पठण हे लडाख मधील मठांमध्ये किंवा प्रार्थना गृहांमध्ये दैनंदिन चालणारा भाग आहे, त्यामुळे मंत्र पठण हा तिथला सांस्कृतिक ठेवा आहे जो स्थानिक लोकांच्या आणि भिक्षूंच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.  

    2012 साली ह्या बौद्ध मंत्र पठण परंपरेला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.
    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात मणिपूर मधील संकीर्तनाची माहिती घेऊया.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO

  • छउ नृत्य

    छउ नृत्य

    पूर्व भारतातील एक नृत्य प्रकार म्हणजे छउ. छउ ह्या नृत्यामध्ये महाभारत आणि रामायण किंवा कधीकधी स्थानिक लोकांच्या कथा सादर केल्या जातात.

    छउ ह्याचा संस्कृत शब्द होतो, छाया म्हणजे सावली किंवा छावणी. ही नृत्यशैली वडील आपल्या मुलाला शिकवतात आणि हा वारसा पुढे प्रवाहित होतो. नृत्य लढाऊ शैलीचे असल्याने ह्यात उत्साहपूर्ण  हालचाली आणि प्रचंड ताकद आवश्यक असते, त्यामुळे मुख्यतः हे नृत्य पुरुषांसाठी आहे. ह्या नृत्य शैलीत वीररस हा प्रधान रस असतो. छाउ नृत्याच्या तीन प्रादेशिक नृत्यशैली आहेत.

    Intangible Heritage of India – Chhau Dance
    सराईकेला छउ

    सराईकेला छउ नृत्यशैली प्रामुख्याने बिहार भागात बघयला मिळते. ह्यात मुखवट्यांचा वापर केला जातो. सराईकेला छउच्या प्राथमिक सदरीकरणाला फारी-खांडा-खेला म्हणतात. ज्याचा शाब्दिक अर्थ होतो ढाल-तलवारीचे नाटकं

    पुरुलिया छउ

    पुरुलिया छउ नृत्यशैली प्रामुख्याने पश्चिम बंगाल भागात बघयला मिळते. ह्यात मुखवट्यांचा वापर केला जातो. पुरूलिया छउची नृत्यप्रस्तुती ही मुख्यतः युद्धाशी संबंधित असते.

    मयुरभंज छउ

    मयुरभंज छउ नृत्यशैली प्रामुख्याने ओरिसा भागात बघायला मिळते. ह्यात मात्र मुखवट्यांचा वापर दिसत नाही. मयूरभंज छउच्या प्राथमिक सदरीकरणाला रुक-मार-नाचा म्हणतात. ज्याचा शाब्दिक अर्थ होतो सुरक्षा आणि आक्रमणाचे नृत्य

    चैत्र पर्वात छउ नृत्याचे सादरीकरण मोठ्या प्रमाणात होते. ह्या  नृत्यात लढाऊ तंत्राशी निगडित हालचाली तर असतातच शिवाय प्राण्यापक्ष्यांचे हावभाव आणि त्यांची हालचाल किंवा गृहिणींच्या दैनंदिन कामाशी निगडित हालचाली, जसे कि झाडून घेणे, अंगणात सडा घालणे, रांगोळी काढणे इत्यादी नृत्यातून सादर केल्या जातात.

    छउ नृत्य  हे रात्रीच्या वेळी मोकळ्या आवारात पारंपरिक पद्धतीने सादर केले जाते. ह्यात मुख्यतः शहनाई, बासरी, ढोल, ढोलकी अश्या वाद्यांचा वापर होतो. छउ हा त्या समुदायाच्या जीवनातील एक अविभाज्य  घटक आहे. सर्व जाती-जमातींचे लोकं एकत्र येऊन ह्या नृत्याचा रसास्वाद घेतात. छउ नृत्य करणारे त्यांचे व्यवसाय आणि दिवसभराची कामे आटपून ह्या कलेची साधना जपत आहेत.

    2010 साली छउ नृत्य  प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. त्यामुळे छउ नृत्य शैलीची जगाला माहिती तर झालीच शिवाय हा वारसा जपला ही इथून पुढे जाईल.  

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात लडाख येथील बौद्ध पठण परंपरेची माहिती घेऊया.

    (क्रमशः)

    Photo Credits : Internet

  • कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य

    कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य

    राजस्थानमधील साप पकडणाऱ्या कालबेलिया लोकांचे पारंपारिक नृत्य आणि संगीत आहे. कालबेलिया हे भटक्या जमातींपैकी एक असून ते जिथे राहतात त्यांना डेरा म्हणतात.

