Month: March 2019

  • कऱ्हाडकन्या – अभिनव सरस्वती चन्द्रलेखा

    कऱ्हाडकन्या – अभिनव सरस्वती चन्द्रलेखा

    कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या प्रीतिसंगमावर वसलेले गावं म्हणजे कऱ्हाड. सध्या कऱ्हाड किंवा कराड या नावाने परिचित हे गावं, प्राचीन करहाट किंवा करहाटक या नावाने ओळखले जात होते. ही कऱ्हाडकन्या अभिनव सरस्वती चन्द्रलेखा, शिलाहार राजवंशातील राजकन्या म्हणजे साक्षात कला, ज्ञान आणि सौंदर्य यांचा त्रिवेणी संगम होती. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात शिलाहार राजवंशाची एक शाखा ही कऱ्हाड-कोल्हापूर इथे राज्य करीत होती. किंबहुना या शाखेला कऱ्हाडचे शिलाहार म्हणून ओळखले जात होते. कऱ्हाडकन्या चंद्रलेखा ही नृत्यनिपुण होती, संगीत स्वरसरिता होती, इतकेच नाही तर तिच्या लावण्याची गाथा सर्वदूर पसरलेली होती.

    इ.स. 11 व्या शतकात रचलेल्या विक्रमांकदेवचरित् या महाकाव्यात कवी विद्यापती बिल्हण याने, चन्द्रलेखेच्या या अलौकिक सौंदर्याला काव्यबद्ध केले आहे. चन्द्रलेखेति नामस्याश्चन्द्रलेखासमत्विषः म्हणजे चंद्रलेखा ही नावाप्रमाणेच नाजूक आणि तेजस्वी अशी सौंदर्या होती. करहाट मध्ये चंद्रलेखा या विदुषी, रूपवती आणि गुणवती राजकन्येच्या स्वयंवरासाठी भारतभरातून अनेक राजकुमार त्यावेळी उपस्थित होते. चेदी, कान्यकुब्ज, मालव, कालांजर, गुर्जर, पांड्य, चोल असे भारतातील सर्व प्रदेशातील आणि राजवंशातील राजे या स्वयंवरासाठी आले होते. मात्र चन्द्रलेखा ही चालुक्य सम्राट त्रिभूवनमल्ल विक्रमादित्य सहावा याच्यावर प्रभावित झाली आणि त्याचा पती म्हणून तिने स्वीकार केला.

    बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरित् मधील चंद्रलेखेच्या सौंदर्याचे अलौकिक वर्णन ऐतिहासिकदृष्ट्या अतिशयोक्ती वाटू शकते, पण तरीही चालुक्य सम्राट विक्रमादित्य सहावा याने एका अपूर्व सौंदर्यवती शिलाहार राजकन्येशी विवाह केला होता, याची माहिती काश्मीरपर्येंत पोहोचली होती. काश्मीर कवी कल्हण याच्या राजतरंगिणीमध्ये तसे काही उल्लेख येतात. चंद्रलेखा हीची तसबीर पाहून राजा हर्ष मदनपरावश झाला आणि त्याने पर्माण्डि म्हणजे विक्रमादित्याला हरवून चन्दलेला म्हणजे चन्द्रलेखेला मिळवण्याची प्रतिज्ञा केली होती. अर्थात कवी कल्हणाने या काव्यात हर्षाच्या या मूर्खपणाची चेष्टा केली आहे.

    ऐतिहासिकदृष्ट्या सर्वगुणसंपन्न चंद्रलेखा हीचा शोध घेतला, तर अनेक अभिलेखांमध्ये तसेच ताम्रपटात तिचा विशेष उल्लेख येतो. कवी बिल्हण चंद्रलेखा हीचा करहाटपतेः पुत्री असा उल्लेख करतो. त्यामुळे तिच्या वडिलांच्या नावाचा स्पष्ट संकेत मिळत नाही. त्यामुळे तत्कालीन करहाटपतीचा विचार करता, त्या काळातील समकालीन शिलाहार राजा जो कऱ्हाड प्रांतात राज्य करीत होता तो म्हणजे मारसिंह. त्यामुळे मम. मिराशी यांनी राजा मारसिंह हा चंद्रलेखेचा पिता असल्याचे प्रतिपादन केले आहे.

    कऱ्हाडकन्या चंद्रलेखा विवाहानंतर चालुक्य सम्राज्ञी झाली. चालुक्य सम्राट त्रिभूवनमल्ल विक्रमादित्यची श्रीमत् पिरीयरसी चन्दलादेवी बनली. इ.स.1096 सालचा विक्रमादित्याचा एक त्रुटित शिलालेख, काटेगिरी तालुका (बिजापूर) बदामी इथे सापडला आहे. जेव्हा चालुक्य सम्राट त्रिभूवनमल्ल विक्रमादित्य हा कल्याण मध्ये राज्य करीत होता, तेव्हा त्याची राणी अभिनव सरस्वती चन्दलादेवी हिने ऋग्वेद खण्डिका आणि शास्त्र खण्डिका यांसाठी दानं केले होते, असे या अभिलेखातून समजते.   

    चालुक्य सम्राट विक्रमादित्याच्या सहा राण्या होत्या, परंतु चन्दलादेवी ही त्याची अग्रमहिषी म्हणजे पट्टराणी होती. तिचे अनेक अभिलेखीय उल्लेख येतात, ज्यातून तिच्या पुत्रांची माहिती मिळते. चन्दलादेवीला जयकर्ण, सोमभूप आणि तैलपा तृतीय हे पुत्र होते. चन्दलादेवीचा थोरला मुलगा जयकर्ण याचा अकाली मृत्य झाला. त्यानंतर विक्रमादित्याच्या दुसऱ्या पत्नीचा पुत्र मल्लिकार्जुन याने प्रशासनाचा भार सांभाळला. मल्लिकार्जुनानंतर विक्रमादित्य आणि चन्दलादेवी यांचा कर्तृत्ववान पुत्र सोमभूप, जो सोमेश्वर तृतीय म्हणून कीर्तीरूपास आला, याने राज्य केले. चन्दलादेवीचा पुत्र सोमेश्वर हा आईप्रमाणे सर्वज्ञ आणि वडिलांप्रमाणे चक्रवर्ती होता. विद्वान आणि व्यासंगी अश्या या सोमेश्वराने मानसोल्ल्हास सारख्या विविध विषयांना स्पर्श करणारा बृहत् ज्ञानकोशाची निर्मिती केली. चन्दलादेवीचा सर्वात धाकटा मुलगा तैलपा तृतीय याचा चन्दलादेवी नयना सरसिज सूर्यः असा अनेक अभिलेखांत उल्लेख येतो.

    अभिलेखांमधील एक लक्षणीय बाब म्हणजे चन्दलादेवीचा उल्लेख करताना तिच्यासाठी वापरली गेलेली आदरयुक्त वचने. प्राचीन अलंदपूर म्हणजे अलंदे 1000 येथील अभिलेखात अतिशय सुंदर अश्या सन्माननीय शब्दांमध्ये चन्दलादेवीचा उल्लेख येतो. हा लेख संस्कृत आणि कन्नड अश्या मिश्र भाषेत आहे. या अभिलेखात लेखाचा दानकर्ता चौधरी रकासय्य, हा त्याचा दानाचे श्रेय चन्दलादेवी हिला समर्पित करतो आहे.
    द्वितीया लक्ष्मी समाने म्हणजे जी लक्ष्मी स्वरूपा आहे. कला हंस याने म्हणजे हंस वाहन असलेली कला म्हणजे साक्षात सरस्वती आहे.  श्रीमत् त्रिभुवनमल्लदेव विशाल वक्षस्थला निवासिनी म्हणजे त्रिभुवनमल्लदेव विक्रमादित्याच्या हृदयात जी निवास करते अशी श्रीमत् पिरीयरसी चन्दलादेवीयरु.  