    हे गरुडी लोकं त्यांच्या जवळच्या वेतापासून बनवलेल्या टोपीतून सापांना घेऊन गावातील घराघरातून दानं मागत फिरतात. कालबेलिया जमातीचे समाजात एक विशिष्ट स्थान आहे. कालबेलिया जमातीच्या लोकांसाठी त्यांची परंपरा, हा अभिमानाचा विषय आहे.

    कालबेलिया जमातीमधील स्त्रिया गाणी गाऊन आणि नाचून दानं मागतात. गाण्यांमधून आणि नृत्यातून ते लोकांचे मनोरंजनही करतात. ह्या गाण्यांचा आशय हा त्या गावातील दंतकथा, प्रेमकथा यांच्याशी निगडीत असतो. दैनंदिन जीवनातही त्यांच्या उत्स्फूर्त गाण्यांचा समावेश असतो.

    त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये बाजरी हे मुख्य धान्य असते. बाजरीची भाकरी आणि भाजी असा त्यांचा आहार असतो.

    Intangible Heritage of India -Kalbelia folk songs and dances of Rajasthan

    पारंपारिक पेहराव आणि रंगभूषा

    वाळवंटी प्रदेशात असूनही त्यांचा पेहराव हा रंगेबेरंगी असतो. विशेष प्रसंगासाठी ह्या स्त्रिया काळ्या रंगाचा घागरा आणि चोळी घालतात. ह्या स्त्रियांच्या पोशाखावर अराश्याचे काम करतात. हे अराश्याचे काम चंदेरी दोऱ्याने केलेले असते.

    पुरुषांचा पोशाख म्हणजे पांढरा लेहेंगा आणि झब्बा आणि डोक्याला रंगेबेरंगी फेटा बांधलेला असतो.

    वाद्यांमध्ये हलगी, मंजिरे, खंजिरी आणि पुंगी हे मुख्य वाद्य असून पुरुष ह्या वाद्यांचा वापर करतात.

    कालबेलियांचा पारंपारिक नृत्यप्रकाराला मटकू म्हणतात जो त्यांच्या दैनंदिन जीवनाचाही एक भाग आहे. मटकू मध्ये स्त्रिया त्यांच्या कमरेपासून वरच्या अंगाचा आणि हातांचा वापर अधिक करतात. ह्या नृत्यप्रकारात गाणी म्हटली जात नाहीत. केवळ वाद्यांच्या ठेक्यावर स्त्रिया नृत्य करतात.  

    लूर नृत्य हे होळी सारख्या सणाच्या दिवशी स्त्रिया करतात. अतिशय प्रसन्नता आणि आनंद देणारी ही गाणी असतात. त्यांची ही संगीत आणि नृत्य परंपरा आणि त्यातली सहजता ही त्यांच्या रोजच्या रियाजामुळे दिसते.

    नृत्यामधील हालचाली ह्या सापांप्रमाणे लवचिक असतात. अनेक कसरतीचे खेळही त्यांच्या नृत्यप्रकारात समाविष्ट झालेलेल आहेत, जसे डोळ्यांच्या पापण्यांनी अंगठ्या उचलणे वगैरे. कालबेलिया जमातीच्या ह्या भटके लोक त्याचा सांस्कृतिक वारसा जपत, उत्स्फूर्तपणे त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करताना दिसतात. बदलत्या सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेत त्यांच्या समुदायाचे प्रयत्न दिसून येते.

    2010 साली कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. त्यामुळे आता जगभरात त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे.

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात पूर्व भारतातील एक नृत्यप्रकार बघूया.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO

  • मुडीयट्टू

    मुडीयट्टू

    मुडीयट्टू हा केरळ मधील मंदिरात सादर होणारा धार्मिक नृत्य, नाट्य प्रकार आहे.  देवी काली आणि क्रूर राजा दारूक यांच्या युद्धप्रसंगावर आधारित पौराणिक कथेशी संबंधित हा विधी आहे.

    हा धार्मिक विधी हा स्थानिक समुदाय एकत्र येऊन साजरा करतात. मुडीयट्टू सदरीकारंचा मूळ हेतू शुद्धीकरण आणि नवीन उत्साह जनसामान्यात राहावा हा आहे. उन्हाळी पिकांच्या कापणी नंतर एका ठराविक दिवशी गावातील लोकं सकाळी लवकर मंदिरात जमतात. हा उत्सव देवीच्या सन्मानासाठी हे लोकं करतात.