    विविध अभिलेखीय नोंदी आणि ताम्रपटात तिच्यासाठी योजलेल्या उपाधींवरून तिचे शास्त्र-कला नैपुण्य आपल्याला सहज लक्षात येते. अनेक लिपी आणि भाषांवर तिचे खास प्रभुत्व होते, त्यामुळे तिला अभिनव शारदा आणि अभिनव सरस्वती यांसारख्या उपाधींनी गौरवीत केले होते. नृत्यामधील तिच्या अलौकिक कौशल्यामुळे तिचा नृत्यविद्याधारी असा उल्लेख आला आहे. सर्व कलांमध्ये तिची निपुणता असल्याने तिला सकळ कलाधारी असेही संबोधले आहे. कला आणि विद्या यांच्या सोबतच चन्दलादेवीमध्ये दुर्बल, असाह्य लोकांसाठी अपार करुणा होती. दुष्टा दर्पिष्टा सवती शिरो वज्र मुष्टी | दीनः अनाथः कथकः वैतालिकः सुवर्ण वृष्टी म्हणजे दुष्टांच्या डोक्यावर वज्र मुष्टी आणि दीन, अनाथ, कथाकार आणि स्तुतिपाठक यांच्यावर स्वर्णवृष्टी करणारी ती सम्राज्ञी होती. चन्दलादेवीच्या कारकिर्दीत तिने हिंदू आणि जैन धर्मासाठी अनेक दानं दिल्याच्या नोंदी आहेत. या अभिलेखामध्ये तिच्या वतीने पार्श्वनाथ मंदिर आणि शांतीनाथ मंदिराच्या डागडुजीसाठी दान दिल्याचे उल्लेख आहेत. मंदिरांशिवाय तिने निरनिराळ्या विद्यास्थाने आणि विविध खण्डिकांसाठी दाने दिली आहेत.

    एक सामर्थ्यवान आणि कुशल प्रशासक स्त्री म्हणूनही, चन्दलादेवीची ओळख आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. चालुक्यांच्या प्रदेशातील राज्यकारभार चन्दलादेवी लीलया सांभाळत होती. विक्रमादित्यने कलचुरी राजा जोगम याला महामंडलेश्वर हे पद बहाल करून त्याच्याकडे कराड 4000 चे प्रशासन  सोपवले होते. जोगमचा पुत्र पेर्मार्डीदेव हा चालुक्य राजा सोमेश्वर तृतीयच्या कारकिर्दीत महामंडलेश्वर म्हणून तारदावाडी मण्डलाचे प्रशासन चालवत होता. पेर्मार्डीदेवचा विवाह हा विक्रमादित्य आणि चन्दलादेवीच्या कन्येशी झाला, त्यामुळे चालुक्य आणि कलचुरी राजवंशात वैवाहिक नातेसंबंध प्रस्थापित झाले. पेर्मार्डीदेवचा मुलगा कलचुरी बिज्जल हा चालुक्य विक्रमादित्य आणि चन्दलादेवी यांचा नातू कराड 4000 मण्डलाचा प्रशासक म्हणून काम करीत होता. त्यावेळी बिज्जलाची आजी चन्दलादेवी ही कऱ्हाड विषयातील कलम्बड 300 आणि वळसंग उपविभागाचे प्रशासन चालवीत होती.  

    चंद्रलेखा जी नावाप्रमाणे लावण्यवती होती, उत्तम विदुषी आणि ज्ञानग्राही होती, नृत्य-संगीत-काव्य आणि विविध कलांची उपासक होती, सर्व सामर्थ्यानिशी राज्यकारभार सांभाळणारी कर्तबगार स्त्री, या महाराष्ट्र भूमीची कन्या होती. महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या प्रभावी आणि कर्तबगार स्त्री शासक म्हणून सातवाहन सम्राज्ञी नागनिका, वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्ता यांच्या खालोखाल, या कऱ्हाड कन्येच्या रूपातील चालुक्य सम्राज्ञी अभिनव सरस्वती चन्दलादेवी ऊर्फ चंद्रलेखा हिचे नाव अवश्य घ्यावे लागेल. कन्या, भार्या आणि माता इतकेच नाही तर आपल्या नातवासोबतही राजकीय कारकिर्दीत आयुष्य घालवणारी, ही त्याकाळातील एक प्रभावी शासक स्त्री आहे. केवळ पतीसोबतच स्वतःच्या अस्तिवाचा मार्ग बनवणारी ही कऱ्हाडकन्या चन्द्रलेखा, काही अभिलेखांतून तिच्या जीवनाचा एक पट आपल्यासमोर उलगडून ठेवते.
    जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान आणि सर्वगुणसंपन्न महिलांचा आदर्श वारसा आपल्याला लाभलेला आहे, हे चन्द्रलेखा आणि तिचे संपूर्ण आयुष्य बघताना निश्चितच आपल्याला जाणवेल.

    जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..!!

    खास महिला दिन विशेष लेख वाचा –

    1. सामान्यातील असामान्य – डॉ. शोभना गोखले
    2. परमवैष्णवी श्रीमत् त्रिभुवनमहादेवी
  • श्री क्षेत्र औंढा नागनाथ

    श्री क्षेत्र औंढा नागनाथ

    श्री क्षेत्र औंढा नागनाथ (GPS 19°32’13.5″N, 77°02’29″E) म्हणजे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शैव क्षेत्र.  गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या मराठवाड्यातील हिंगोली जिल्हात, श्री क्षेत्र औंढा येथे भव्य आणि मंत्रमुग्ध करणारे शिल्पसमृद्ध नागनाथ शिवालय आपल्याला बघायला मिळते. समुद्रसपाटीपासून साधारण 464 मीटर उंचीवर नागनाथाचे हे मंदिर आहे. औंढा हे गावं मराठवाड्यातील परभणीच्या नैऋत्येस 36 कि.मी. अंतरावर कळमनुरी या तालुक्यात स्थित आहे. परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीची उपनदी, कैदू नदीच्या काठावर औंढा हे गावं आहे जिथे हे भव्य शिवालय स्थापन केलेले आहे. 

    आजच्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाच्या निमित्ताने, श्री क्षेत्र औंढा नागनाथाचे वैभव मी बोधसूत्राच्या माध्यमातून संकलित करीत आहे. भारतात बारा ज्योतिर्लिंगे आहेत, त्यापैकी औंढा नागनाथ हे देखील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. शिवपुराणात शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगाचा उल्लेख असणारा एक श्लोक येतो. 

    सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम्॥
    परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥
    वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥

    सौराष्ट्रातील सोमनाथ, श्रीशैले पर्वतावर मल्लिकार्जुन, उज्जयिनी येथील महाकालेश्वर, नर्मदेच्या तीरावरील ओंकार अमलेश्वर, परळी येथील वैजयनाथ, पुण्याजवळील भीमाशंकर, दक्षिणेत सेतुबंधाजवळ रामेश्वर, हिंगोली जिल्हातील औंढा नागनाथ, काशी विश्वेश्वर, नासिकमधील त्र्यंबकेश्वर, हिमालयातील केदारनाथ आणि औरंगाबाद वेरूळ येथील घृष्णेश्वर या बारा ज्योतिर्लिंगांचे वर्णन उपरोक्त श्लोकात आले आहे, परंतु पाठभेदांमुळे यातील काही स्थळांची निश्चिती करताना अडचणी उद्भवतात.

    दारूकावन की द्वारकावन

    ज्योतिर्लिंगांच्या वर्णनामध्ये भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेता पाठभेद झालेले दिसतात. औंढा नागनाथ मंदिराबाबत सांगायचे झाले तर गुजरात येथील पाठानुसार नागेशं द्वारकावने असा उल्लेख येतो. त्यामुळे गुजरातमधील द्वारका येथील नागेश्वर शिवालय हे ज्योतिर्लिंग मानतात. द्वारका आणि दारूका यांमध्ये जरी पाठभेद निर्माण झाला असला, तरी सामान्यतः द्वारका ही श्रीकृष्णाची नगरी म्हणून सर्वश्रुत आहे. पुराणकथांच्या आधारे हे निश्चित करता येते की, दारूका हे एका राक्षसीचे नावं होते, जिला पार्वतीच्या कृपाशीर्वादाने या वनाचे राज्ञीपद प्राप्त झाले होते. दारूका राक्षसीमुळे या वनाला दारूकावन हे नावं प्राप्त झाले. शिव पुराणातील कथेनुसार दारूका आणि तिचा पती दारूक, हे या वनात तपस्येसाठी येणाऱ्या ऋषीजनांना नेहमी त्रास देत असत. भक्तांच्या रक्षणासाठी शिव आणि शिवा म्हणजे पार्वती या स्थानी विराजमान झाले, ते हे नागेश्वर स्थान. अभ्यासकांच्या मते हे औंढा या क्षेत्री आहे.

    नागनाथ शिवालय

    पश्चिमाभिमुख शिवालय 7200 sq.feet अश्या एका विस्तीर्ण आवारात असून त्याभोवती एक मोठा कोट आहे. या तटबंदीला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. ही शिल्पसमृद्ध वास्तू माझ्यासमोर तत्कालीन संस्कृतीचे प्रतिबिंब आणि सोबत अनेक प्रश्न घेऊन उभी राहिली. भौतिक पुरावाच्या रूपाने आपल्या गत संस्कृतीचा एक धागा मला मिळाला. या घडामोडींना पुन्हा एकत्रित गुंफण्याचा माझा प्रयास सुरु आहे.

    Aundha Nagnath Temple

    मंदिराची संरचना गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप आणि तीन द्वारे अशी आहे. मंदिराच्या भोवतीने आसलेल्या तटबंदीच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून आपण आत प्रवेश करताना मुख्य मंदिराच्या सुमारे 60 फूट उंच भव्य वास्तूचे दर्शन प्रथम होते. मंदिराच्या समोर नदीमंडप आहे, परंतु त्याचे बांधकाम नंतरच्या काळातील असावे. मंदिरात जातानाच बाह्य भिंतीवरील शिल्पवैभव आपल्या नजर खिळवून ठेवते. मंदिरात प्रवेश केल्यावर आपण मुखमंडप, सभामंडप, अंतराळ ओलांडून गर्भगृहात प्रवेश करतो, परंतु येथील गर्भगृहाची संरचना वेगळी आहे. प्रत्यक्ष वरील गर्भगृहात विष्णूच्या केशव रूपातील मूर्तीचे दर्शन होते. नागनाथ मंदिराच्या गर्भगृहाला खाली म्हणजे तळाकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून तळ-गाभाऱ्यात नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. याला पातळलिंग असे म्हणतात. या गाभाऱ्याची उंची अतिशय कमी आहे म्हणजे सरळ उभे राहणे अशक्य आहे. नागनाथाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात आपण येतो. असे म्हणतात मंदिराचे शिखर पूर्णतः उध्वस्त झाले होते, जे अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा बांधून या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराचे शिखर नंतरच्या काळातील आहे. मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यात एक मठ बांधलेला आहे, जिथे काही संन्यास्यांचे वास्तव्य असते. हा मठ एका उंच चौथरावर पश्चिमबाजूपासून आग्नेय कोपऱ्यातील नागतीर्थापर्येंत बांधला आहे. आवारातच एक पायविहीर आहे त्यास ऋणमोचन तीर्थ किंवा सासू-सुनेची बारव किंवा नागतीर्थ असेही म्हणतात. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव असल्याने त्यांची समाधी या परिसरातच आहे. या मंदिराच्या पूर्वेला तटबंदीबाहेर एक पाण्याचे विस्तृत तळे आहे. या तळ्याला हरिहरतीर्थ या नावाने ओळखतात, कदाचित या तळ्यात विष्णूची मूर्ती सापडल्यापासून त्याला असे नामकरण झाले असावे.

    याशिवाय नागनाथ शिवालयाचे शिल्पवैभव हे खरोखरीच एक अद्वितीय सौंदर्याची साक्ष देणारे आहे. भैरव, तांडवनृत्य करणारा शिव, पार्वती आणि शिव यांचे कल्याणसुंदर शिल्प, महिषासुरमर्दिनी, अंधकासुरवध, गजासुरवध, रावणानुग्रह, पंचमुखी शिव, चामुंडा, अष्टदिक्पाल, गणेश यांशिवाय साधक, योगी यांचीही सुरेख शिल्पांकने इथे बघायला मिळतात.  या मंदिरात शिलालेख उपलब्ध न झाल्याने या मंदिराचा निश्चित काळ, दानकर्ता किंवा मंदिराच्या इतर तपशिलांचा अभाव असला तरी मंदिराची संरचना आणि याचे शिल्पवैभव या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देतात. जगन्नाथपुरी येथे ज्याप्रमाणे देवाची रथयात्रा असते, त्याप्रमाणे औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीला नागनाथाची यात्रा असते. सुशोभित रथातून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. ही रथयात्रा भाविकांसाठी आजही खास आकर्षण आहे, त्यामुळे महाशिवरात्रीच्या पावन पर्वात भाविकांची अलोट गर्दी येथे अनुभवता येते.