    मुडीयट्टू सादरकर्ता हा स्वतः उपास आणि प्रार्थना करून स्वतःला पवित्र करून घेतो. त्यानंतर देवी कालीची मोठ्ठी रांगोळी ही मंदिराच्या आवारात हे सादरकर्ते घालतात. त्या रांगोळीला कोलम / कलम असे म्हणतात. ही रांगोळी विविध रंगानी सुशोभित केली जाते आणि देवीला जागृत केले जाते. देवीला जागृत करण्यासाठी पारंपारिक वाद्यांसह पारंपारिक गाणी म्हटली जातात, त्यांना कलम पट्टू म्हणतात. कलम पट्टू म्हणजे डोक्यापासून पायापर्येंत वर्णन या गाण्यात असते.

    मुडीयट्टू सदरकरणारा वाद्यवृंद याला केलीयट्टू म्हणतात. हे लोकं सोपान संगीत किंवा मंदिरात म्हंटले जाणारे संगीत यामध्ये कुशल असतात. दुपारी केली जाणारी उछपूजा ही रूपक ताल आणि मल्हार रागात करतात.

    Intangible Heritage of India – Mudiyettu, ritual theatre and dance drama of Kerala

    अनेक तासांच्या मेहनतीनंतर मुडीयट्टू सदरकर्ता परंपारिक रंगभूषा आणि वेशभूषा करून तयार होतो.  मुडीयट्टू सदरकर्ता रंगभूषा आणि वेशभूषा करून तयार झाला कि त्याच्यात कालीचा प्रवेश झाला अशी मान्यता आहे. त्यामुळे आता देवी कालीच्या स्वागतासाठी संपूर्ण गावं कालीवर विड्याच्या पानांचा वर्षाव करतात. त्यांच्यावर प्रसन्न होऊन देवी काली तिच्या भक्तांवर साळीच्या दाण्यांचा वर्षाव करते. हे  धन, धान्य आणि समृद्धीचे प्रतिक मानतात. नंतर काली गावातील विविध घरांत जाऊन तिचा आशीर्वाद लोकांना देते. आणि त्यानंतर कलम म्हणजे ती देवीची रांगोळी पुसून ह्या विधीची सांगता होते.

    यानंतर नृत्य-नाट्य ह्यांचे सदरीकरण असते. रांगोळीच्या जवळील दिवा हा सादरीकरण करण्याच्या जागी आणला जातो आणि  त्याने दिपप्रज्वलन केले जाते. वाद्यवृंद वाद्य वाजून गावातील लोकांना जमा करतात आणि सदरीकरण सुरु होते. हे सादरीकरण जिथे सादर केले जाते त्याला भगवती काऊ म्हणतात म्हणजेच कालीचे मंदिर. या सादरीकरणात काव्य आणि संवाद दोन्हींचा समावेश असतो. कुली नामक पात्र कालीच्या मदतीला येते. काली आणि कुली मिळून दारूक आणि धनवेन्द्रचा पराभव करतात.  कालीच्या विजयाचे प्रतिक म्हणून मशाली घेऊन भक्त आपल्या घरी जातात.

    मुडीयट्टूमध्ये तीन लक्षणे महत्वाची ठरतात

    1. चित्र वदिव्यू –  चित्रातील पूर्णता
    2. शिल्प वदिव्यू –  पात्र पूर्णता
    3. भूत वदिव्यू –  धार्मिक पूर्णता

    याशिवाय वेशभूषेतील काटेकोरपणा, वाचिक पुष्टी म्हणजे संवाद आणि संगीतातील काटेकोरपणा, आंगिक पुष्टी म्हणजे आंगिक अभिनय, सात्विक पुष्टी म्हणजे भावनिक अभिनयातील काटेकोरपणा, नृत्य पुष्टी म्हणजे नृत्यातील काटेकोरपणा, रंग पुष्टी म्हणजे रंगमंचावरील नाटकीय प्रदर्शनातील काटेकोरपणा हे सर्व घटक महत्त्वाचे असतात.

    2010 साली या धार्मिक नृत्य-नाट्य प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. त्यामुळे आता जगभरात या परंपरेला प्रसिद्धी मिळाली आहे.

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य विषयी माहिती घेऊया.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO