Year: 2021

  • स्वाध्याय सुधा सूत्र 10 महानन्दस्वरूप दक्षिणामूर्ती

    स्वाध्याय सुधा सूत्र 10 महानन्दस्वरूप दक्षिणामूर्ती

    भगवान शिव म्हणजे परमतत्त्व. या परमशिवाचे तत्त्वरूप अत्यंत व्यापक आणि कल्याणकारी आहे. शिवस्वरूप म्हणजे खरतरं निष्कलं निष्क्रियं शान्तं निरवद्यं निरञ्जनम् असे आहे. शिव तत्त्वाचा अर्थबोध शब्दांच्या परीघा पलीकडे जाऊन चित्ताला तुष्टी देणारा आहे.

    भगवान शिवाला शिवो गुरुः शिवो वेदः शिवो देयः शिवः प्रभुः म्हणताना, प्रथम गुरु म्हणून संबोधले आहे. सर्व शास्त्र, विज्ञान, विद्या आणि कला यांचा विस्तार हा शिवाने केला आहे. त्यामुळे योगीजन, आचार्य आणि कलासाधक या सर्वांनाच शिवाचे हे गुरुस्वरूप परम वंदनीय आहे. याच आदिगुरु भगवान शिवाचे साकार स्वरूप म्हणजेच महानन्दस्वरूप दक्षिणामूर्ती

    आज गुरुपौर्णिमा, गुरुस्वरूप दक्षिणामूर्तीचे मूर्तीशास्त्रामधून उलगडणारे प्रतिमा स्वरूप आणि चिंतन परंपरेतील महानन्दस्वरूप तत्त्वरूप, मी यथाशक्ती यथामती शब्दबद्ध करीत आहे. आजच्या स्वाध्याय सुधाचे हे दहावे सूत्र महानन्दस्वरूप दक्षिणामूर्ती मी माझ्या गुरूंना सविनय अर्पण करीत आहे.

    मूर्तीस्वरूप दक्षिणामूर्ती

    गुरुरूप हे या दक्षिणामूर्ती स्वरूपाचे सत्वरूप आहे, असे मला वाटते. सर्व शास्त्र, कला, तत्त्व यांचे ज्ञान प्रदान करणारा हा विग्रह आहे. दक्षिणामूर्तीच्या साकार स्वरूपातील विविध प्रतिमा, या अनेक देवालयांमध्ये आपल्याला बघायला मिळतात.

    वास्तूशास्त्र, शिल्पशास्त्र आदि ग्रंथ, आगमशास्त्र हे दक्षिणामूर्ती स्वरूप जाणून घेण्यास सहाय्यक ठरतात. मूर्तिशास्त्रामध्ये सामान्यतः व्याख्यान, ज्ञान, वीणाधार आणि योग दक्षिणामूर्ती अश्या चार दिव्य रूपांमधील विग्रह अभिव्यक्त होताना दिसतात. 

    दक्षिणामूर्ती प्रतिमा या मुख्यत्वे आसनस्थ स्थितीत दक्षिणाभिमुख स्वरुपाच्या असतात. क्वचित समपाद स्थानक म्हणजे उभ्या स्थितीतील दक्षिणामूर्तीही मंदिरांच्या गोपुरांवर दिसतात. वटवृक्षाखाली आसनस्थ दक्षिणामूर्ती ही सुखासनामध्ये किंवा विरासनामध्ये आसनस्थ अशी असते. शिवाचा एक पाय अपस्मार पुरुषाच्या पाठीवर स्थिरावलेला असतो.

    दक्षिणामूर्तीचा शिरोभाग हा जटामुकुट, जटाभार किंवा जटामंडलयुक्त असतो. हा जटाभार सर्प, धोत्र्याचे फुल आणि द्वितीयेची चंद्रकला यांनी सुशोभित असतो. त्रिनेत्र दक्षिणामूर्ती चतुर्भुज असून तिच्या विग्रहानुसार हातांमधील लांछने बदलतात. हातामधील लांछनांचा क्रम आणि प्रकार हा अनेकदा शैलीवरही अवलंबून असतो. प्रतिमांप्रमाणेच वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये हा फरक दिसतो.

    दक्षिणामूर्ती शिवाची कांती स्फटिकाप्रमाणे नितळ आणि तेजस्वी असते. त्याच्या चर्येवर सौम्य, आनंदयुक्त आणि सात्विक भाव असतो.

    पंचमुद्रा समोपेता म्हणजे पाच अलंकारयुक्त असावा. या पाच मुद्रा म्हणजे मस्तकावर शिखामणी, गळ्यात रुद्राक्षाची कंठामाळ, कानामध्ये कुंडले, हातामध्ये आणि दंडामध्ये रूचक आणि ह्रन्माला किंवा मेखला. दक्षिणामूर्ती व्याघ्रचर्म परिधान केलेली असते याशिवाय सितवस्त्रोत्तरीयं च सितयज्ञोपवीतिनम् म्हणजे शुक्ल उत्तरीय आणि शुक्ल यज्ञोपवीत धारण केलेली असते.

    दक्षिणामूर्ती ही ज्ञानदक्षिणा देणारे  स्वरूप असल्याने, शिवाच्या पायाशी वेदवेदांग पारंगत महर्षी, मुनी हे शिष्य बनून ज्ञान ग्रहण करण्यासाठी बसलेले दर्शवतात. शिवाचे वाहन नंदी, हाही हे ज्ञान ग्रहण करण्यास बसलेला दाखवतात.

    हे दिव्यज्ञान समस्त विश्वातील चराचरांना मुक्तीप्रदान करणारे असल्याने पशु – पक्षी, वनचर हे दक्षिणामूर्तीला शरण आलेले दाखवतात. याशिवाय दक्षिणामूर्तीच्या विविध मूर्ती विग्रहामध्ये काही सूक्ष्म भेदही आहेत, ते क्रमशः पाहू.

    शिवाच्या या मूर्तींना दक्षिणामूर्ती म्हणण्याचे प्रयोजन काय ? अश्या विग्रहांमधून व्यक्त होणारा सूक्ष्म अर्थ काय ? अश्या विविध बिंदूंचे विश्लेषण दक्षिणामूर्तीचे तत्त्वरूप पाहताना होईलच. तत्त्पुर्वी मूर्तीस्वरूपातील विविध दक्षिणामूर्ती विग्रह जाणून घेऊया.

    कामिकागम ग्रथांमध्ये दक्षिणामूर्ती विग्रहाचे तीन प्रकार सांगितले आहेत, ते पुढीलप्रमाणे – 

    व्याख्यानगेय योगेषु निष्ठस्य त्रिविधस्य च

    म्हणजे व्याख्यान, गेय आणि योग दक्षिणामूर्ती, या तीन प्रकारच्या दक्षिणामूर्तींचा उल्लेख इथे येतो. तरीही व्याख्यान, ज्ञान, वीणाधार आणि योग या सर्वच दक्षिणामूर्ती आजच्या सूत्रामध्ये जाणून घेणार आहोत. 

    व्याख्यान दक्षिणामूर्ती

    अनेकविध शास्त्रांचे कर्तृत्व हे शिवाचे मानले जाते, त्यामुळे त्या शास्त्रांचे ज्ञान, व्याखानरूपाने दक्षिणामूर्ती शिव प्रदान करत असतो.  

    धर्मव्याखानमूर्तिः स्यादेवं सर्वशुभावहम्।

    शुभता प्रदान करणारी ही व्याखान दक्षिणामूर्ती ही चतुर्भुज असते. उजव्या हाताची व्याख्यान मुद्रा असते म्हणजेच अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जुळवून हाताचा पंजा श्रोत्यांकडे केलेला असतो. याशिवाय उर्वरित हातांमध्ये अक्षमाला, दण्ड आणि वरद मुद्रा असते.

    ही धर्मव्याखानदक्षिणामूर्ती म्हटली आहे, त्यामुळे अश्या व्याखान दक्षिणामूर्तींच्या हातामध्ये पोथी किंवा ग्रंथही दाखवले जातात.

    ज्ञानदक्षिणामूर्ती

    व्याखान दक्षिणामूर्ती प्रमाणेच ज्ञानदक्षिणामूर्ती विग्रह असतो. या विग्रहामध्ये दक्षिणामूर्तीचा एक हात हा ज्ञानमुद्रेमध्ये, हृदय स्थानाजवळ धरलेला असतो. व्याख्यान आणि ज्ञान या दोनही विग्रहातून अभिप्रेत आशय हा समत्वाने अभिव्यक्त होतो.  त्यामुळे काही ग्रंथांमध्ये या दोन विग्रहांना स्वतंत्र न मानता व्याख्यान दक्षिणामूर्ती या स्वरुपातच साकार केलेले दिसते.

    वीणाधार दक्षिणामूर्ती

    वीणावादनतत्त्वज्ञः श्रुती जातिविशारदः।

    याज्ञवल्क्यस्मृती मधील शिवस्तुतीमध्ये, शिवाला वीणावादन तत्त्वज्ञ म्हटले आहे. याशिवाय संगीतामध्ये असणाऱ्या 22 श्रुती आणि 18 स्वरजाति यांमध्ये शिव विशारद असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे स्वरांचा स्वामी म्हणून वीणाधर दक्षिणामूर्तीचे स्वरूप संगीत उपासकांसाठी पूजनीय आहे.

    वीणाधार दक्षिणामूर्तीलाच आगमशास्त्र गेय दक्षिणामूर्ती असे म्हणते. गेय म्हणजे संगीत. ‘संगीत’ या संज्ञेचा संगीत रत्नाकरमध्ये गीतं वाद्यं तथा नृत्तं त्रयं संगीतमुच्यते असा अर्थ प्रस्तुत होतो.

    वीणाधार दक्षिणामूर्ती आसनस्थ आणि समापद स्थानक या दोनही स्थितींमध्ये दिसते. पुढील दोन हातांमध्ये वीणा किंवा एका हातामध्ये वीणा आणि दुसऱ्या हातामध्ये ज्ञानमुद्रा असते. आणि मागच्या दोन हातांमध्ये अक्षमाला आणि उत्पल असते. वीणाधार दक्षिणामूर्ती जवळ महर्षी शुक, नारद, तुंबरू आदि ऋषिगण बसलेले असतात. विद्याधर, किन्नर युगुले ही या वीणाधार मूर्तीच्या ज्ञानदक्षिणेने अनुग्रहित होत असतात.

    योगदक्षिणामूर्ती

    शिवपुराणामधून येणारा शिवाचा योगाचार्य अवतार सर्वश्रुत आहेच. आद्य योगगुरु म्हणून शिवाचे योगदक्षिणा स्वरूप हे योगाचार्य, मुनिजन आणि साधक या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. योगिनामुपाकाराय स्वेच्छया गृह्यते तनूम् म्हणजे योगीजनांना उद्धारासाठी शिव स्वयं इच्छेने शरीर धारण करतो, अशीच ही योगदक्षिणामूर्ती आहे.

    योगदक्षिणा मूर्ती या योगपट्ट धारण केलेल्या असतात. या विग्रहामध्ये शिवाच्या आसनस्थ स्थितींमध्ये वामउत्कुटिकासन किंवा वज्रपर्यंकसान मूर्ती दिसतात. योगस्थ मूर्ती असल्याने डोळे नासिकाग्रावर स्थिरावलेले असतात. ध्यानमग्न, समाधिस्थ अशी योग दक्षिणामूर्ती साकारलेली असते. शिवाचे दोन हात त्याच्या जानुवर टेकवलेले असतात आणि मागच्या दोन हातांमध्ये सर्प आणि अग्नी धारण केलेले असते. क्वचित एका हाताची ज्ञानमुद्रही दिसते.

    शिल्पांमधून अभिव्यक्त होणारे स्वरूप हे एखाद्या विग्रहाच्या केवळ बाह्यरूपाशी ओळख करून देत असते. परंतु दक्षिणामूर्ती सारख्या काही विशेष मूर्ती या तत्त्वज्ञानाच्या अमृताने परिपूर्ण असतात. या साकार स्वरूपाच्या अंतरंगातील, हा ज्ञान मकरंद हृदयामध्ये नवोन्मेष निर्माण करतो. ज्या प्रतिमेची केवळ ओळख होती, त्यापेक्षाही त्या मूर्तीचे सत्त्व हाती लागल्याचा आनंद निश्चित होतो.

    अंततः महानन्दस्वरूप दक्षिणामूर्तीचे यथार्थ स्वरूप, त्याच्या तत्त्वरूपावरून लक्षात येण्यास सुरुवात होते.

    तत्त्वस्वरूप दक्षिणामूर्ती

    दक्षिणामूर्तीच्या तत्त्वरूपातून त्याच्या सत्य स्वरूपाचा बोध होतो. या स्वरूपातील शिवाच्या एक एक तत्त्वाचा अर्थ जोपर्यंत आपण जाणून घेत नाही, तोपर्यंत त्याचा गर्भितार्थ आपल्या मनामध्ये झिरपणार नाही. हे तत्त्वरूप अत्यंत सूक्ष्म अश्या स्वरूपामध्ये प्रकट होत जाते. ते जितके जाणून घ्यावे, तितके ते अधिक व्यापक होते.

    दक्षिणामूर्ती म्हणजे साक्षात, विशुद्ध बोधरूपी ब्रह्मज्ञानाचा अंकुर आहे. शरण आलेल्या समर्पित साधकाच्या हृदयामध्ये हा ज्ञानांकुर प्रस्फुटित करणारे हे शिवस्वरूप आहे.

    दक्षिणामुर्तीचे ज्ञेयस्वरूपच हे मुळात स्वात्मानन्द सुखाने चित्ताला विशुद्ध करून, प्रबोध शलाकेने आत्म्याला प्रकाशमान करणारे आहे. 

    यन्मौनव्याख्यया मौनपटलं क्षणमात्रत:।
    महामौनपदं याति स हि में परमागति:।।

    दक्षिणामूर्त्युपनिषत् शिवाचे गुरुस्वरूप परमतत्त्व इथे व्यक्त करते आहे. मौन व्याख्यानाने शिष्यांचे चित्त क्षणार्धामध्ये संशयरहित करून, शिव मोक्ष प्रदान करतो. दक्षिणामूर्ती हे महामौनपद प्रदान करणारे तत्त्व आहे. हा मौनाने साध्य होणारा गुरुशिष्य संवाद आहे.

    मौनाची महत्ता सर्वश्रुत आहेच. पण मौनाने चित्तप्रसाधनाचा क्षय होऊन ब्रह्मतत्त्वावर चित्त अधिक दृढ होते. ब्रह्मतत्त्वाचे ग्रहण हे सूक्ष्म पातळीवर करण्यासाठी मन हे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे सर्वप्रथम योग सहाय्याने शरीराला मनाशी आणि मनाला आत्म्याशी जोडणे आवश्यक आहे. तेव्हाच ब्रह्मचैतन्याची जाणीव, साधकाला केवलत्त्व प्राप्त करून देऊ शकते.

    या मौनव्याख्यानातून दक्षिणामूर्ती, शब्दब्रह्म आणि नादब्रह्माचे साक्षात स्वरूप प्रकट करीत आहे. ज्ञानदीप्तीच्या तेजाने मोहाचा अंधःकार नाहीसा करणारे हे स्वरूप आहे.

    शेमुषी दक्षिणा प्रोक्ता म्हणजे तत्त्वज्ञानरुपी ब्रह्मज्ञानाची ‘दक्षिणा‘ प्रदान करणारे हे शिवस्वरूप असल्याने, अश्या प्रकारच्या विग्रहास ‘दक्षिणामूर्ती’ ही संज्ञा दिली आहे.

    सूतसंहिता, दक्षिणाभिमुख शिवाच्या पंचब्रह्म स्वरूपाचा उल्लेख करते. पंचब्रह्म स्वरूपातील अघोर मुख हे दक्षिणमुखी असते. अघोर म्हणजे जो घोर नाही असा, जो या संसार भवसागरातून बाहेर काढून मुक्ती प्रदान करतो.

    त्यामुळेच योगीजन, महर्षी, ऋषी यांना आत्मज्ञानाच्या साक्षात्काराने जीवनमुक्ती, विदेहमुक्ती आणि अंततः कैवल्यमुक्ती प्रदान करणारा हा विग्रह ‘महानन्दस्वरूप ‘असा वाटतो. कामिकागम अश्या प्रतिमांचे प्रयोजनही सांगते, ते असे-

    व्याख्यायुक् ज्ञानदः प्रोक्तो गेययुक् भुक्तिदो मतः
    सयोगो मुक्तिदो ज्ञेय इति ज्ञात्वा समाचरेत्

    म्हणजेच याचा अर्थ असा होतो, व्याख्यान दक्षिणामूर्ती ही ज्ञानप्रदान करते, गेय दक्षिणामूर्ती भोग आणि योग दक्षिणामूर्ती मोक्ष प्रदान करणारी आहे. म्हणूनच शिवाच्या दक्षिणामूर्ती या गुरुस्वरुपाला भवन्तोऽपि महादेवं महानन्दस्वरूपिणम् असे म्हटले आहे.

    – आषाढ शु.14 शके 1943, गुरुपौर्णिमा (23 जुलै 2021, शुक्रवार).

  • स्वाध्याय सुधा सूत्र 9 कलादेवी नमस्तुभ्यं – रूपभेद

    स्वाध्याय सुधा सूत्र 9 कलादेवी नमस्तुभ्यं – रूपभेद

    कला म्हणजे काय? कला म्हणजे माणसाच्या सृजनशील आत्मचैतन्याला दिलेली यथार्थाची साद आहे.
    – गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

    सृजनशील आत्मचैतन्याला दिलेली यथार्थाची साद हे भारतीय कलेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल. यथार्थ दर्शनाचे अनुकरण हा भाग भारतीय चिंतनामध्ये अभिप्रेत नाही. भारतीय दर्शन परंपरा असो वा कला परंपरा आत्मचैतन्य जाणण्याची ही प्रक्रिया सर्वत्र समांतर चालते. आत्मतत्त्व जाणण्याचे आणि ते अभिव्यक्त करण्याचे मार्ग भिन्न असले, तरी अंतिम ध्येय हे मोक्षसाधन आहे. कलेमध्ये चैतन्य स्वरूप जाणून कलाकार थांबत नाही तर जाणलेले ‘ब्रह्म’ हे सरूप साकार करतो. त्यामुळेच भारतीय परंपरेमध्ये कला आणि चैतन्याचे सौंदर्यस्वरूप यांचे साहचर्य प्रत्येक पावलोपावली दिसते. 

    भारतीय कलेचे अलौकिक स्वरूप, कलेतील तीन महत्त्वपूर्ण घटक आणि कलेची व्याप्ती जाणून घेण्यासाठी स्वाध्याय सुधा सूत्र 8 – कलादेवी नमस्तुभ्यं हे पूर्वसूत्र अवश्य वाचा – 

    कलाकार त्याच्या मर्मदृष्टीने विविध माध्यमांचा आधार घेऊन, कलेची अभिव्यक्ती ही एखाद्या तत्त्वबोध निर्मितीतून व्यक्त करतो. पण या अभिव्यक्तीमधील चारुता साधण्याकडेही कलाकार तितक्याच विचक्षण वृत्तीने लक्ष पुरवतो. कोणतीही कलाकृती निर्मित करताना काही मुलभूत सिद्धांत हे नजरेसमोर ठेऊनच कलाकृती ही सिद्ध होत असते. चित्र किंवा शिल्प या कला सिद्ध होतानाही अश्याच काही प्रक्रियांचा अंतर्भाव रसिकांसमोर नितांत रमणीय असे काही निर्मित करण्यासाठी होत असतो. 

    वात्सायनाचे कामसूत्र या ग्रंथामध्ये चौसष्ठ कलांचा उल्लेख येतो, त्यापैकी एक म्हणजे आलेख्य किंवा चित्रकर्म. याच कामसूत्र ग्रंथावर यशोधर पंडित याने जयमंगला नावाचे भाष्य लिहिले आहे, ज्यामध्ये चित्रकलेची सहा मुलभूत अंगे सांगितली आहेत, ती अशी –  

    रूपभेदः प्रमाणानि भावलावण्ययोजनम।
    सादृश्यं वर्णिकाभंग इति चित्रं षडंगकम्।।

    चित्रकर्माची सहा अंगे म्हणजे रुपभेद, प्रमाण, भाव, लावण्य, सादृश्य आणि वर्णिकाभंग. ही षडांगे आणि त्यांचा क्रमही चिंतनीय आहे. रुपभेद, प्रमाण, भाव, लावण्य, सादृश्य आणि वर्णिकाभंग ही षडांगे एकमेकांच्या संयोगातून अधिक बहरत जातात. 

    चित्रकर्माच्या षडांगांमध्ये प्रथमस्थानी आहे रुपभेद हे अंग. रूप या शब्दाचा विचार केला तर या शब्दाला जेव्हा कृ किंवा भू धातु लागतो तेव्हा त्याचा अर्थ होतो आकार किंवा आकृती (Form). वैजयन्ती कोष रूप या शब्दाला परिभाषित करताना मात्र अधिक सखोल अर्थ समोर प्रस्तुत करतो. 

    रूपं तत्त्वं सतत्त्वं च स्वरूपं च सलक्षणम्

    याचा अर्थ असा की, रूपं म्हणजे रचना, तत्त्वं म्हणजे वास्तविक स्वरूप, सतत्त्वं म्हणजे सत्य स्वरूप, स्वरूपं म्हणजे प्राकृतिक आकार, सलक्षण म्हणजे साधर्म्य. 

    रूप या शब्दाचे हे प्रतिशब्द अधिक अर्थगर्भित आहेत. भारतीय कला परंपरेत या सर्वांचा कलेच्यादृष्टीने यथोचित वापर झालेला दिसतो. या आकारांमधील भेद किंवा वैविध्य हे कलाकृतीला एक रूप प्रदान करते. कलेच्या निर्मितीमध्ये रचना, तत्त्वरूप, सत्यरूप, प्रकृतिकरूप आणि साधर्म्य यांचा समतोल राखून कलाकार त्यांच्या अव्यक्त कल्पनांचे प्रकटीकरण करीत असतो.  

    रूप हा नेत्र या इंद्रियाचा विषय आहे. कलेमध्ये दोन चक्षु महत्त्वपूर्ण मानले आहेत. एक स्थूल रूपाने मानवी इंद्रियाचा भाग असणारा नेत्र, आणि दुसरा म्हणजे अंतःचक्षु. स्थूल आणि सूक्ष्म या दोनही पातळींवर ‘रूप’ ग्रहण करण्याचे सामर्थ्य मनुष्याला या दोन नेत्रांच्याद्वारा लाभते. बाह्यआकार आणि त्यातील लावण्य ग्रहण करण्यासाठी स्थूल नेत्र महत्त्वाचे आहेत, परंतु  मर्मदृष्टीच्या सहाय्याने अभ्यंतर गुणग्रहणाने अंतरिक सौंदर्य, अनुपमता, माधुर्य, तत्त्वरूप ग्रहण करता येते. 

    दृष्टी हे तत्त्वतः देवी सरस्वतीचे एक स्वरूप आहे. दृष्टी म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी स्वाध्याय सुधा सूत्र 4. – श्रुती आणि दृष्टी अवश्य वाचा –

    कलाकार आणि रसिकही या रूपभेदाचे ग्रहण स्थूल आणि सूक्ष्म या दोनही पातळीवर करीत असतात, फक्त त्यांच्या ग्रहण करण्याचा प्रवाह हा विरुद्ध असतो. रूपाचे म्हणजेच रचनेचे किंवा आकाराचे प्रथमदर्शनी होणारे ग्रहण, हे खूप काळ मनःपटलावर त्याची छवी सोडून जाते. म्हणूनच रूप या तत्त्वाची परिणामकारकता ही चक्षु इंद्रियांच्या सहाय्याने तत्क्षणी होते आणि स्मृतीमध्ये दीर्घकाळ राहते. त्यामुळे रूपाचा विचार भारतीय कलासाधक अग्रक्रमाने करतात. 

    कलेमध्ये या रुपभिव्याक्तीमधील भेदांचा विचार तितकाच मौलिक आहे. रूप हा ‘प्रकृती विशेष’ प्रामुख्याने अधोरेखित करणारा हा घटक आहे. वास्तुसूत्र उपनिषद या मताला अधिक पुष्टी देते.

    यथा प्रकृतिस्तथा रूपलक्षणम्

    जशी प्रकृती तसे रूप. आणि प्रकृती म्हणजे स्वतःचा मुलभूत आकार किंवा सत्य, नैसर्गिक रचना. 

    कला निर्मिती प्रक्रियेमध्ये कलाकाराच्या पातळीवर दोन क्रिया प्रामुख्याने घडतात, एक म्हणजे ग्रहण आणि दुसरी अभिव्यक्ती. भारतीय कलाकारांनी ग्रहण या पातळीवर निसर्गाला आपले प्रेरणास्थान मानले. चित्रकार काय किंवा शिल्पकार काय या कलाकारांच्या ठायी रसिक हृदय असावेच लागते. निसर्गातून अभिव्यक्त होणारे साकार रूप कलाकार हळुवार टिपून घेतो. हे निसर्ग प्रेरणेतून टिपलेले सौंदर्य, त्याच्या कलाकृतीमध्ये तो अलगद उतरवत असतो. 

    निसर्गाचे हे सौंदर्य आणि त्यातील विविध घटक हे कुठे आणि कसे वापरायचे, याचे कलाकाराला यथायोग्य ज्ञान असते. निसर्गातील योग्य आणि सुरूप रचनांची मांडणी कलाकार त्यांच्या स्वयंकौशल्याने अधिक समर्पक करतो. कलाकार त्याच्या मनोवृत्तीशी त्याने ग्रहण केलेले दृश्य एकरूप करून कलात्मक सृजन करतो. त्यामुळेच एकाच विषयावरील अनेकविध चित्रे वा शिल्पे ही भिन्न स्वरूपात अभिव्यक्त केलेली दिसतात. याचाच दुसरा भाग असा की कलाकरही त्याच्या कौशल्याच्या, तंत्रांच्या आणि आत्मचिंतनाच्या पातळीवर, जसजसा प्रगल्भ होत जातो तसतसे त्याच्या अभिव्यक्तीमधून नैपुण्य अधिक झिरपत जाते. 

    रुपभेद म्हणताना भारतीय परंपरेमध्ये रेखा (Line),  वर्त्तना (Application), रंग आणि छटा (Color) आणि अलंकरण (Ornamentation) या विविध तत्त्वांचा विचार केला गेला आहे. कला हा सदरीकारणाचा विषय असल्याने रसिकांच्या दृष्टीने कलाकृती कशी स्वीकृत केले जाते, हे पुढील चित्रसूत्र सांगते.

    रेखां प्रशंसन्त्यार्चा वर्तनां च विचक्षणाः
    स्त्रियो भूषणमिच्छन्ति वर्णाढ्यामित्तरे जनाः

    आचार्य लोकांसाठी रेखा, चाणाक्ष रसिकांसाठी वर्त्तना, स्त्रियांसाठी अलंकरण तर इतर सर्व लोकांसाठी वर्ण हा त्या कलाकृतीमधील प्रशंसेचा विषय ठरतो. 

    चित्ररूपाचे सौष्ठव हे रेखा, वर्त्तना, रंग-छटा आणि अलंकरण या विविध तत्त्वांमधून साकार होत असते. चित्रकला आणि शिल्पकला यांची माध्यमे भिन्न असली असली तरी ‘रुपभेद’ साकारण्यासाठी दोनही कलांनी ‘रेखा’ या तत्त्वाला विशेष महत्त्व दिलेले आहे, असे मला वाटते. शिल्पकलेमध्ये मूर्तीकाराला स्थापक म्हटले आहे, परंतु ज्या स्थापकाला रेखाज्ञान सर्वार्थाने अवगत असेल त्यास ‘स्थापकोद्गीथ’ असा लौकिक प्राप्त करेल, असे विधान सांगितले आहे. म्हणजेच रेखाज्ञान हे रुप निर्मितीमधील प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाचे असे तत्त्व मानले आहे. या रेखाज्ञानाने चित्रामध्ये, किंवा शिल्पामध्ये रुपभेद निर्माण करताना लयबद्धता, संवेग, चंचलता, तेजस्वितता, निर्मळता अश्या अनेक भावरचना कलाकाराला साधणे शक्य होते. 

    याच रूपभेदासाठी आवश्यक म्हणजे कलेचे दुसरे महत्त्वाचे अंग, प्रमाण. या प्रमाणाच्या सहाय्याने रूपामध्ये होणारे परिवर्तन आणि त्यातून निर्माण होणारे वैविध्य, हे कसे सध्या होते याच आढावा कलादेवी नमस्तुभ्यं या लेखाच्या पुढील भागाद्वारा घेऊया. 

    क्रमशः

    – आषाढ शु.7 शके 1943, शुक्रवार (16 जुलै 2021).

  • स्वाध्याय सुधा सूत्र 8 कलादेवी नमस्तुभ्यं

    स्वाध्याय सुधा सूत्र 8 कलादेवी नमस्तुभ्यं

    ‘कला’ या शब्दाची व्याप्ती अपार आहे. कलेसारखी दिव्य शक्ती माणसाच्या जीवनाला सौंदर्य, उल्हास, लालित्य, प्रतिभेने संपन्न करते. कलेच्या दिव्यत्वाची प्रचिती जिथे येते, तिथे कलात्मक नवसृजन दिसतेच. कला म्हणजे नित्य साधना आणि नित्य चिंतन यांतून प्रगल्भ होत जाणाऱ्या अनुभूतीचा विषय आहे. त्यामुळे कलासाधनेत कोणतेच हमरस्ते उपयोगी पडत नाहीत.

    कोणत्याही कलाकृतीचे सृजन होताना अनेकविध क्रिया या कार्यरत असतात, त्याचा वेध सहसा आपण घेत नाही. काही वर्षांपूर्वी मीही एक कलासाधक म्हणून, कलेच्या मुलभूत तत्त्वांना जाणण्याच्या जिज्ञासेने पाश्चात्य कलेचा इतिहास अभ्यासात होते. परंतु भारतीय कलेची परंपरा समजून घेण्यासाठी मात्र भारतीय विद्येनी मला ती दृष्टी दिली. भारतीय विद्या शाखेतील मूर्तिशास्त्र अभ्यासताना मला या विविध क्रिया-प्रक्रिया समजून घेता आल्या. कलाकाराच्या मनाचा वेध घेऊन, त्याने कलाकृतीमधून अभिव्यक्त केलेले व्यक्त आणि अव्यक्त अर्थ, शिल्पाच्या किंवा चित्राच्या माध्यमातून समजून घ्यावे लागतात, तेव्हा त्या कलाकृतीतील ‘रम्य‘ आकलनास अधिक सुगम होते.

    मला कलेचे स्वरूप जाणून घेताना, भारतीय दृष्टीकोन हा अधिक अथांग आणि सखोल वाटतो. भारतीय कलेत काही तांत्रिक उणीवा असण्याची शक्यता आहे, पण प्रक्रिया समजून घेताना त्यामागील तत्त्वज्ञान अधिक अर्थबोध निमार्ण करणारे ठरते. भारतीय कलेच्या अभिव्यक्तीच्या सीमारेषा या केवळ अनुकरणाच्या कुंपणामध्ये बंदिस्त झाल्या नाहीत. मानवी भावभावनांच्या द्वारांनी कलात्मक अभिव्यक्ती ही थेट अंतरंगात उतरते.

    याचे प्रत्यक्ष उदाहरण द्यायचे झाले तर, अजिंठ्यासारख्या लेण्यांमधील चित्रे ही आज जरी जीर्ण असली, तरी त्यातील प्रकट होणाऱ्या मनोभावांशी रसिकाला आजही समरसता साधता येते. असंख्य शिल्पवैभवाने भारताचा कानाकोपरा वेढलेला आहे. या एकसंध शिल्पांमधून किंवा काही भग्न शिल्पावशेषांमधून आजही विस्मय निर्माण होतो. हे भावरसयुक्त कलेच्या सादरीकरणने भारतीय कलाकारांनी साधले आहे.

    जगभरातील अनेक विद्वान कलाकार, कला समीक्षक, तत्त्ववेत्ते यांनी अनेक पद्धतीने, अनेक अंगाने विचार करून कला आणि त्याची मूळतत्त्वे कायमच समोर ठेवली आहेत. कलेचे स्वरूप, तीची अभिव्यक्ती, कलेतील तत्त्वज्ञान यांवर एकमत होणे शक्य नाही आणि एकार्थी ते योग्यही नाही. विविध दृष्टीकोन, वैचारिक जडणघडण, बौद्धिक क्षमता अश्या अनेक घटकांवर कलेचे मूल्यमापन कलामीमांसक करतात, त्यामुळे त्यामध्ये एकवाक्यता दिसत नाही. परंतु आज भारतीय कलेला, भारतीय दृष्टीकोनातून समजून घेऊन प्राचीन भारतीय कलाकारांनी, तत्त्ववेत्यांनी साकारलेले, स्मरलेले कलेचे नेमके स्वरूप काय असेल, याचा वेध ‘कलादेवी नमस्तुभ्यं‘ या आजच्या सूत्राद्वारे मांडण्याचा एक प्रयास करते आहे. 

    कलानां प्रवरं चित्रम् धर्मार्थ काम मोक्षादं।

    विष्णूधर्मोत्तर पुराणांतर्गत उद्भृत आलेख्य कर्माचे महत्त्व इथे सांगितले आहे. कलांमधील उत्कृष्ट कला ही चित्रकला आहे, जी धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्रदान करणारी आहे. कला अभिव्यक्तीच्या विविध स्वरूपांचे महत्त्व हे महनीय आहे. त्यामुळे माझ्यादृष्टीने सर्वच कला या एकाच चिन्मयी शक्तीच्या विविध रूपा आहेत. या सर्व कला रूपांचे अद्वैत समजले पाहिजे, इतकेच.

    भारतीय कला परंपरेत सर्व कलांचे आणि त्यांना सहाय्यक शास्त्रांचे एकमेकांशी असलेले समत्व स्वीकारलेले आहे. विविध कलाप्रकारांचे, कला सदरीकारांचे माध्यम हे भिन्न असले तरी ‘मोक्ष’ हे अंतिम ध्येय एकरूपाने मान्य केलेले आहे. अगदी प्रागैतिहासिक काळापासून सुरु असलेला हा मानवाचा कलाप्रवास त्याच्या बदलत्या धारणा, विचार, मूल्य, भीती, नीती यांचा समग्र पट उलगडून दाखवतो. पण कला म्हणजे नेमके काय, हे सर्वप्रथम जाणून घेऊया.

    कला म्हणजे काय?

    भारतीय दृष्टीकोनातून कलेचे स्वरूप समजून घेताना ‘कला’ या शब्दाचा ART या अर्थाच्या जवळ जाणारा पहिला उल्लेख भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये येतो. 

    न तज्ज्ञानं न तच्छिल्पं न सा विद्या न सा कला |
    नासौ योगो न तत्कर्म नाट्येऽस्मिन् यन्न दृश्यते ||

    याचा अर्थ असा की, असे कोणतेही ज्ञान, शिल्प, विद्या, कला, योग अथवा कर्म नाही ज्यामध्ये नाट्य प्रदर्शित होत नाही. इथे स्वाभाविकच कलेचे स्वरूप हे ज्ञान, शिल्प, विद्या, योग आणि कर्म यांच्याहून निराळे असे अपेक्षित धरले आहे. यातील कलेचा अर्थ अभिनवगुप्त यांनी ‘कला गीतवाद्यादिका’ म्हणजे केवल गीत आणि वाद्य आदींच्या सोबत कला हा शब्द योजला आहे. परंतु भारतीय परंपरेत ‘कला’ पेक्षा ‘शिल्प’ हा शब्द कौशल्य, कारागिरी या अर्थाने अधिक आला आहे. अमरकोषामध्ये शिल्पं कर्म कलादिकम् असे म्हटले आहे, म्हणजे शिल्प हे कला किंवा कारागिरी आदि कौशल्यांचे नाव आहे. कौषीतकी ब्राम्हण ग्रंथामध्ये नृत्य आणि गीत यांनाही शिल्प म्हटले आहे. निघण्टुनुसार शिल्प शब्द हा कर्म या अर्थी आला आहे. शिल्प शब्द हा शील समाधौ या धातूपासून बनल्याने त्याचा अर्थ होतो मनुष्याच्या मनाला समाधान देणारे ते म्हणजे शिल्प. थोडक्यात शिल्प म्हणजे कौशल्ययुक्त कर्म आहे म्हणता येईल. जेव्हा कौशल्य हा अर्थ जोडला जातो तेव्हा कलाकृती सोबत तिची उपयोगीतही लक्षात घेणे आवश्यक आहे.

    कलेचे स्वरूप

    पाश्चात्य तत्त्ववेत्ते आणि कला समीक्षकांनी कलेच्या विभिन्न व्याख्या, विभिन्न सिद्धांतांच्या आधारे प्रस्तुत केल्या आहेत. अरिस्टॉटल कलेला केवल ‘अनुकरण’ असे म्हणतो. प्लेटो कलेची व्याख्या करताना म्हणतो, ‘कला म्हणजे कलेच्या सत्याच्या अनुकृतीची अनुकृती आहे’. हेगेलच्या मते, बाह्यप्रभावाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप म्हणजे कला, असे मानले आहे. इटालीयन दार्शनिक बेनोडीहो क्रोसे याने कलेचे स्वरूप सांगताना आत्मिक साक्षात्काराला प्राधान्य दिले आहे. इथे पाश्चात्य कला तत्त्ववेत्यांची मते देण्याचे तात्पर्य इतकेच होते की, भारतीय दृष्टीकोनातील कलेचे स्मरलेले स्वरूप समजावे. 

    कला म्हणजे नवसृजन. कलाकाराच्या डोळ्यांनी जे ग्रहण (Observation) केले ते तसेच अगदी हुबेहूब अभिव्यक्त करणे हा कार्यभाग अपेक्षित नसतो. किंबहुना आबिंद्रनाथ टागोर म्हणतात त्याप्रमाणे, काही विशिष्ट अभिव्यक्तीच्या कारक परिणामांसाठी शास्त्राच्या चौकटीच्या बाहेर कलाकाराचे विचार जाऊ शकतात, आणि तेवढे स्वातंत्र्य हे कलाकारासाठी आवश्यक व कलाकृतीच्या दृष्टीने पोषक असतात. चित्ताला एकाग्र करून ब्रह्मचैतन्याच्या समग्र सारग्रहण कलाकृतीतून झिरपले पाहिजे. त्यामुळे नित्य साधना हा कलाकाराच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो.

    भारतीय कलेमध्ये लौकिक आणि धार्मिक अश्या दोनही कलांचे दर्शन होते. तरीही बाह्य आणि भौतिक सौंदर्य हा भारतीय कलेतील केवल एक अंशमात्र आहे. परंतु दार्शनिक परंपरेप्रमाणेच भारतीय कला परंपरा अध्यात्मिक सौंदर्यावर निष्ठा ठेवणारी आहे. कलाकार कलाकृती निर्माण करताना त्याच्या अंतःपटलावर प्रसुप्त दिव्य संकल्पनांचे अमूर्त स्वरूप साकार करीत असतो. त्याच्या अंतस्थ भावभावनांना तो आकार, रंग, रूप प्रदान करीत असतो.

    भारतीय कलेतील ध्येये ही मनुष्याच्या ऐहलौकिक रुपामध्ये कुंठीत झालेले नाही. चिन्मयानंदाच्या अनुभूतीसाठी देहाच्या स्थूल पातळीवर इंद्रियांना साधन बनवून आत्मानुभूतीच्या सूक्ष्मावास्थेपर्येंत पोहोचण्याचा कला हाही एक मार्ग आहे, जो भारतीयांना गवसला होता. जीवनाचे वैभव अनुभवायचे असले तर कलेचा आधार हा घ्यावाच लागतो. तत्त्वरूपाला मूर्त करण्याचे प्रेरणास्थान हाच भारतीय दृष्टीकोन आहे, असे मला वाटते. 

    भारतीय कलेमध्ये अधिकाधिक आत्मिक ज्ञानाने संपन्न अश्या अभिव्यक्तींचा समावेश होतो. आत्मज्ञानाच्या साधनेत वस्तूंच्या तत्त्वांची जाणीव इंद्रियांच्या पलीकडे जाऊन ग्रहण करता येते आणि त्यांचे ‘सत्वरूप’ आकलन करता येते. अश्या प्रकारच्या अभिव्यक्ती अनेक कलाकृतीमधून दिसतात. उदाहरणा दाखल, शिवाच्या अनेक विग्रहांमधून कलासाधकाने त्या मूर्तीमधील सार साक्षात शिवस्वरूपात साकार केले आहे. शिव विग्रहांपैकी शिवाचे नटराज स्वरूप हे त्यापैकीची एक, अधिक सखोल तत्त्वज्ञानाने परिपूर्ण असे. केवळ नृत्य या क्रियेतून शिवाच्या सृष्टी, स्थिती, संहार, तिरोधान आणि अनुग्रह या दिव्य पंचक्रिया, शिल्पकार लीलया अभिव्यक्त करतो. हे तत्त्वज्ञानाचे अंश कलाकार त्याच्या ‘बौद्धिक ज्ञान‘ आणि त्याच्या पलीकडे साधनेने निर्माण होणारे ‘आत्मज्ञान‘ यांच्या समन्वयाने साध्य करत असतो. बाह्यइंद्रियांपेक्षा अंतर्मुखता अधिक प्रखर बनवून आत्मज्ञानाचे प्रतिबिम्ब त्या कलाकृतीमध्ये कलाकार उतरवतो.  

    कलाकार, कलाकृती आणि रसिक

    कोणतीही कलानिर्मिती होत असताना जी प्रत्यक्ष प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेतील तीन तत्त्वे ही अत्यंत महत्वपूर्ण असतात. या तीन तत्त्वांमधील पहिले महत्त्वाचे तत्त्व म्हणजे ‘कलाकार‘. दुसरे तत्त्व म्हणजे कलाकाराने निर्मित केलेली ‘कलाकृती‘आणि तिसरे म्हणजे त्या कलाकृतीचा आस्वाद घेणारा ‘रसिक‘. 

    अंतःप्रेरणेने कलाकृती निर्माण करणारा कलाकार, हा त्याच्या मनःपटलावर संकल्पनेला मूर्त स्वरूप देतो, तिथेच खरतरं त्याच्या कलाकृतीचा जन्म होतो. म्हणजे कलाकृती ही साकार रूप घ्यायच्या पूर्वी कलाकाराच्या चित्तामध्ये निमार्ण झालेली असते. त्यानंतर ती कलाकृती साकार स्वरूप धारण करते ते प्रत्यक्ष कलाभिव्यक्तीतून. निर्मित कलाकृतीचा आस्वाद घेणारा आणि या प्रक्रियेतील तिसरा महत्वाचा घटक म्हणजे रसिक. या तीनही पातळ्या स्वतंत्र असल्या तरीही त्याचे कार्य हे एकमेकांच्या अस्तित्वावर आश्रित असते.

    इथे कला प्रक्रियेचे दोन प्रवाह लक्षात घेणे आवश्यक आहेत. कला प्रक्रियेतील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे, कलेचा कलाकाराकडून कडून होणारा अविष्कार. कलाकाराच्या कलाकृतीचे रसिकाद्वारा होणारे रसस्वादन हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे.

    कलाकाराच्या कलात्मक अभिव्यक्तीचा प्रवास हा, कल्पनादृष्टीद्वारा (Visualization) रुपाकडे (Form) अश्या स्वरूपाचा असतो. म्हणजेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, अव्यक्ताकडून व्यक्तापर्यंत जाणारा असा हा मार्ग असतो. तेच रसिकाच्या बाबतीत मात्र हा प्रवास अगदी विरुद्ध असतो. रसिकासमोर कलाकृती ही तिच्या पूर्णरुपामध्ये साकार झालेली असते. रसिक ज्यावेळी त्या कलाकृतीचा रसास्वाद घेत असतो तेव्हा, तो त्या पूर्णाकाराकडून तत्त्वाकाराकडे जाण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजेच मूर्त स्वरूपाचे गर्भित तत्त्व किंवा त्या कलाकाराचा मनोभाव ज्यामधून ही कलाकृती व्यक्त झाली आहे, तिथेपर्यंत पोहचण्याचा हा रसिक मनाचा प्रयत्न असतो. या प्रक्रिये दरम्यान कलाकार, कलाकृती आणि रसिक यांच्यात सामायिक बंध निर्माण होतो, जो रसिकाला त्या कलाकृतीशी अनुभूतीच्या पातळीवर जोडून ठेवतो. अर्थात रसिकाला कलाकृतीतून मिळणाऱ्या आनंदानुभव हा सर्वथा त्याच्या मनोभाव, पूर्वानुभव, विचार आणि मूल्य यांच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे कलाकाराने साकारलेल्या मनोभावापर्यंत रसिक पोहोचेलच असे नाही.

    आपल्याला भारतीय कलेचे उदात्त स्वरूप दिसते ते या कलाकारांच्या त्यागी रुपामध्ये. त्यागी हा शब्द मी जाणीवपूर्वक योजला आहे, तो का हे समजून घेऊया. भारतीय कलेमध्ये कलाकारांनी अनेक कलाकृतींचे सृजन केले हे खरे. परंतु या कलाकृतींचे स्वामित्व स्वीकारले नाही. कलाकृती ही जेव्हा एखाद्या अर्थकारणाचा भाग असते तेव्हा कला निर्मितीनंतर कलाकृतीशी कलाकाराला विभक्त होणे अपरिहार्य असते. पण तरीही कलाकृतीवर कलाकार त्याची स्वाक्षरी सोडू शकतो. इथे तसे दिसत नाही, काही क्वचित उदाहरणे सोडली तर कलाकृतीच्या कर्तृत्वाच्या वैयक्तिक खुणा कलाकारांनी मागे ठेवलेल्या दिसत नाहीत. एखादी कलाकृती निर्माण करताना कलाकार त्या कृतीला नव्याने जन्मच देत असतो. ती कलाकृती घडवताना अनेक तास, अनेक क्षण कलाकाराने कलाकृती सोबत घालवलेले असतात. कलाकृती जेव्हा पूर्णत्वाला जाते तेव्हा मात्र कलाकार स्वतःच्या भावनांची नाळ तोडून स्वतःला विभक्त करून घेतो. कलाकृतीवर विविध संस्कार करून ती कलाकाराचा नव्हे तर एका सामायिक बृहद कलाविष्काराचा भाग बनून लौकिक प्राप्त करते. ही कलाकाराची त्यागवृत्ति भारतीय मूल्यांमध्ये रुजली आहे. विष्णुधर्मोत्तर पुराणासारखे ग्रंथ ही अश्या मूल्यांना पुष्टी देतात.

    कलानिर्मितीच्या प्रक्रियेची एक अखंड शृंखला असते. वात्सायनाच्या कामसुत्रावर यशोधर याने भाष्य लिहिले आहे. या भाष्यामध्ये त्याने कलेची षडांगे सांगितली आहेत, ती अशी – 

    रूपभेदः प्रमाणानि भावलावण्ययोजनम।
    सादृश्यं वर्णिकाभंग इति चित्रं षडंगकम्।।

    अर्थात ती आलेख्य कर्माशी म्हणजेच चित्रकर्माशी निगडीत असलेली षडांगे आहेत, तरी शिल्प आणि चित्र या दोनही दृश्यकलांच्या आधारे त्यांच्या आढावा घेते येईल. या षडांगांच्या चिंतनातून भारतीय कलेचे स्वरूप अधिक विस्तृत आणि समग्रतेन आपल्या समोर मांडता येईल असे वाटते, ते पुढील काही भागांतून बघूया.

    क्रमशः

    – ज्येष्ठ अमावस्या शके 1943, शुक्रवार (9 जुलै 2021).

  • स्वाध्याय सुधा सूत्र 7 सुमनत्वाची कामना

    स्वाध्याय सुधा सूत्र 7 सुमनत्वाची कामना

    आपण सर्वच समूहप्रिय लोक आहोत. पण केवळ समूह म्हणजे समाज नव्हे. एक सातत्यशील आणि सहकारी सामाजिक समूह ज्यांच्यामध्ये कार्य साध्य करण्यासाठी सुसंघटीत असा आकृतिबंध तयार झाला आहे, त्याला समाज म्हणता येईल. या समाजात राहून आपण आपले जीवन अधिक उन्नत करण्याच्या दृष्टीने संस्कृती आपल्याला सामाजिक भान देते. असे सामाजिक भान वैदिक काळातील समाजात निर्माण होत होते, याची साक्ष आपल्याला काही वैशिष्ट्यपूर्ण वैदिक सूक्तांमधून दिसते. अश्या काही वैदिक सूक्तांपैकी एक म्हणजे संज्ञानसूक्त, ज्यामध्ये सुमनत्वाची कामना केली आहे.

    हे सुमनत्व म्हणजे, चित्ताला लाभलेले समाधान. समाजातील सर्वांची मने विवेकयुक्त विचारांनी परिपूर्ण असावीत आणि त्यातून सामाजिक स्वास्थ उत्तम राहावे यासाठी या सूक्तामधून कामना केली आहे.

    सूक्त म्हणजे काय?

    सूक्त या शब्दाची फोड सु+क्त किंवा सु+उक्त अशी होईल. सूक्त या शब्दामध्ये  ‘सु’ उपसर्ग आहे. ‘क्त’ किंवा ‘उक्त’ हा शब्द ‘वच्’ या धातूपासून बनलेला आहे. त्यामुळे सूक्त याचा अर्थ सुयोग्य किंवा चांगल्या रीतीने बोललेले असा होतो. बृहद्देवता ग्रंथानुसार ‘संपूर्णं ऋषीवाक्यं तु सूक्तमित्यभिधीयते’ म्हणजे ऋषीवचनांना सूक्त म्हटले आहे.

    याच ग्रंथामध्ये सूक्तांचे चार प्रकारही सांगितले आहेत. देवतांच्या स्तुतीपर सुक्तांना देवता सूक्त तर ऋषींच्या स्तुती सूक्तांना ऋषी सूक्त म्हटले आहे. समस्त प्रयोजनांची पूर्ति ज्या सूक्तांमधून अभिव्यक्त होते त्यांना अर्थ सूक्त ही संज्ञा दिली आहे. या सूक्तांचा चौथा प्रकार म्हणजे अशी सूक्त जी एका विशिष्ट छंदांमध्ये बांधलेली आहेत, त्यांना छंद सूक्त म्हटले आहे. सूक्तांचे विविध पद्धतीने प्रकार केले जातात, जसे देवता सूक्त, लोककल्याणकारक सूक्त, आध्यात्मिक सूक्त इत्यादी. यांपैकी संज्ञानसूक्त हे आध्यात्मिक सूक्त म्हटले आहे.

    आध्यात्मिक सूक्त म्हणजे काय?  

    मुळात आध्यात्मिक हा शब्द धार्मिकतेशी आपण चटकन जोडतो, परंतु आध्यात्मिक या शब्दाची फोड अध्य्+आत्म अशी केली जाते. त्यामुळे आत्मिक ज्ञान हा या सूक्तांचा मूळ विषय आहे. ही आध्यात्मिक सूक्त म्हणजे दार्शनिक ज्ञानाने ओतप्रोत भरलेले आहेत. सुक्तांची संख्या कमी असली तरी अर्थगर्भित आशय हा अश्या सूक्तांचा भाव आहे. त्यामुळे संज्ञानसूक्त ही अश्याच प्रकारचे आध्यात्मिक सूक्त आहे जे सुमनत्वाची कामना करणारे आहे.

    संज्ञान सूक्ताचे स्वरूप

    संज्ञान या शब्दाचा अर्थ म्हणजे सद्भाव, सुसंवाद निर्माण करणे.त्यामुळे या सूक्ताचा आशय ही तसाच आहे. संज्ञानसूक्त हे सांमनस्य सूक्त या नावानेही सुपरिचित आहे. संज्ञानसूक्त हे अथर्ववेदाच्या तिसऱ्या काण्डातील तिसावे सूक्त आहे. अवघ्या सात ऋचांचे हे सूक्त आहे. या सूक्ताचे मन्त्रद्रष्टा ऋषी अथर्वा आहेत. हे सूक्त चंद्रमा किंवा सांमनस्य हीच देवता मानून त्याला समर्पित केले आहे. या सूक्ताचा छन्द अनुष्टप आहे. 

    संज्ञान सूक्त म्हणजेच सांमनस्य सूक्ताची वैशिष्ट्ये

    • संज्ञान सूक्ताच्या आशयामुळे त्याला आध्यात्मिक सूक्ताचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
    • काव्यमय भाषेमध्ये सामान्य शिष्टाचार आणि जीवनाच्या मूळ सिद्धांतांचे निरुपण या सूक्तांद्वारा प्रकट केले आहे.
    • सर्व लोकांमध्ये आपापसात समभाव राहावा, परस्पर सौहार्द निर्माण व्हावे अशी भावना या सूक्तांमधून मन्त्रद्रष्टे ऋषी व्यक्त करतात.
    • माता, पिता, भगिनी, बांधव, पति- पत्नी अश्या सर्वच नात्यांमधील अनुबंध टिकवा आणि या सर्व नात्यांमध्ये विश्वास आणि स्नेह फुलत रहावा अशी कामना केली आहे.
    • समाजातील मूळ आधार असणारे सर्व परिवारातील व्यक्ती, संबंधी परस्पर मिळून-मिसळून राहावेत, त्यांच्या वाणीमध्ये माधुर्य राहावे, सर्वांची मने ही निर्मळ आणि एकसमान असावीत आणि एकमेकांच्या प्रती सहानभूती भाव राहावी, ही आशा या सूक्तांमधून व्यक्त केली आहे.
    • परस्परांची सेवा आणि सोयी सुविधांची सम प्रमाणात वाटणी असावी, म्हणजेच सर्वांच्या प्रती समान भाव जागृत राहावा.
    • ज्याप्रमाणे चक्राचे आरे एकाच बिंदूवर केंद्रित होतात त्याप्रमाणे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एकसारखी आराधना करून अग्नी देवतेचे सदैव स्मरण करावे.
    • सांमनस्य सूक्त म्हणजे सामाजिक एकात्मता आणि सद्भाव उत्पन्न होऊन त्यातूनच सुमनत्वाची कामना या आशयाचा सूक्तपाठ आला आहे.

    परस्परांमधील स्नेहभाव हा चित्ताला स्थैर्य आणि सुमनत्व देणारा असतो. त्याने स्वाभाविकच समाजाचे ही हित सध्या करता येणे शक्य आहे. हा दृष्टीकोन वैदिक ऋषींना स्फुरला आणि त्यांना संज्ञान सूक्तासारख्या आध्यात्मिक सूक्ताचे द्रष्टृत्व प्राप्त झाले. आजच्या घडीलाही समाजस्वास्थ्य आणि सांस्कृतिक उत्थान साधण्यासाठी अशी सूक्ते मार्गदर्शक ठरू शकतात.

    – ज्येष्ठ कृ.1 शके 1943, शुक्रवार (25 जून 2021).

  • स्वाध्याय सुधा सूत्र 6. योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 2)

    स्वाध्याय सुधा सूत्र 6. योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 2)

    सिद्धांत आणि साधना यांच्या समन्वयातून निर्माण झालेल्या या योगदर्शनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगश्चित्तवृत्तिनिरोधः या स्वाध्याय सुधाच्या पूर्वसूत्रामध्ये आपण योग परंपरेचा संक्षिप्त इतिहास पाहिला. याशिवाय योगदर्शनाचे स्वरूप काय आहे हे जाणून घेतले. योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे नेमके काय? आणि योगसूत्रातील या सूत्रामध्ये आलेल्या चित्तवृत्ती कुठल्या हेही पाहिले. स्वाध्याय सुधाच्या या सूत्रामध्ये आपण या चित्तवृत्तींचा क्षय करण्याचे साधन कोणते आहे, हे बघणार आहोत.

    स्वाध्याय सुधा सूत्र 6. योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 2) सुरु करण्यापूर्वी योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 1) इथे जोडत आहे.

    योगदर्शनाची सैध्यांतिक परंपरा ही सांख्य दर्शनाच्या सोबतच चालणारी आहे. त्यामुळे योगदर्शनातही बंधनाचे मुळ कारण अविवेक मानले आहे. त्यामुळे चित्तवृत्तींचा निरोध हा योगाचा अर्थ योग दर्शनांतून पुढे आला आहे. याच योगाची आठ अंगे, योगसूत्राच्या दुसऱ्या भागांत म्हणजे साधनपाद आणि विभूतीपाद मध्ये सांगितली आहेत. ‘साधनपाद’ या संज्ञेवरूनच यांत अंतर्भाव होणाऱ्या विषयांचा अर्थबोध होतो. प्रथम भाग म्हणजे समाधीपाद सिद्ध करताना योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे काय, हे महर्षी सांगतात. तर योगश्चित्तवृत्तिनिरोधः साध्या करण्याचे साधन या भागामध्ये महर्षी आपल्या समक्ष ठेवत आहेत. ते साधन म्हणजेच अष्टांग योग.

    योगाङ्गाऽनुष्ठानादशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्यातेः॥२.२८॥

    याचा अर्थ असा की योग अनुष्ठानाने पंच भेदात्मक अविद्येचा क्षय होतो. तत्क्षयेसम्यग्ज्ञानस्याभिव्यक्तिः म्हणजे अविद्येच्या क्षयाने यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होते. ही ज्ञानची प्राप्ती  क्षयक्रमानुरोधिनी ज्ञानस्यापि दीप्तिर्विवर्धते म्हणजेच अविद्या क्षय क्रमानुसार ज्ञानाचा प्रकाश वाढत जातो. विवेकख्याती ही या ज्ञानप्रकाशातील सर्वांत अंतिम आणि तेजस्वी शलाका आहे. या तेजस्वी शलाकेचा उदय म्हणजेच जीवनमुक्ती, जी कैवल्य मुक्तीचे प्रथम पाद म्हणता येईल. 

    ही यौगिक संस्कृती आपल्या सर्वांच्या जीवनातील नैतिक मूल्य रुजवणारी शिक्षा प्रणाली आहे. परंतु अनुकरणीय स्वभावाच्या आधीन जाणून आपण आपल्याच संस्कृतीपासून हळूहळू दुरावत आहोत. योगशास्त्र हे प्राचीन दर्शन किंवा शास्त्र आहे, त्यामुळे ते केवळ ग्रंथामध्ये अडकून ठेवण्यापेक्षा, आजच्या काळानुरूप ही योगविद्या आपल्या जीवनाचा भाग करण्याचा संकल्प आपण सर्वांनी घ्यायला हरकत नाही. 

    शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, व्यावहारिक आणि आध्यात्मिक या पाच स्थरांवर आपल्या जीवनाचा उत्कर्ष या योग साधनेतून साध्य करता येतो. त्यामुळे योगाचरण हे केवळ योगीजन किंवा साधकांसाठी सांगितले असेल, असे समजून ते दुर्लक्षित करणे म्हणजे खरंतर स्वतःकडेच आपण दुर्लक्ष करण्यासारखे आहे. 

    हे सगळे विवेचन प्राचीन काळाला धरून असले, तरी त्याचा आताच्या आधुनिक काळातील आवश्यकता आणि महत्त्व चिंतन करण्यायोग्य आहे. आजच्या आधुनिक युगांत आपण सर्वच, अगदी मीही या तंत्रज्ञानाने जोडले गेलो आहोत. या आधुनिकतेमुळे मानवी विकासाच्या कक्षा रुंदावत आहेत ही जमेची बाजू. आज वैश्विक महामारीचे संकट जेव्हा आपल्यापुढे आवासून उभे राहिले तेव्हा अनेक शारीरिक, मानसिक व्याधी समोर आल्या. इतकेच नाही तर अनेकांनी नैराश्याच्या खोल गर्तेत स्वतःला ढकलून टोकाचे पाऊलही उचलले. हे कितपत योग्य आहे? स्वतःसाठी, आपल्या परीजानांसाठी आणि समाज स्वस्थासाठीही अश्या गोष्टी निश्चितच योग्य नाहीत. 

    योग दर्शनाने देह आणि मन या दोहोंना समान प्राधान्य दिले आहे. आधुनिक युगातही मनावर संयम आणि शरीरामध्ये दृढता, समतोल साधण्याचे योग हे उत्तम साधन आहे, हे फक्त आपल्याला समजले पाहिजे. या संपूर्ण अष्टांगातील केवळ आसन आणि प्राणायाम, आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतात. त्यामुळे आजच्या सूत्रामध्ये अष्टांग योग थोडक्यात समजवून घेऊया.

    अष्टांग योग

    महर्षी पतञ्जली यांनी योगसूत्रामध्ये योगाची आठ अंगे सांगितली आहेत, त्यांना अष्टांग म्हणतात. या अष्टांगांच्या सहाय्याने चित्तवृत्तींचे शमन शक्य आहे. ही आठ अंगे पुढील सूत्रातून समजून घेऊया – 

    यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयोऽष्टावङ्गानि॥ २.२९ ॥

    यम , नियम , आसन , प्राणायाम , प्रत्याहार , धारणा , ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. या अंगांना महर्षींनी  बहिरंग साधन आणि अंतरंग साधन अश्या दोन क्षेत्र विभागात विभागले आहे. बहिरंग साधनामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार यांचा समावेश होतो. तर अंतरंग साधनामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी येतात.

    बहिरंग म्हणजे याच उद्देश्य हा बाह्य रूपाने मनुष्य जीवनाचे परिशोधन करणे हा अपेक्षित आहे. यम आचरणाने सामाजिक, नियम आचरणाने वैयक्तिक, आसन अभ्यासाने शारीरिक, प्राणायामाने प्राण तर प्रत्याहाराने इंद्रिय शुद्धी साधता येते. याच प्रमाणे अंतरंग साधनाने देहाच्या अंतरंगात सूक्ष्म- अतिसूक्ष्म स्थरावर शुद्धी साध्य केली जाते. अंतरिक योग साधनेत धारणेतून मनशुद्धी, ध्यानातून अस्मिता शुद्धी, समाधी मधून चित्तशुद्धी प्राप्त होते.

    1. यम म्हणजे काय ?

    अष्टांग योग मधील सर्वप्रथम अंग म्हणजे यम. आपल्याला यम ही देवता म्हणून माहिती आहे. यामाचेच दुसरे नाव धर्मराज असेही आहे. यम ही देवता म्हणून जेव्हा त्याचा विचार होतो तेव्हा ‘अनुशासन’ हा त्याचा स्वभावधर्म चटकन आपल्या लक्षात येतो. इथे यम देवता म्हणून नव्हे परंतु संकल्पना म्हणून, योगाचे प्राथमिक अंग म्हणून समजणे श्रेयस्कर आहे. अनुशासन आणि नियमांसाठी कटिबद्धता म्हणजे यम. सामाजिक नियमांचे अनुपालन करण्यासाठी आधी स्वतःला एका कक्षेमध्ये बसवून तयार करावे लागते. या कक्षा नेमक्या कोणत्या आहेत, तेही महर्षी सांगतात. 

    अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः॥२.३०॥

    अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहा म्हणजे यम. या प्रत्येक संज्ञा अत्यंत चिंतनीय आहेत आणि त्याहीपेक्षा कठीण त्यांचे अनुपालन आहे. त्यामुळे शब्दमर्यादेचे नियम पळून या यम संज्ञांना स्वतंत्र सूत्रामध्ये न्याय द्यावा या विचाराने मी पुढे जात आहे. 

    1. अहिंसा  – सदैव आणि सर्वत्र चित्त, वचन आणि देहानेही हिंसा न करणे म्हणजे अहिंसा.
    2. सत्य – अर्थानुकुल वाणी आणि मनाचा व्यवहार असणे म्हणजे सत्य. 
    3. अस्तेय- अस्तेय म्हणजे चौर्यकर्म न करणे. 
    4. ब्रह्मचर्य – ब्रह्मचर्य म्हणजे विषय भोग भावना बुद्धीमध्ये उत्पन्न न होवू देणे. 
    5. अपरिग्रह – अपरिग्रह म्हणजे संचय न करणे. या पाच यमांचे अनुष्ठान सध्या करून साधक नियम या द्वितीय अंगाच्या प्राप्तीसाठी मार्गस्थ होतो.  

    2. नियम म्हणजे काय? 

    योग सूत्रामध्ये यम या पहिल्या अंगानंतर नियम हे अंग आहे. नियम हे वैयक्तिक अनुशासन आणि आत्म परिशोधनास प्रवृत्त करतात.

    शौचसंतोषतपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः॥२.३२॥

    1. शौच – शौच म्हणजे शुद्धता. शरीर आणि मन यांची अंतर्बाह्य शुद्धता इथे अपेक्षित आहे. 
    2. संतोष – संतोष म्हणजे अंतरिक सुख प्राप्ती. 
    3. तप – देह, मन आणि इंद्रिये यांच्याद्वारा संयम पालन मोठे उद्दिष्ट साध्य करण्या करिता आवश्यक असे व्रत, अनुष्ठान करण्याच्या कष्टकारक आचरणाला तप म्हणतात.
    4. स्वाध्याय – स्वतःला निश्चयपूर्वक जाणणे.
    5. ईश्वरप्रणिधान – ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्ती.

    3. आसन म्हणजे काय?

    स्थिरसुखम् आसनम् ॥२.४६॥ 

    आसनांची व्याख्याच अत्यंत सुरेख केली आहे. आसनं म्हणजे ज्यामध्ये स्थिरता आणि सुख यांची अनुभूती प्राप्त होईल. म्हणजे शरीरामध्ये कंप निर्माण न होता शरीराचा समतोल साधता आला की ती आसनस्थिती झाली. व्यास भाष्यामध्ये पद्मासन, वीरासन, भद्रासन, स्वतिकासन आणि दंडासन यांचा उल्लेख स्थिरसुखम् आसनम् म्हणून आला आहे. हठयोग प्रदिपिकामध्ये पंधरा आसनांचा उल्लेख आला आहे. सिद्धासन, पद्मासन, वीरासन, भद्रासन, स्वतिकासन, दंडासन, शवासन, धनुरासना, मयुरासन, पश्चिमोत्तानासन, मत्स्येंद्रासन, गोमुखासन, सिंहासन, कुकुटानासन, कूर्मासन आणि उत्तानकूर्मासन.

    शरीरशुद्धीचा विचार हा आसन या योगाच्या तिसऱ्या अंगाचा उद्देश्य आहे.  

    4. प्राणायाम म्हणजे काय? 

    प्राण म्हणजे आपला श्वास आणि प्रश्वास धारण करणारी जीवशक्ती. श्वासाचे महत्त्व ही आजच्या काळाची गरज बनली आहे, त्यामुळे त्याबद्दल वेगळे काहीच लिहायला नको. परंतु याच श्वासचे नियमन समजून घेणे आवश्यक आहे. श्वासाची आणि प्रश्वासाची गती, त्यांचा विस्तार, त्यांचे आकुंचन-प्रसारणादी भाव जाणीवपूर्वक समजून घेतले पाहिजेत. 

     तस्मिन्सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेदः प्राणायामः ॥ २.४९॥

    नासिकेद्वारा वातावरणामधील मधला वायू शरीरात घेण्याच्या क्रियेला श्वास म्हणतात. शरीरातीलतील वायू बाहेर टाकण्याच्या क्रियेला प्रश्वास म्हणतात. कोणतेही आसन सिद्ध करताना श्वास आणि प्रश्वास यांची गतीचे नियमन करणे म्हणजे प्राणायाम. 

    प्राणायामामध्ये श्वास आणि प्रश्वास यांच्या गतीचे नियमन तीन प्रकाराने केले जाते.

    1. पूरक क्रियेद्वारा दीर्घ श्वास शरीरामध्ये धारण केला जातो.
    2. रेचक क्रियेद्वारा श्वास शरीराबाहेर बाहेर सोडला जातो.
    3. आणि कुंभक क्रियेद्वारा शरीरामध्ये श्वास रोकला जातो.

    प्राणायाम ही संपूर्ण क्रिया श्वसनशुद्धीची आहे. यामध्ये पूरक क्रियेने श्वसन संस्था प्रवर्धित केली जाते. रेचक क्रियेच्या सहाय्याने शरीरातील दुषित वायू हे शरीराबाहेर काढण्याचे कार्य होते. कुंभक, नावाप्रमाणेच जसे एखाद्या कुंभामध्ये वायू भरून त्याचे मुख बंद केले तर तो वायू संपूर्ण कुंभात संचारित होतो. त्याचप्रमाणे कुंभक या क्रियेद्वारा शरीरात निर्माण झालेली ऊर्जा सर्वत्र पोहोचवली जाते.

    प्राणायाम तर आपण निश्चितच आपल्या रोजच्या जीवनात करताच असतो. पातञ्जल योगसुत्रामध्ये प्राणायाम क्रियेचा उल्लेख येत असला तरी प्राणायामाचे प्रकार हठयोग ग्रंथामध्ये उपलब्ध होतात. या प्राणायामाच्या यादीमध्ये नाडी शोधन, उज्जायी प्राणायाम, शीतली प्राणायाम, सीत्कारी, चंद्रभेदी, सूर्यभेदी, भस्त्रिका, प्लावनी आणि भ्रामरी प्राणायाम यांचा उल्लेख येतो. 

    5. प्रत्याहार म्हणजे काय? 

    स्वविषयासंप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इवेन्द्रियाणां प्रत्याहारः ॥२.५४॥

    ही अष्टांग योगातील पाचवी पायरी आहे ज्यामध्ये साधक किंवा योगी प्रत्याहारद्वारा इंद्रियशुद्धी साध्य करतो. इंडियाचे चित्तस्वरूपामध्ये विलीन होने यालाच प्रत्याहार असे महर्षी म्हणतात. प्रत्याहार सहाय्याने शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या विषयाची आसक्ती जीवाच्या चित्ताला विचलित करीत नाही. प्रत्याहार हे अंग योगाच्या अंतरंग साधनातील प्रवेशद्वार आहे. इथून पुढे साधक बाह्यशुद्धी कडून अंतरिक शुद्धीच्या दिशेने अग्रेसर होतो. 

    6. धारणा म्हणजे काय ? 

    अष्टांग योगाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन अंग समजून घेण्यसाठी योगसूत्राचे तृतीय पाद म्हणजे विभूति पाद सहाय्यक ठरते. विभूती पादामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन अंगांची लक्षणे, त्यांच्या सिद्धतेचे फलित, विविध स्तरांमधील विनियोग अश्या अनेक संकल्पनांचा गंभीर विचार येतो.

    देशबन्धश्चित्तस्य धारणा ॥ ३.१॥‌

    म्हणजे नाभिचाक्र, हृदयपुंडरीक, नासिकाग्र, जिव्हाग्र किंवा शरीराच्या कोणत्याही भागात बाह्य विषय चित्तामध्ये येण्यापासून अवरोध करणे म्हणजे धारणा. थोडक्यात धारणा म्हणजे धारण करणे. काय धारण करणे? तर संयम धारण केल्याने बाह्य-आभ्यंतर सिद्धीसाठी लक्ष्य केंद्रित करण्याला धारणा म्हटले आहे. चित्ताची एकाग्रता शक्तीच्या विकास हा धारणेतून साध्या होतो.

    7. ध्यान म्हणजे काय ? 

    तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् ॥ ३.२॥

    धारणेचा पुढचा टप्पा म्हणजे ध्यान. ज्या ध्येय वस्तूमध्ये चित्ताची एकाग्रता केली आहे या धारणेमध्ये केवळ ध्येयमात्राची वृत्ती प्रवाहित होने अपेक्षित आहे, त्याला ध्यान म्हणतात. ध्यानाने अंतरिक चेतनेचा विकास होतो होऊन इंद्रिय निग्रह प्रस्थापित होतो. ध्यानाचे अंतिम चरण म्हणजे समाधी.

    8. समाधी म्हणजे काय?

    समाधी म्हणजे खरंतर अत्यंत व्यापक संकल्पना आहे. ध्यानातूनच समाधी अवस्थेची प्राप्ती आहे.

    तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधिः ॥ ३.३॥

    इथे प्रवाह लक्षात घेणे आवश्यक आहे. अष्टांग योगातील पहिला चरण यमाने सुरु होतो, सामाजिक अनुशासनातून सुरु झालेला हा प्रवाह वैयक्तिक शुद्धी, स्थिर शरीर, प्राण नियमन क्रियेतून, प्रत्याहाराकडे म्हणजे आत्मस्वरूपसाक्षात्काराकडे येतो. आणि धारणेद्वारा अंतरिक शक्तीची वृद्धि करून ध्यानाने ध्येयमात्र वृत्ती सध्या करून समाधी अवस्थेला प्राप्त होतो. समाधी म्हणजे जिथे साधकाला किंवा योगीला स्वस्वरूपाचा विसर पडतो. ब्रह्मस्वरूप जाणणेयोग्य साधकाला विवेकख्याती होते. हा अष्टांग योग आहे. त्यामुळे योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे योगाच्या सहाय्याने चित्तवृत्तींचा निरोध करून साधक कैवल्य प्राप्तीस सिद्ध होतो.

    या अष्टांग योग साधनेतून उत्तम आरोग्यलाभ हा सर्वांनाच प्राप्त करता येणे सहज शक्य आहे. संस्कृतमधील पुढील पंक्ति त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत –

    व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं।
    आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥

    म्हणजेच व्यायामाने स्वास्थ्य, दीर्घायुष्य, बल आणि सुखाची प्राप्ती होते. आरोग्य लाभणे हे परम भाग्याचे लक्षण आहे. सर्वार्थाने स्वउन्नतीसाठी स्वास्थ्य हे श्रेयस्कर आहे. त्यामुळे सर्वांसाठी स्वस्थ आरोग्याची कामना करून आंतरराष्ट्रीय योगदिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते.

    – ज्येष्ठ शु.8 शके 1943, शुक्रवार (18 जून 2021).

  • स्वाध्याय सुधा सूत्र 5. योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 1)

    स्वाध्याय सुधा सूत्र 5. योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 1)

    योगशास्त्र म्हणजे भारतीय संस्कृतीला लाभलेली अत्यंत व्यापक आणि विज्ञानाधीष्टीत अशी दीर्घ परंपरा आहे. केवळ भारतच नव्हे तर हे संपूर्ण विश्व या योग शक्तीने एकजूट होत आहे. योगशास्त्राचे मर्म केवळ जाणून समजणार नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून योग म्हणजे नेमके काय? हे समजेल.

    योग हा शब्द युज् या धातूपासून बनला आहे. युज् धातूचा अर्थ होतो, जोडणे किंवा जोडले जाणे. ही जोडण्याची एक क्रिया आहे, जी शारीरिक स्थरावर सुरु होते. देहाने चित्ताला जोडणे, चित्ताने आत्म्याला जोडणे, आत्म्याने परमात्म्याला जोडणे असा हा प्रदीर्घ योग प्रवाह आहे.

    जगभरामध्ये 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस‘ म्हणून साजरा केला जातो, हे आपण जाणतोच. परंतु यावर्षी हा योग दिवस अनेकांसाठी संजीवन दिवस ठरेल. सध्या आपण सर्वच ज्या वैश्विक महामारीच्या संकटाला सामोरे जात आहोत, अश्या संकटामध्ये योग हा शारीरिक आणि मानसिक समतोल साधण्याचा उत्तम पर्याय बनून आपले आयुष्य निरोगी आणि स्वस्थ बनवेल. ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दरूप गणेशाच्या एका हाताचे वर्णन करताना, तो हात पातंजलकृत योगदर्शनाचा हात आहे, असे म्हटले आहे. हेच योग दर्शन देह आणि चित्त यांचे सौष्ठव प्रदान करणारा गणेशाचा अभयहस्त ठरेल, असे वाटते.

    योग परंपरेचा संक्षिप्त इतिहास

    योग परंपरेचा प्रदीर्घ कालखंड भारतीय संस्कृतीमध्ये आकार घेत आज इथवर आला आहे. सिंधू संस्कृतीमध्ये पशुपती शिवाचे एक सील उपलब्ध आहे. त्यामध्ये योग मुद्रेमध्ये धनस्थ बसलेल्या शिवाचे अंकन आहे. परंतु त्याचे उर्ध्वरेतस स्वरूप त्याचे योगबल निश्चित प्रदर्शित करीत आहे. वेद, ब्रह्मणे, उपनिषदे, महाभारत आणि श्रीमद्भगवतगीता यांमध्ये योगाचे अनेक उल्लेख आले आहेत. वेद काळापासूनच योग आणि त्यासंबंधी आवश्यक तत्त्वांचा अनेकदा विवेचन येत असले तरी अजून समग्र रूपाने ही योग तत्त्वे संघटीत झाली नव्हती.

    योगची सूत्रबद्ध बांधणी महर्षी पतञ्जली यांनी ती केली. या योगसूत्र रचनेचा काळ हा साधारण इ. स. पूर्व तिंसरे ते दुसरे शतक मानला जातो. पातञ्जलकृत योगसूत्रे हाच योग दर्शनाचा प्रधान ग्रंथ झाला. याच योग सूत्रांवर व्यासांनी भाष्य लिहिले, जे व्यास-भाष्य म्हणून परिचित आहे.

    महर्षी पतञ्जली यांच्या योगसूत्र ग्रंथामधील ‘योगश्चित्तवृत्तिनिरोधः’ ही संकल्पना, हा आजच्या स्वाध्याय सुधाचा विषय आहे. योगाच्या दार्शनिक तत्त्वांचा विस्तृत विचार महर्षी पतञ्जली यांनी योगसूत्रांच्या आधारे मांडला आहे. योगाच्या शास्त्रीय आणि व्यावहारिक व्याख्यांचे सर्वांगीण वर्णन या दर्शनात आपल्याला बघायला मिळते.

    योगदर्शनाचे स्वरूप

    महर्षी पतञ्जली यांना योगदर्शनाचे प्रणेते मानले जाते. सांख्य दर्शनाप्रमाणेच योग दर्शन हे द्वैतवादी दर्शन आहे. सांख्य दर्शनातील तत्त्वे योगदर्शनात मान्य आहेत याशिवाय ईश्वर सत्ता या दर्शनाने मान्य केली आहे. त्यामुळे योग दर्शनाला सेश्वर सांख्य असेही म्हटले जाते.

    योग दर्शनाचे सिद्धांत सूत्र रूपात असले तरी प्रत्यक्ष योग साधनेला अधिक महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे योगशास्त्र हे क्रियात्मक अधिक आहे. योग दर्शनांत चित्त, चित्ताचे स्वरूप, आत्मा, आत्म्याचे स्वरूप, चित्त आणि आत्मा यांचा परस्पर संबंध, त्याच्या क्रिया, साधनेसाठी चित्ताची शुद्धता कश्या प्रकारे करावी आणि कैवल्यप्राप्ती म्हणजे मोक्ष यांचा समग्र विचार याचा मूलाधार आहे.

    योगदर्शन हे चार भांगामध्ये विभक्त आहे. हे चार भाग म्हणजे योगक्रियेचे चार आधार असल्याने त्याला पाद ही संज्ञा वापरली आहे. योगसूत्रात समाधिपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद हे चार पाद आहेत.

    योग साधण्याचे अनेक मार्ग आपल्याला परंपरेने ज्ञात आहेत. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, हठयोग, लययोग, मंत्रयोग आणि अष्टांगयोग. यांपैकी महर्षी पतञ्जलींनी अष्टांग योगाचे महत्त्व या योगसूत्रांच्या आधारे सांगितले आहे. याच अष्टांग योगालाच राजयोग असे म्हणतात. योगसूत्रांच्या सुरुवातीलाच म्हणजे समाधीपादामध्ये समाधीची अष्टांगे सांगितलेली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांना अष्टांग योग असे म्हणतात.

    योगश्चित्तवृत्तिनिरोधः

    पातञ्जल योगसूत्रातील समाधीपदातील प्रथम सूत्र अथ योगानुशासनम् ॥ असे आहे. या योगानुशासनम् मध्ये योग, अनु हा उपसर्ग आणि शासन अश्या तीन संज्ञा येतात. अनु हा उपसर्ग, महर्षींनी, परंपरेने आलेले किंवा आधीपासूनच अस्तित्वात असलेलेल्या योगशास्त्राचे अनुसरण करण्याच्या अर्थाने योजला आहे. शासन या संज्ञेचा एक अर्थ नियम किंवा निग्रह असाही होतो. म्हणजे परंपरेने आलेल्या योगशास्त्राचे निग्रहपूर्वक अनुसरण करूया, असा अर्थ इथे अभिप्रेत आहे, ज्याने योगसुत्राचा आरंभ होतो.

    पातञ्जल योगदर्शनानुसार चित्त हे स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे. चित्ताला म्हणजे मनाला कोणताही आकार नसतो. चित्त ज्या विषयाच्या संपर्कामध्ये येते त्या विषयकारतेलाच ‘वृत्ति’ असे म्हटले आहे. या चित्तवृत्ती अष्टांग योगाभ्यासाने कमी करून अंततः त्या विलीन होतात. पंचक्लेशांपासून मुक्ती होऊन कैवल्यप्राप्ती होते. चित्तवृत्तींचा हा अविरत सुरु असलेला प्रवाह खंडित करणे कठीण आहे, त्यासाठी दृढ अभ्यास आणि वैराग्याची आवश्यकता असते.

    या चित्त वृत्तींच्या निरोधाचे दोन उद्देश आहेत. प्रथम उद्देश म्हणजे क्लेशांना नष्ट करणे आणि दुसरा म्हणजे स्वस्वरूपामध्ये स्थित होणे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वृत्तिनिरोधाने साधकाचे क्लेश, कर्म आणि कर्माशय हे नष्ट होतात. कर्माशय नष्ट झाल्यामुळे जन्ममरणाचा बंध तुटतो आणि विवेकख्यातीच्या उदयासोबातच चित्त स्वस्वरूपामध्ये स्थिर होते. हीच कैवल्याची अवस्था असते. मोक्षालाच योगदर्शनात ‘कैवल्य’ म्हणतात. या कैवल्यप्राप्तीच्या मार्गामध्ये सर्वांत प्रथम चित्तवृत्ति स्थिर करणे अत्यंत महत्त्वाचे असते. चित्ताच्या वृत्ति अनेक आहेत, परंतु पतञ्जली मुनींनी पाच प्रकारच्याच वृत्तींचे योगसुत्रामध्ये वर्णन केले आहे.

    पाच प्रकारच्या चित्तवृत्ती

    वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाSक्लिष्टा: ॥ 1.5॥

    वृत्ती या पाच प्रकारच्या असतात. त्यापैकी काही क्लिष्ट वृत्ती मानल्या आहेत, ज्या योगसाधनेत बाधा निर्माण करतात. तर काही क्लिष्ट वृत्ती मानल्या आहेत, या वृत्ती विवेक उत्पन्न करून सत्व, रजस आणि तमस प्रभावांना बांध घालतात. 

    प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः ॥ 1.6 ॥

    पातञ्जल योगसूत्रामध्ये प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या वृत्ती मानल्या आहेत. या क्रमशः जाणून घेणे श्रेयस्कर ठरेल. 

    1. प्रमाण वृत्ती

    प्रमाण वृत्ती म्हणजे चित्तामध्ये यथार्थ किंवा जशी परिस्थिती आहे, त्याच्या अनुरुप ज्ञान होणे ज्याला आपण वस्तुनिष्ठ ज्ञान म्हणतो. 

    प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि ॥1.7॥

    या प्रमाण वृत्तीचे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम असे तीन प्रकारही सांगितले आहेत. 

    चित्तवृत्तींचे प्रकार

    • प्रत्यक्ष प्रमाण – चित्ताच्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून कोणत्याही विषयासोबत सम्पर्क आल्यास चित्त त्या विषयाच्या आकाराला प्राप्त होऊन त्याचे ज्ञान चित्तामध्ये निर्माण होते. त्याला ‘प्रत्यक्ष प्रमाण‘ असे म्हणतात.
    • अनुमान प्रमाण – कोणत्याही प्रत्यक्ष दर्शनाच्या आधारावर तर्काद्वारे जे अप्रत्यक्ष पदार्थाच्या स्वरुपाचे ज्ञान होते त्याला ‘अनुमान प्रमाण’ असे म्हणतात.
    • आगम प्रमाण – आप्त वचन आणि श्रुती वचन म्हणजे आगम. त्यामुळे वेदशास्त्र आणि आप्त (यथार्थ वक्ता) पुरूषांच्या वचनांना ‘आगम प्रमाण’ म्हणतात.
    1. विपर्यय वृत्ती

    कोणत्याही वस्तुच्या योग्य स्वरूपाला न समजता त्याचे वेगळेच रूप समजणे अश्या प्रकारच्या मिथ्याज्ञानाला ‘विपर्यय वृत्ती’ असे म्हणतात. 

    विपर्ययो मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् ॥ 1.8 ॥

    उदा. अंधारामुळे दोरीला सर्प समजणे किंवा उलटपक्षी सर्पाला दोरी समजणे. अर्थात यात दोनही वस्तूंचे ज्ञान असते आणि पुरानुभवही असतो परंतु दोरीला सर्प समजणे यात ज्ञानाचा अभाव असल्याने विपर्यय वृत्ती निर्माण होते.

    1. विकल्प वृत्ती

    फक्त शब्दांच्या आधारावर असलेल्या पदार्थाची कल्पना करणारी जी चित्ताची वृत्ती आहे ती ‘विकल्प वृत्ती‘ होय. 

    शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः ॥ 1.9 ॥

    कल्पित वस्तूंचा वास्तवात अभाव असतो. उदा. सोन्याचा पर्वत. म्हणजे ज्या वस्तू सत्यामध्ये नाहीत पण त्यांची कल्पना केली आहे अश्या.

    1. निद्रा वृत्ती 

    ज्या वेळेला मनुष्याला कोणत्याही विषयाचे ज्ञान राहत नाही. फक्त ज्ञानाच्या अभावाचीच प्रचिती राहते. अश्या ज्ञानाच्या अभावाचे ज्ञान ज्या चित्तवृत्तीच्या आश्रित राहते ती, ‘निद्रावृत्ती‘ होय.

    अभावप्रत्ययालम्बना वृत्तिर्निद्रा ॥ 1.10॥

    1. स्मृती वृत्ती

    वरील प्रमाण, विपर्यय, विकल्प आणि निद्रा या चार प्रकारच्या वृत्तींमुळे अनुभवामध्ये आलेल्या विषयाचे संस्कार चित्तामध्ये पडून राहतात. ते संस्कार पुन्हा कोणते तरी निमित्त पाहून स्फुरित होऊन जाणे ही ‘स्मृती वृत्ती होय.

    अनुभूतविषयासंप्रमोष: स्मृतिः ॥ 1.11 ॥

    चित्तामध्ये पाच प्रकारचे परिणाम किंवा स्पंदन नेहमी होत राहतात. हा त्याचा स्वभाव आहे. यालाच चित्ताची चंचलता किंवा अस्थिरता म्हणतात. योगाच्या अभ्यासाने वृत्ती क्षीण व्हायला लागतात. चित्ताची चंचलता नष्ट झाल्यावर त्यामध्ये स्थिरता किंवा एकाग्रता निर्माण होते. यामुळे चित्त निर्वृत्तिक, वृत्तिशून्य किंवा क्षीणवृत्ती होऊन जाते. परंतु या वृत्तींपैकी ज्या क्लिष्ट वृत्ति मानल्या आहेत त्या पंचक्लेशांना कारण ठरतात.

    पंचक्लेश 

    अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशाः क्लेशाः ॥ 2.3 ॥ 

    व्यास भाष्यानुसार वृत्ति या पाच क्लेश म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश यांना जन्म देतात. विवेकख्याती प्राप्त होण्यासाठी समाधी सिद्ध करावी लागते, त्यासाठी क्लेशांचे तनूकरण म्हणजे क्लेशांना हलके करणे आवश्यक असते. सुसंपादित क्रियायोगामुळे क्लेश हलके होतात. 

    1. अविद्या

    अविद्याक्षेत्रमुत्तरेषां प्रसुप्ततनुविच्छिन्नोदाराणाम्॥ 2.4 ॥

    अविद्या हे चार क्लेशाचे मूळ कारण मानले आहे. हे पाचही क्लेश प्रसूप्त, तनु, विच्छिन्न व उदार या चार अवस्थांमध्ये असू शकतात.

    अविद्येच्या अवस्था

    • प्रसूप्त अवस्था – ही अवस्था म्हणजे जो क्लेश चित्तामध्ये विद्यमान असूनही आपले कार्य करू शकत नाही.
    • तनु अवस्था – संस्कार रूपाने ते क्लेश साधकात असले तरी त्याची तो साधकावर प्रभाव पाडत नाही. तनु अवस्था समाधीत पीडा देत नाही.
    • विच्छिन्न अवस्था – थांबून-थांबून प्रकट होणारा जेव्हा आणि एका प्रबळ क्लेशाच्या जोराने दुसरा क्लेश दाबल्या जातो आणि पुन्हा ती शक्ती आली की प्रकट होतो तो विच्छिन्न क्लेश.
    • उदार अवस्था – म्हणजे विषयांप्रती जो क्लेश स्वरूपत: प्रकट असतो.

    अनित्याशुचिदुःखानात्मसु नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या॥ 2.5 ॥

    जे अनित्य आहे त्याला नित्य समजणे जे अपवित्र आहे त्याला पवित्र समजणे, जे दुःखदायक आहे त्याला सुखकारक समजणे. जे अनात्मरूप आहे तेच आत्मरूप समजणे अशाप्रकारची चित्ताची विपर्यय बोधवृत्ती म्हणजे अविद्या होय.

    1. अस्मिता 

    दृग्दर्शनशक्त्योरेकात्मतेवास्मिता॥ 2.6 ॥

    दृक शक्‍ती म्हणजे आत्मतत्त्व ज्याला आपण चेतन पुरुष म्हणतो आणि दर्शन शक्ती म्हणजे बुद्धी तत्त्व ज्याला अचेतन प्रकृती म्हणतो, यांची एकात्म भावना हीच अस्मिता होय. अस्मितेमुळे चेतन पुरुषाचे ठायी ‘मी अचेतन बुद्धी आहे’ अशी भावना निर्माण होते. ही भावना समाधी योग्य साध्य होऊन पुरुषाला कैवल्याचा अनुभव घेण्यास प्रतिबंध निर्माण करीत असते. अविद्यारूप कारणाचा नाश झाला म्हणजे कार्यरुप अस्मिता आपोआपच नाश पावते.

    1. राग

    सुखानुशयी रागः ॥ 2.7॥

    सुखाच्या अनुभूतीची ओढ असणे म्हणजे राग होय. व्यासभाष्यानुसार सुखाची स्मृती ही सुख उत्पन्न करणार्‍या वस्तुविषयी तृष्णा उत्पन्न करते, असे म्हटले आहे. ही तृष्णा म्हणजेच राग.

    1. द्वेष

    दुःखानुशयी द्वेषः॥ 2.8 ॥

    दुःखाच्या अनुभूतीचा त्याग करण्याची प्रवृत्ती ही म्हणजे द्वेष. दु:खाची स्मृती ही दुःख उत्पन्न करणा-या त्या वस्तुविषयी क्रोध, घृणा या भावना उत्पन्न करते. त्यातून निर्माण होणारा द्वेष हा तमोगुणांची वृद्धी करून चित्ताला क्षिप्त, मूढ इ. अवस्थांकडे नेणारा, तसेच समाधीच्या अभ्यासात विक्षेप आणणारा ठरतो.

    1. अभिनिवेश

    स्वरसवाही विदुषोऽपि तथारूढोऽभिनिवेशः॥ 2.9 ॥

    स्वभावाचा एक अविभाज्य अंग घेऊन सातत्याने चालत आलेला तसेच विद्वानांचे ठायी देखील येणारा क्लेश म्हणजेच अभिनिवेश होय.

    त्यामुळे या क्लेशांचे स्वरूप समजून घेऊन क्लेशांचा त्याग करणे आवश्यक आहे.  तप, स्वाध्याय, ईशवरप्रणिधान या क्रियायोगाच्या साधनाने क्लेशांचे तनुकरण होऊन क्लेशांना सूक्ष्मावस्था प्राप्त होईल. या सुक्ष्मावस्थेतील क्लेश उदार अवस्थेतून विच्छिन्न पुढे तनु अवस्थेत आणि नंतर प्रसूप्त अवस्थेत आणून विदेह व प्रकृतीलय या उच्चस्तरावरील अवस्था प्राप्त होऊ शकते. क्रियायोगाने आचरणात्मक परिवर्तन होते. तप, स्वाध्याय, ईशवरप्रणिधान, यम-नियम यांचे आचरण बलपूर्वक जे होते ते सहज घडायला लागते आणि सर्व चित्तवृत्ती निरोधाद्वारे निर्बीज समाधी सिध्द होते. हाच योगश्चित्तवृत्तिनिरोधः संकल्पनेचा योगदर्शनानुसार अर्थ होतो.

    पुढील भागामध्ये योगश्चित्तवृत्तिनिरोधः साध्या करण्याचे प्रत्यक्ष मार्ग यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

    (क्रमशः…)
    – ज्येष्ठ शु.1 शके 1943, शुक्रवार (11 जून 2021).

  • स्वाध्याय सुधा सूत्र 4. श्रुती आणि दृष्टी

    स्वाध्याय सुधा सूत्र 4. श्रुती आणि दृष्टी

    नमस्ते शारदे देवी, सरस्वती मतिप्रदे | 
    वसत्वम् मम जिव्हाग्रे, सर्वविद्याप्रदाभव ।

    देवी शारदेला माझा नमस्कार असो, ही देवी म्हणजे बुद्धीदात्री सरस्वती. जी माझ्या जिव्हाग्रावर वास करून, मला सर्व विद्या अवगत करून देणारी होवो, अशी प्रार्थना देवी सरस्वतीला आपण करतो.

    बुद्धी, मति, प्रज्ञा, मेधा या मनुष्याच्या ज्ञान साधनेतील दिव्य ज्योती आहेत. या ज्योतींच्या तेजाने मनुष्याच्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर होण्यास मदत होते.  त्यामुळे लहानपणापासूनच सरस्वतीच्या पूजनाने आपण विद्यारंभ करून ज्ञानसाधना सुरु करतो. मात्र सरस्वती देवीचे तत्त्व चिंतन केल्यावर तिच्या स्वरूपातील सूक्ष्मता, गूढता आणि तिची श्रेष्ठता अधिकाधिक स्पष्ट होत जाते.

    देवी सरस्वतीचे स्वरूप जाणणे म्हणजे खरंतर अत्यंत कठीण आहे, आणि मुळात हे कठीण आहे, हे लक्षात येणेही तिच्याच कृपेची अनुभूती देणारे आहे. तरीही यथाशक्ती, यथामति सरस्वतीचे स्वरूप जाणण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न तिच्याच चरणी अर्पण करते.

    देवी सरस्वती म्हटलं की शुभ्र वस्त्र परिधान केलेली, श्वेत पद्मासनाधिष्टीत, हातामध्ये वीणा, अक्षमाला, पुस्तकं, कमंडलू घेतलेली ज्ञानदात्री देवी सरस्वती, आपल्यासमोर साक्षात प्रकट होते. परंतु भारतीय परंपरेमध्ये, सरस्वती देवी विविध रुपामध्ये अभिव्यक्त होत आली आहे.

    देवी सरस्वतीच्या विविध रूपातील तिच्या अभिव्यक्तीतून तिने मानवाची तृष्णा कायमच भागवली आहे. कधी नदी बनून ती वाहती झाली, आणि तिच्या कुशीत एक संस्कृती जन्मली. याच संस्कृतीला आज आपण सरस्वती संस्कृती म्हणून ओळखतो. हीच सरस्वती कधी वाणी बनून ऋषींची ऋतंभरा झाली आणि वेद, उपनिषदे मनुष्याची ज्ञानतृष्णा तोषवति झाली. कवीच्या कंठाची शोभा बनून प्रतिभा शक्तीची तिने प्रचिती दिली. कवींच्या या रचनांमधून आपल्या भाव-भावनांची तृष्णा देवी सरस्वतीने भागवली. शिल्पकला, हस्तकला, संगीत अश्या कलांमधील प्रेरणा होऊन कलात्मक सृजानाने रसिकांच्या हृदयातील आस्वादन तृष्णाही तिने शमवली. तपस्वी, आचार्य, साधक, संत यांच्या वाणीवर विराजमान होऊन सरस्वतीने सिद्धांचे ज्ञानमार्ग खुले केले, जे या तपस्वींच्या मोक्षाचे राजमार्ग झाले.

    म्हणूनच देवी सरस्वतीला अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति म्हणजेच मातांमधील श्रेष्ठ माता, नदींमधील श्रेष्ठ नदी, देविंमधील श्रेष्ठ देवी म्हणजे सरस्वती, असे तिचे महत्त्व या ऋचेमधून व्यक्त होत आहे. देवी सरस्वतीचे प्रत्यक्ष स्वरूप आणि तिची विविध मूर्त रूपे शिल्पकलेतून अभिव्यक्त झालेली आपल्याला ज्ञातच आहेत. परंतु सरस्वतीचे तत्त्वरूपाचा, स्वाध्याय सुधाच्या या सूत्रात परामर्श घेण्याचा हा प्रयास आहे.

    सरस्वतीचे श्रुती हे स्वरूप हिंदू आणि जैन परंपरेतही मान्य आहे. इ.स. चौथ्या शतकामध्ये अमरसिंह यांचा अमरकोशामध्ये, सरस्वतीला वाणीची देवता मानले आहे.  

    ब्राह्मी तु भारती भाषा गीर्वाग्वाणी सरस्वती ।। अमरकोश 1.9.312

    वाणीपासूनच शब्दनिर्मिती होते, त्यामुळे अमरकोशामध्ये शब्दादिवर्गाचा आरंभ हा ‘वचन’ या शब्दाच्या प्रतिशब्दांनी होतो. यामध्ये सरस्वती हा शब्दही वचन या अर्थी, त्याचा प्रतिशब्द म्हणून योजला आहे. म्हणजे सरस्वती ही वाणी, वाक्, भाषा यांची अधिष्ठात्री म्हणून सर्वश्रुत आणि सर्वमान्य होती असे दिसते. परंतु सरस्वतीचे श्रुतिरूप आणि त्यापेक्षा काही वेगळे, पण याच स्वरूपाला सलग्न आणि पूरक असे दृष्टीरूप चिंतनीय आहे. 

    श्रुती आणि दृष्टी या सरस्वतीच्या दोन स्वतंत्र अभिव्यक्ती आहेत. श्रुती आणि दृष्टी या ऋषींच्या दोन शक्ती मानल्या जातात. आधुनिक भारतातील प्रख्यात तत्त्वचिंतक, महर्षी अरविंद घोष यांनी सरस्वती आणि इला यांनाच अनुक्रमे श्रुती आणि दृष्टी म्हटले आहे, हे कुठेतरी समर्पक वाटते. ऋग्वेदाच्या आप्रीसूक्तांमध्ये तिस्रो देव्यः सरस्वतीळाभारत्यः म्हणजेच देवी सरस्वती, इळा आणि भारती (मही) या तीन देवींचा उल्लेख येतो.

    या देवी सरस्वती, इला आणि भारती (मही) स्वतंत्र देवता म्हणून उल्लेखलेल्या असल्या, तरी त्या एकाच तत्त्वाच्या तीन अभिव्यक्ती आहेत, असे मला वाटते. देवी सरस्वती आणि इला या स्वतंत्र असल्या तरी त्यांचे एकमेकींशी सूक्ष्म साधर्म्य असल्याचे दिसते. हे सूक्ष्मतर बंधच त्यांच्यातील वेगळेपणा साकार करतात.

    देवी सरस्वती

    सरस्वती म्हणजे वाग् वै सरस्वती याचा अर्थ सरस्वती वाक् आहे. सरस्वतीला वाणी म्हटले आहे. परंतु या वाणीचे स्वरूपही कसे आहे, तर या वाणीमध्ये सत्याचे तेज आहे, अशी ती वाक् म्हणजे सरस्वती. ही सत् वाणी शब्दांना तेज देते, अर्थाना बळ देणारी अशी आहे. त्यामुळे या वाणीचा शब्द हा रिता राहत नाही. त्यामुळे हिलाच वेदवाणी असेही म्हटले आहे. इथे देवी सरस्वतीचे श्रुती स्वरूप समजते. परंपरेने श्रुतींचा निर्देश हा वेदांसाठीही केला आहे.

    श्रुती म्हणजे काय?

    भारतीय परंपरेत वेद हे प्राचीनतम वाङ्मय असून त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अपार आहे.

    वेद, वेदांचे स्वरूप कसे असते हे जाणून घेण्यासाठी वेदोऽखिलो धर्ममूलम् हा लेख अवश्य वाचा.

    वेद या शब्दाच्या व्युत्पत्तीवरून वेदाचे स्वरूप ज्ञान आणि विद्या प्रदान करणारे असल्याचे स्पष्ट होते. वेद या शब्दासाठी श्रुती, आम्नाय, त्रयी, छन्दस्, स्वाध्याय असे अनेक शब्द प्रतिशब्द म्हणून येतात. त्यानुसार श्रुती या संज्ञेचा वेदांशी असलेला सबंध इथे पाहण्यायोग्य आहे. श्रुती हा शब्द ‘श्रु’ या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ होतो श्रवण म्हणजेच ऐकणे. वाचस्पति मिश्र यांनी गुरुमुखादनुश्रूयते इत्यनुश्रवो वेदः म्हणताना वापरलेला ‘अनुश्रूयते‘ शब्दही श्रुतीमूलक असल्याचे दिसते. सर्व ज्ञान-विज्ञान ग्रहण करण्यासाठी प्राचीन काळापासून श्रवणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

    वैदिक ज्ञान हे गुरूकडून शिष्याकडे मौखिक स्वरूपात देण्यात आले आहे. गुरुमुखातून साकार झालेले हे वेदज्ञान श्रवण करून शिष्य आत्मसात करतो म्हणून त्यांना श्रुती म्हटले आहे. या श्रुतींचे अलौकिक स्वरूप आपल्याला वेद पठण परंपरेचा वारसा रुपात अनुभवता येते. भारतात जवळपास साडे तीन हजार वर्षांपासून अखंडित सुरु असलेली ही वेद पठण परंपरा तिच्या या कौशल्यपूर्ण शैलीमुळे युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये समाविष्ट झाली आहे.

    वेद पठण परंपरा नेमकी कशी आहे, आणि ती युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये कशी समाविष्ट झाली हे वेद पठण परंपरा या लेखामध्ये अवश्य वाचा.

    या वेदांमधून मिळणारे ज्ञान हे या नित्या वाक् च्या सहाय्याने अनंत काळ, इथपर्येंत प्रवाहित होत आलेले आहे. यावरून देवी सरस्वतीचे श्रुती स्वरूप लक्षात येते.

    देवी इला

    इला, इळा किंवा इडा म्हणजे ईढ्यते स्तूयते अनेन इति सा वाणी. महर्षी दयानंद सरस्वती यांनी ऋग्वेद भाष्यामध्ये इला म्हणजे प्रशस्ती किंवा स्तुती करणारी वाणी, असे तिचे स्वरूप सांगितले आहे. महर्षी अरविंद घोष यांनी इला म्हणजे दृष्टी असे म्हटले आहे. ही दृष्टी कशी आहे? तर ही सत्य दृष्टी आहे. जी मनुष्याच्या चित्तामध्ये विवेकाची जाणीव निर्माण करते.

    देवी सरस्वती आणि इला या दोनही चेतना जागृत करणाऱ्या अश्या स्वरूपाच्या आहेत. त्यांचे हे चेतना स्वरूप, श्रेयस्कर विचारांच्या सृजनासाठी पोषक असे आहे. चित्ताची योग्य स्थिती सरस्वती देवीकडून प्राप्त होते, तर इला देवतेमुळे ज्ञानाची जाणीव होते.

    मग इला या देवतेचा आणि दृष्टीचा कसा संबंध लागेल? मुळात त्यासाठी आधी दृष्टी म्हणजे काय हे जाणून घ्यावे लागले.

    दृष्टी म्हणजे काय?

    दृष्टी या संज्ञेचा अर्थ जाणला तर इला या देवतेचे दृष्टी स्वरूप समजण्यास सोयीस्कर जाईल. दृष्टी या शब्दामध्ये ‘दृश‘ किंवा ‘पश्य‘ धातु आहे ज्याचा अर्थ होतो दिसणे किंवा पाहणे. मग हे कश्या प्रकारचे पाहणे आहे?

    डोळा या इंद्रियाने दिसते आणि आपण एखाद्या पदार्थाचे ज्ञान ग्रहण करतो, परंतु हे ज्ञान सत्य म्हणावे का? सत्य ज्ञान हे अन्तःचक्षुंनी ग्रहण करता येते. अन्तःचक्षुंच्या सहाय्याने ग्रहण केलेल्या ज्ञानामध्ये कोणत्याही अज्ञानाचा अंश उरत नाही किंवा कोणतेही असत्याचे आवरण त्यावर राहत नाही. ही अन्तःचक्षुंनी प्राप्त दृष्टी म्हणजे मर्मदृष्टी (Insight).

    या मर्मदृष्टीच्या सर्व छटा म्हणजे पूर्वानुभव किंवा पश्चात् दृष्टी (Hindsight) आणि वर्तमानापलीकडे पहाणारी कल्पनात्मक दृष्टी किंवा दूरदृष्टी (Foresight) यांचाही अंतर्भाव या मर्मदृष्टी या संज्ञेमध्ये अभिप्रेत आहे.

    या मर्मदृष्टीच्या सहाय्याने एखाद्या विशिष्ट पदार्थाचे सर्वार्थाने आणि मूलग्राही आकलन होणे संभव असते. वैदिक वाङ्मया संदर्भात सांगायचे झाले तर, वेद हे अपौरुषीय आहेत, हे आपण जाणतोच.
    ऋषिरतीन्द्रियार्थद्रष्टा मन्त्रकृत् म्हणजे ऋषी हे अतीन्द्रिय अर्थांना बघणारे मंत्रकार आहेत, असे म्हटले आहे. ऋषींना वेदांचे द्रष्टृत्व दिले आहे, त्यामुळे त्यांना ऋचांचे द्रष्टा म्हणतात. वैदिक साहित्यामध्ये या ऋषींना वेदातील ऋचांचे रचनाकार म्हणत नाहीत, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. ही दृष्टी म्हणजे अतीन्द्रिय दृष्टी जीला आपण दिव्यदृष्टी किंवा अलौकिक दृष्टी असे म्हणतो. ही दृष्टी ज्ञानाची खरी जाणीव करून देणारी आहे.

    त्यामुळे श्रुती आणि दृष्टी यांना ऋषींच्या दोन शक्ती मानल्या असाव्यात, असे मला वाटते. श्रुती रुपी सरस्वती आणि दृष्टी रुपी इला या प्राचीन काळी स्वतंत्रपणे अभिव्यक्त झालेल्या देवता असल्या, तरीही काळाच्या प्रवाहात या दोन्हीही वाग्विलासिनी सरस्वतीच्या रुपात एकरूप झालेल्या दिसतात. ज्ञानसाधनेमध्ये श्रुती आणि दृष्टी या दोन्हींचे स्वतंत्र महत्त्व आहे. या दोन्हीपैकी एकीचा अभाव अज्ञानाच्या मार्गाकडे भरकटत घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे विवेक निर्माण करणारी देवी सरस्वती आणि या विवेकाची जाणीव निर्माण करणारी इला, श्रुती आणि दृष्टी स्वरूपा आहेत असे वाटते.

    – वैशाख कृ.10 शके 1943, शुक्रवार (4 जून 2021).

  • स्वाध्याय सुधा सूत्र 3. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (उत्तरार्ध)

    स्वाध्याय सुधा सूत्र 3. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (उत्तरार्ध)

    श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेचा आरंभ श्रीगणेशाच्या स्तवनाने होतो. या मंगलाचरणामध्ये माउली एक एक ओवीमधून शब्दब्रह्म गणेशाचे अव्यक्त स्वरूप व्यक्त करीत जातात. जसे हे शब्द आकार घेतात, तशी श्रीगणेश प्रतिमा आपल्या मनःपटलावर साकार होत जाते.

    श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व सूत्राच्या पूर्वार्धामध्ये या वेदाधिष्टीत श्रीगणेशाचे मूर्तरूप, त्याच्या देहावर सजलेले पुराणोक्त काव्य, नाट्यादिकांचे वस्त्रालंकार आपण बघितले. आज या उत्तरार्धात श्रीगणेशाच्या तत्त्वरूपाचा अविष्कार श्रीज्ञानेश्वर माउलींच्या ओवींमधून अनुभवणार आहोत.

    उत्तरार्ध सुरु करण्यापूर्वी पूर्वार्धही इथे जोडत आहे.

    षड्भुजा, आयुधे आणि षड्दर्शने

    देखा षड्दर्शने म्हणिपती तेचि भुजांची आकृती ।।
    म्हणऊनि विसंवादें धरिती आयुधे हातीं ।। 10 ।।

    प्रतिमाशास्त्राच्यादृष्टीने हे वर्णन आपला दृष्टीकोन अधिक समृद्ध करणारे आहे, असे मला वाटते. या षड्भुज गणेशाच्या हातामध्ये निरनिराळी आयुधे श्रीज्ञानेश्वरांनी वर्णिली आहेत.

    गणेशाच्या सहा भुजा आणि त्यामध्ये धारण केलेली सहा आयुधे यांचा गूढार्थ, जो माउलींना इथे अभिप्रेत आहे, त्यांचा तत्त्वबोध आपल्याला या ओवींमधून उलगडत जातो.

    देखा षड्दर्शने म्हणिपती तेचि भुजांची आकृती ।। गणेशाच्या सहा भुजा म्हणजे षड्दर्शने. इ.स. चौदाव्या शतकाच्या मध्यात कर्नाटकातील विजयनगर साम्राज्याचे मंत्री होते वेदभाष्यकार सायणाचार्य त्यांचे सुपुत्र श्रीमान् माधवाचार्यांच्या ‘सर्वदर्शन संग्रह’ या ग्रंथामध्ये एकूण सोळा दर्शनांचे विवेचन आले आहे. परंतु त्यातील महत्त्वाच्या अश्या एकूण नऊ दर्शनाचा अंतर्भाव, दर्शनशास्त्रांमध्ये प्रामुख्याने केला जातो. या नऊ दर्शनांपैकी सहा दर्शने ही वैदिक आहेत, तर उरलेली तीन दर्शने ही अवैदिक मानली आहेत. त्यामुळे ही सहा दर्शने वेदप्रामाण्य मानणारी असल्याने, त्यांना आस्तिक दर्शने म्हटले आहे.

    माउलींच्या निरुपणात वेदानुकुल अश्या गणेशाच्या स्वरूपाचे वर्णन आले आहे. त्यामुळे इथेही वेदप्रामाण्य मानणारी वैदिक षड्दर्शने ही या श्रीगणेशाच्या सहा भुजा झाल्या आहेत.   

    तरी तर्कु तोचि फरशु नीतिभेदु अंकुशु
    वेदान्तु तो महारसु मोदकु मिरवे ।। 11 ।।

    तरी तर्क तोचि फरशु परशु हे आयुध धारणा केलेला गणेशाचा हात, म्हणजे तर्करुपी न्यायदर्शन. महर्षी गौतम हे न्याय दर्शनाचे सूत्रकार आहेत. न्याय दर्शनाचे स्वरूप हे तर्कप्रधान आहे. 

    प्रमाणैरर्थपरिक्षणं न्यायः ।। वात्सायन न्यायभाष्य 1.1.1 

    वात्सायन यांच्या न्यायभाष्यामध्ये न्याय दर्शनाचे स्वरूप त्यांनी प्रतिपादित केले आहे. न्याय म्हणजे विविध प्रमाणांच्या सहाय्याने वस्तूच्या तत्त्वाचे परीक्षण करणे.

    आता या तर्कनिष्ठ दर्शनाचा आणि परशु या आयुधाचा संबंध जाणणे इथे आवश्यक आहे. परशु या आयुधाचा वापर छेदन क्रियेसाठी केला जातो. इथे हाच तत्त्वरूप भाव आला आहे. न्याय शास्त्रामध्ये तत्त्वांच्या म्हणजे पदार्थांच्या यथार्थ ज्ञानासाठी उत्पन्न होणाऱ्या संशयाचे खंडन करणारे हे शास्त्र आहे.    

    नीतिभेदु अंकुशु इथे गणेशाच्या अंकुश या आयुधाचे आकलन करून घेता येते. गणेशाचा हा हात नीतिभेदरुपी वैशेषिक दर्शनशास्त्राचा आहे. महर्षी कणाद प्रणीत वैशेषिक दर्शनाची सुरुवातच अथातो धर्मं व्याख्यासामः।। या सूत्राने होते. वैशेषिक दर्शनामधील धर्म म्हणजे नीतिभेद जाणणारे शास्त्र म्हटले आहे. इथे धर्माची व्याख्या आजकाल जी ढोबळमानाने केली जाते ती अपेक्षित नाही.  

    यतोऽभ्युदयनिश्रेयससिद्धिः स धर्म।। याचा अर्थ असा की इथे अभ्युदय सोबत निःश्रेयस प्राप्तीचा मार्ग दाखवणारा धर्म जाणण्याची जिज्ञासा केली आहे. अभ्युदय म्हणजे मनुष्य जीवनातील उत्कर्ष परंतु मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये केवळ उत्कर्ष सध्या करायचा नाहीये, तर हा उत्कर्ष चांगल्या मार्गाने सध्या केला तर निःश्रेयस म्हणजेच मोक्ष प्राप्ती होते. 

    अंकुश हे आयुध आपल्याला हत्तीच्या माहुताकडे दिसते. हत्तीच्या मस्तवालपणाला अंकुशाच्या टोकाने ताब्यात ठेवणे शक्य आहे. त्याचप्रमाणे हा वैशेषिक दर्शनरूपी अंकुश गणेशाकडे आहे. हा अंकुश स्वैर चित्तवृत्तींवर अंकुश ठेवून अभ्युदय आणि निःश्रेयस प्राप्तीमधील महत्त्वाचा घटक ठरतो. 

    वेदांतु तो महारसु मोदकाचा ।। वेदान्त दर्शन म्हणजे साक्षात ब्रह्मज्ञानाच्या सुधेचा मधुर मोदक अशी उपमा श्रीज्ञानेश्वर माउली इथे देतात. वेदान्त दर्शनाचे मूळ उपनिषदांना मानले आहे, त्यामुळे या दर्शनचा प्रतिपाद्य विषय हा ब्रह्मविद्या असल्याने या विषयाचे ज्ञान हे मोक्षप्रदच मानले आहे. 

    एके हातीं दंतु जो स्वभावता खंडितु
    तो बौद्धमतसंकेतु वार्तिकांचा ।। 12 ।।

    ही ओवी समजून घेताना मात्र असंख्य प्रश्नांची गर्दी झाली खरी, पण अधिकाधिक संयुक्तिक उत्तरासाठी इथे काही गोष्टी अधिक समजून घेणे आवश्यक ठरले. या ओवीमध्ये बौद्धमत संकेतु या पदाने बौद्धमताचा विचार आला आहे, असे प्रथम दर्शनी वाटले. पण उपरोक्त ओवींमध्ये जर पहिले तर श्री ज्ञानेश्वरांनी षड्दर्शनांना गणेशाचे बाहू म्हणून स्वीकार केला आहे. ही षड्दर्शने वेदप्रामाण्य मानणारी आहे. वर सांगितल्याप्रमाणे बौद्धमत हे वेदप्रामाण्य मानीत नाहीत, तर इथे या ओवीतून नेमका अर्थ कसा घ्यावा, हा प्रश्न उद्भवतो.

    गुढार्थदीपिका याला सार्थ उत्तर देते. कुमारील भट्ट यांनी पूर्वमीमांसेवर तंत्रवार्तिक आणि श्लोकवार्तिक अशी दोन वार्तिके लिहिली आहेत. या वार्तिकात आत्मा कर्ताभोक्ता आहे असे प्रतिपादन केले आहे. त्यामुळे बौद्धमताच्या क्षणिकवाद, अनात्मा, विज्ञानवाद आणि शून्यत्ववाद यांचे खंडन झाले आहे. त्यामुळे स्वभावतः खंडित असलेला दंत, धारणा करणारा गणेशाचा हात हा या षड्दर्शांतील पूर्वमीमांसा असावा.

    ज्ञानेश्वरीच्या संशोधित ग्रंथामध्ये हा खंडित दंत म्हणजे बौद्धमत स्वीकारून तो दंत धारण करणारा हात म्हणजे महर्षी पतञ्जली यांचे योगदर्शन मानला आहे.  

    मग सहजें सत्कारवादु तो पद्मकरु वरदु
    धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु अभयहस्तु ।। 13 ।।

    मग सहजे सत्कारवादु मग येतो तो सत्कार्यवाद किंवा सत्कारवाद. सांख्य दर्शन म्हणजे भारतीय दर्शन परंपरेतील प्राचीन आणि महत्त्वपूर्ण असे दर्शन आहे. महर्षी कपिल हे या दर्शनाचे प्रणेते. सांख्यदर्शनातील पायाभूत सिद्धांत म्हणजे सत्कार्यवाद.

    ‘कार्य’ तसेच ‘कारण’ या दोघांचे अस्तित्व ‘सत्’ मानले आहे. या सत्कार्यवादाची सांगड श्रीज्ञानेश्वरांनी श्रीगणेशाच्या वरदहस्ताशी घातली आहे. मूर्तिशास्त्रामध्ये हस्तमुद्रांचेही एक विशेष महत्त्व आहे. त्यापैकी एक हस्तमुद्रा इथे पाहता येते, ती म्हणजे वरद मुद्रा. 

    अधःस्थितो दक्षहस्तः प्रसृतो वरमुद्रिका ।।

    वरद मुद्रा म्हणजे हाताचा पंजा बाहेरच्या दिशेला असून, बोटे अधम म्हणजे खालच्या दिशेला असतात. वरद मुद्रा म्हणजे देवांचा अनुग्रह किंवा त्यांची अनुकंपा दाखवण्याच्या क्रिया या अर्थाने शिल्पांमधून अभिव्यक्त होत असतो. 

    इथे श्रीगणेशाचा वरद मुद्रेतील हात हा सांख्यदर्शनचा आहे. याचा अर्थ सत्कार्यवाद आणि त्या अनुषंगाने सांख्यदर्शन, हे सर्वांसाठी त्रिविध तापांतून मुक्ती आणि त्यातून विवेक निर्माण करणारा मार्ग प्रशस्त करणारे असल्याने हा हस्त वरदान देणारा असा आहे.

    धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु अभयहस्तु ।। अभय हस्ताच्या रूपात महर्षी पतञ्जली यांचे योगशास्त्राचे तत्त्व श्रीज्ञानेश्वरांनी मांडले आहे. योगदर्शन आणि सांख्यदर्शन ही दोनही दर्शने सोबत चालणारी अशीच आहेत.

    महर्षी पतञ्जली यांच्या योगसूत्रांमधून जीवनमुक्तीच्या मार्ग प्रतिपादित केला आहे. योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे योगसहाय्याने चित्तवृत्तिंचा निरोध करून विवेकख्याती प्राप्त करण्याचा दृढ असा मार्ग पातञ्जल सूत्रे सांगतात. योगदर्शन हे अधिक क्रियात्मक असल्याने समग्र जीवनाचे दर्शन आहे. त्यामुळे  श्रीगणेशाच्या प्रतिमेतील एक हस्त मानव प्रजातीसाठी हा योगशास्त्ररूपी अभयदान देणारा आहे.     

    देखा विवेकवंतु सुविमळु तोचि शुंडादंडु सरळु
    जेथ परमानंदु केवळु महासुखाचा ।। 14 ।।

    देखा विवेकवंतु सुविमळु तोचि शुंडादंडु सरळु या ओवीमध्ये गणेशाच्या सोंडेवर आत्मानात्म-विवेक तत्त्वाचे रोपण करून परमानंदाचा मार्ग सांगितला आहे. आत्मानात्म-विवेक म्हणजे आत्मा नित्य आहे आणि शरीर अनित्य आहे, हा विवेक म्हणजेच ज्ञान जागृत करणारी ही सरळ सोंड आहे, असे म्हटले आहे.

    गणेशाची ही सरळ सोंड म्हणजे विवेकी जनांसाठी ब्रह्मसुखाचा परमानंद देणारी आहे. विवेकाने प्राप्त होणारा साम्यभाव हा महासुखाचा कारक असतो.

    तरी संवादु तोचि दशनु ।। जो समताशुभ्रवर्णु
    देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु विघ्नराजु ।। 15 ।।

    तरी संवादु तोचि दशनु ।। जो समताशुभ्रवर्णु श्रीगणेशाचा शुभ्र एकदंत म्हणजे सर्व दर्शनांच्या सिद्धान्तांमधील संवाद आहे. संवाद म्हणजे या षड्दर्शनांच्या प्रमेयामध्ये सुरु असलेली देवाण-घेवाण आहे, मतांचे आदान-प्रदान आहे. या षड्दर्शनातील एकवाक्यता इथे श्रीज्ञानेश्वर सांगत आहेत. हा विघ्नराज गणेश म्हणजे अद्वैतज्ञानरुपी सूक्ष्म ईक्षण म्हणजे दृष्टी असलेला देव आहे. 

    अवयवस्थान आणि तत्त्व

    मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानीं
    बोधमदामृत मुनी अलि सेविती ।। 16 ।।

    माउलींनी गणेशाच्या श्रवणस्थानाला म्हणजे कानांवर मीमांसा तत्त्वाचे रोपण केले आहे. यामध्ये पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी ही दोन श्रवणस्थाने म्हटले आहे. आता या दोन मीमांसा, श्रवणस्थानी मानण्याचे प्रयोजन काय, हे समजून घेण्यासाठी पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा यांचे स्वरूप समजून घ्यावे लागेल.

    मीमांसा हे षड्दर्शनांचा भाग आहे, हे वर सांगितलेच आहे. त्यामुळे वेदप्रामाण्य या दर्शनांचा गाभा आहे. वेदाचे दोन प्रतिपाद्य विषय आहेत एक कर्मकांड आणि दुसरे ज्ञानकांड. यातील कर्मकांड या विषयामध्ये यज्ञयाग, अनुष्ठान आदि येतात. ज्ञानकांडामध्ये जीव, जगत्, ईश्वर, ईश्वराचे स्वरूप, त्याचा परस्पर संबंध यांचे निरुपण येते.

    इथे मीमांसा दोन आहे एक कर्ममीमांसा ज्याला पूर्वमीमांसा म्हणतात आणि दुसरी ज्ञानमीमांसा ज्याला उत्तरमीमांसा म्हणतात. मीमांसा याचा अर्थ होतो जाणण्याची इच्छा. कोणतेही तत्त्व जाणण्याची इच्छा असेल, तर उहापोहपूर्वक विचार करणे आवश्यक असते.

    मीमांसा दर्शनामध्ये मग ते पूर्वमीमांसा असो किंवा उत्तरमीमांसा दोन्हीचे विषय वेगळे असले तरी दोन्हीच्या प्रक्रियांमध्ये तत्त्व जाणण्याची क्रिया असल्याने श्रवणेंद्रिये ही त्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यामुळे ही दोन दर्शने श्रीगणेशाचे दोन कान असे म्हटले आहे.

    बोधमदामृत मुनी अलि सेविती ।। या गणेशाच्या कानाशी मुनिरूपी भ्रमर सदैव भ्रमण करून पूर्वमीमांसेतून मिळणारे कर्मज्ञान आणि उत्तरमीमांसेतील ब्रह्मज्ञानाच्या बोधामृताचा मकरंद सेवन करीत असतात. 

    प्रमेयप्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेचि निकुंभ
    सरिसे एकवटत इभ मस्तकावरी ।। 17।।

    या ओवीमध्ये दोन भिन्न मतांची तुलना करून त्यांच्यामधील एकवाक्यता प्रतिपादित केली आहे. हत्तीच्या मस्तकावर दोन उंचावटे असतात त्यांना गंडस्थळ असे म्हणतात. गणेशाचे गजमुख आहे त्यामुळे त्याच्या मस्तकावर दोन समान उंचीचे उंचवटे आहेत. त्यांवर द्वैत आणि अद्वैत या दोन मतांना स्थापित करून या दोनही मतांची सरसता तुल्यबळ असल्याचे प्रतिपादन इथे केलं आहे. ही दोनही मते आणि त्यांचे सिद्धांत हे त्या गंडस्थळावर पोवळाच्या रत्नाप्रमाणे त्यांची आभा पसरवत आहेत.

    इथे या ओवीचा समारोप करतानाच सरिसे एकवटत असे म्हणत द्वैताचे अद्वैतात झालेले एकीकरणही सांगितले जात आहे. इथे श्रीज्ञानेश्वरांनी द्वैत आणि अद्वैत या दोनही मतांना तुल्यबळ मानून दोघांचा सरसपणा स्पष्ट केला असला तरी ब्रह्मत्तत्व आणि त्याच्यातील शक्तीस्फुरणात परब्रम्ह हे अद्वैत एकच तत्त्व आहे हे सांगितले आहे. 

    उपरि दशोपनिषदे जियें उदारें ज्ञानमकरंदें
    तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें शोभती भलीं ।। 18 ।।

    गणेशाची ही शब्दरूप मूर्ती माउली अतीव माधुर्याने सुशोभित करतात. उपरि दशोपनिषदे जियें उदारें ज्ञानमकरंदें इथे गणेशाच्या मुकुटावरील सुगंध पसरविणाऱ्या फुलांचा उल्लेख करीत आहेत.

    ही कुठली फुले आहेत? कुठला मकरंद यांमध्ये भरून आहे, जो या गणेशाच्या मस्तकाची शोभा वाढवत आहे? इथे श्री ज्ञानेश्वर दशोपनिषदांबद्दल सांगत आहेत. ब्रह्मविषयक ज्ञान हा उपनिषदांचा प्रतिपाद्य विषय आहे. उपनिषदांची संख्या खूप आहे परंतु त्यापैकी दहा उपनिषदे ही प्रमुख मानली गेली आहेत.

    ईश–केन–कठ–प्रश्न–मुण्ड–माण्डूक्य–तित्तिरः ।
    ऐतरेयं च छान्दोग्यं बृहदारण्यकं तथा ।।

    दश उपनिषदांमध्ये ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्ड, माण्डूक्य, तित्तिर, ऐतरेय, छान्दोग्य आणि बृहदारण्यक यांचा समावेश होतो. यांना वेदांचा अंतिम भाग म्हणजे वेदान्त म्हणतात. या उपनिषदांच्या गर्भात ज्ञानमकरंदाचा संचय आहे. यातील प्रतिपाद्य विषय म्हणजे ब्रह्मज्ञान हे इहलोकापलीकडील तत्त्वंचा विचार जाणण्याची इच्छा असणाऱ्यांचे जीवन या तत्त्व-सुगंधाने भरून टाकते. अशी ही सुंदर उपनिषदरुपी फुले गणेशाच्या मस्तकावर आहेत.

    अकार चरणयुगुल उकार उदर विशाल
    मकार महामंडल मस्तकाकारें ।। 19 ।।

    माउली या ओवीमधून, गणेशाचा देहाकार आणि ॐकार यांच्यातील साधर्म्य उलगडून सांगत आहेत. ॐकारामध्ये तीन मात्रा आहेत. अकार चरणयुगुल अकार मात्रा ही गणेशाचे दोन पाय आहेत. उकार उदर विशाल उकार मात्रेप्रमाणे मोठे पोट आणि मकार महामंडल मस्तकाकारें मकार मात्रेप्रमाणे विशाल मस्तक आहे.

    हे तिन्ही एकवटले तेथें शब्दब्रह्म कवळलें
    तें मियां गुरूकृपा नमिलें आदिबीज ।। 20 ।।

    गणेशतत्त्वाचे निरुपण करणारी ही अंतिम ओवी पुन्हा प्रथम ओवीकडे आपल्याला घेऊन जाते. भावार्थदिपिकेच्या ‘ॐ नमोजी आद्या’ या पहिल्याच ओवीमध्ये या अंतिम ओवीचा अर्थ सापडेल. इथे श्रीज्ञानेश्वर माउली म्हणतात, की या तीनही मात्रा एकत्र येऊन ॐकार निर्माण होतो. हे शब्दब्रह्म सर्व जगाचे ‘आदिबीज’ आहे ज्याला ते गुरु अनुग्रहाने जाणून त्याला नतमस्तक होत आहेत. 

    हाच भावार्थ श्रीज्ञानेश्वर माउलींनी पहिल्या ओवीमधून प्रकट केला आहे. ॐकाररुपी ब्रह्मस्वरूपाचे स्थूल असे मंगलकारक अभिधान म्हणजेच हा मंगलमूर्ती गणेश. शब्दब्रह्माचे आदिबीज याच गजाननाच्या ठाई एकवटले आहे, त्यामुळे आरंभ म्हणजेच हा श्रीगणपती आहे. म्हणूनच श्रीज्ञानेश्वर माउली या आत्मरूप तत्त्व असलेल्या गौरीपुत्र विनायकाला नतमस्तक होऊन ग्रंथ निर्मितीस आरंभ करीत आहेत.

    – वैशाख कृ. 2 शके 1943, शुक्रवार (28 मे 2021).

  • स्वाध्याय सुधा सूत्र 2. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (पूर्वार्ध)

    स्वाध्याय सुधा सूत्र 2. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (पूर्वार्ध)

    प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। 
    भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।। 1 ।।

    कोणत्याही कार्याचा आरंभ, आपण श्रीगणेशाच्या पूजनाने करतो. गणेश या देवतेचा दैवतशास्त्रीय विचार स्वतंत्रपणे करणे उचित ठरेल. आजच्या स्वाध्याय सुधाच्या या भागात मात्र श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्वाचा विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 

    भगवान श्रीकृष्णाने मुखर केलेली श्रीमद् भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वर माउलींनी त्यांच्या अलगद, हळुवार शब्दांमधून जनसामान्यांच्या हृदयात भावार्थदीपिकेच्या रुपात स्थापित केली. भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने जीवनाचे सार सांगितले ते ज्ञानेश्वर माउलींनी भावार्थाने प्रकट केले, जे ज्ञानेश्वरीच्या रूपाने आजही चित्ताला दिग्दर्शन करते आहे.

    भक्तशिरोमणी नामदेव महाराज, भावार्थदीपिका या ग्रंथाला ज्ञानेश्वरी म्हणतात. श्रीज्ञानेश्वर माउलींची भावार्थदीपिका ही रचना गीतेवरील भाष्य असले तरी, या ग्रंथातून प्रमेयाच्या अनेक ब्रह्मानंदलहरी श्रीज्ञानेश्वर माउलींनी प्रकट केल्या आहेत. भावार्थदीपिकेची थोरवी मोठी आहे, ती अनुभवण्यातच सार्थता आहे. 

    या भावार्थदीपिकेला समजून घेण्याच्या दृष्टीने यातील प्रथम ओवीला मी सुरुवात केली, मंगलाचरणाने.. प्रत्येक कार्याचा आरंभ या गौरीपुत्र विनायकाच्या स्मरणाने होतो तसाच येथेही झाला आहे. इथूनच खरतरं श्रीज्ञानेश्वर माउली त्यांच्या वाग्वैभवाची दालनं खुले करून देतात.

    एक एक शब्द वेचावा आणि त्यातला अर्थ हृदयाच्या छोट्याश्या कुपीत साठवून जपावा इतका अनमोल. माउलींचा शब्दरूप श्रीगणेश मनःपटलावर हळूहळू आकार घेत जातो, आणि मंगलाचरण होईस तोवर, आपल्यासमोर तत्त्वरूप श्रीगणेश उभा राहतो. अगदी आपण गणेशाची मातीची मूर्ती घडवताना होते तसेच, निराकारापासून साकारापर्येंतचा साक्षात प्रवास, पण भावार्थदीपिकेत हा शब्दबद्ध आहे आणि यात तत्त्वाचे चैतन्य भरून राहिले आहे.

    मंगलाचरणारंभ

    ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
    जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ।। 1 ।। 

    भारतीय संस्कृतीमध्ये ॐकार हा प्रणव मानला गेला आहे. हिंदू, बौद्ध, जैन अगदी शीख बांधवांमध्येही ओमकाराचे विशेष महत्त्व आहे. ॐकाराचे स्वतंत्र चिंतन इथे नाही, त्यासाठी विस्तृत चिंतन पुढे असेलच.

    ॐकार या आद्य प्रणवाने ग्रंथारंभ होतो. ॐकार हे त्या ब्रह्मस्वरूपाचे स्थूल असे मंगलकारक अभिधान आहे. या ॐकाराला ‘आद्या’ म्हणजे सर्वांचे मूळ असलेला, असे म्हटले आहे. गुलाबराव महाराजांनी ‘आद्या’ या शब्दातील आरंभवादाचा गुढार्थ प्रतिपादित केला आहे.

    वेद प्रतिपाद्या वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असलेल्या त्या ॐकाराचे चिंतन केले आहे. ‘स्वसंवेद्या’ इथे स्वतःला जाणण्यास योग्य असलेल्या त्या ‘आत्मरूप’ तत्त्वाचा जय जयकार केला आहे.

    उपनिषद् ज्ञानपरंपरेत आत्म्याचे चिंतन अनेकदा आले आहे. हा कोणत्या आत्मरुपाला नमस्कार आहे? हे जाणून घेताना या उपनिषदांचा उपयोग होतो. ऐतरेय उपनिषदामध्ये आत्मस्वरूप, हे आद्य मानले आहे.

    आत्मा वा इदमक एवाग्र आसीन्नान्यत्किंचन मिषत् ।।  1.1

    याचा अर्थ असा की, पूर्वी केवळ आत्माच व्यापून होता, दुसरे काहीच नव्हते. श्रुतीवचन सांगते की, कोणत्याही प्रकारची हालचाल करणारे काही नव्हते तेव्हा, या जगताला आत्मा व्यापून होता. इथे आत्मा हा परमात्म्याचे शब्दरूप म्हणूनच येतो. त्याच न्यायाने भावार्थदीपिकेतील आत्मरूप म्हणजे त्या परमात्म्यालाच हा नमस्कार आहे.

    देवा तूंचि गणेशु सकलमति प्रकाशु
    म्हणे निवृत्ति दासु अवधारिजो जी ।। 2 ।।

    श्रीगणेश हा देव, सर्वांच्या बुद्धीला, ज्ञानाच्या प्रकाशाने उजळवून टाकणारा आहे. त्यामुळे त्याच्या स्मरणाने उत्तम ज्ञानच प्रकाश व्हावा ही प्रार्थना ‘निवृत्ति दासु’ म्हणजे श्रीज्ञानेश्वर करीत आहेत. श्रीनिवृत्तिनाथ महाराज हे श्रीज्ञानेश्वरांचे जेष्ठ बंधू तर होतेच, पण ते त्यांचे गुरुही होते. आपल्या गुरूंचे दास्यत्व पत्करून विनम्रपणे ते श्रीगणेशाचे स्मरण करीत आहेत. 

    मूर्तीस्वरूप श्री गणेश

    हें शब्दब्रह्म अशेष तेचि मूर्ति सुवेष
    तेथ वर्णवपु निर्दोष मिरवत असे ।। 3 ।। 

    श्रीज्ञानेश्वर माउली श्रीगणेशाचे शब्दचित्र रेखाटायला सुरु करतात. हें शब्दब्रह्म अशेष शब्दब्रह्म या संज्ञेची व्याप्ती व्यापक आहे. पण इथे शब्दब्रह्म वेदवाङ्मय याला उद्देशून आहे. सर्व वेद, शास्त्र, पुराणे, स्मृती यांची एकात्म स्वरूपाने बनलेली ही गणेशाची रेखीव, सुंदर सजवलेली मूर्ती आहे असे मानले आहे.

    ही गणेश मूर्ती वर्णवपु निर्दोष आहे. गुलाबराव महाराज वर्णवपु निर्दोष म्हणजे नेमके काय हे समजावतात. श्रीज्ञानेश्वरांनी मानलेल्या श्रुती, स्मृती, पुराणोक्त शास्त्रे यांच्यातील एकवाक्यता आणि त्यांची महत्ता इथे प्रतीत होते.

    या वाङ्मयाची वर्णरचना ही पूर्णतः निर्दोष आहे. इथे ‘निर्दोष’ हा शब्द भ्रम, प्रमाद, करणापाटव आणि विप्रलिप्सा या चार दोषांचे खंडन करतो. भ्रम म्हणजे विपरीत ज्ञान, प्रमाद म्हणजे चुकणे, करणापाटव म्हणजे इंद्रियांची असमार्थ्याता आणि विप्रलिप्सा म्हणजे खोटे बोलून फसवण्याची बुद्धी. म्हणजे हे वाङ्मयादि दोषरहित वर्णरचनेतून साकार झालेली ही श्रीगणेश मूर्ती आहे.

    स्मृति तेचि अवयव देखा अंगिकभाव ।
    तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा ।। 4

    स्मृतीग्रंथांमध्ये धर्मशास्त्र आणि षड्दर्शने यांचा अंतर्भाव होतो. स्मृती हे या गणेशाचे अवयव म्हटले आहेत. शरीर शास्त्राचा विचार केला तर मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचे आणि त्यांच्या सहाय्यक इंद्रियांची काही विशिष्ट कार्ये आहेत. आणि हे कार्य साध्य करून घेऊन शरीरास पुष्टी प्राप्त होते. त्याचप्रमाणे इथे, श्रुतींचे अर्थ किंवा त्यांचे ज्ञान स्मृतींमधून पुन्हा पुन्हा व्यक्त होत आले आहे. त्यामुळे या स्मृती भांडाराचे लावण्य अबाधित राहिले आहे. स्मृतींमधील विषयांच्या मर्माने त्यातील प्रतिपाद्य सिद्धांतांची शोभा अधिक वाढली आहे. 

    वस्त्रालंकारांचे लावण्य

    अष्टादश पुराणे तीचि मणिभूषणे ।
    पदपद्धती खेवणे प्रमेयरत्नांची 5

    मूर्तीशास्त्रामध्ये वस्त्रालंकार, आभूषणे ही एखाद्या प्रतिमेचे लावण्य अधिक मनोहर करण्याकरीता अतिशय कल्पकतेने, बारकाईने आणि सौंदर्यदृष्टीने योजलेले असतात. तीच गोडी इथेही जाणवते. पुराणांची संख्या अठरा मानली आहे. इथे या अठरा पुराणांना या श्रीगणेशाची मणिभूषणे म्हटले आहे. ही अठरा महत्त्वाची किंवा प्राचीन पुराणे कोणती हे या पुढील श्लोकामधून समजेल.  

    मद्वयं भद्वयं चैव ब्रत्रयं वचतुष्टयम् ।​​
    अनापलिंगकूस्कानि पुराणानि प्रचक्षते  

    याच अर्थ असा की, दोन म (मत्स्य, मार्कंडेय), दोन भ (भागवत, भविष्य), तीन ब्र (ब्रह्म, ब्रम्हाण्ड, ब्रह्मवैवर्त्य), चार व (वराह, विष्णू, वामन, वायू) आणि अग्नी, नारद, पद्म, लिंग, गरुड, कूर्म, स्कन्द अशी एकूण अठरा पुराणे आहेत.

    पुराणांचे स्वरूप कसे असते किंव्या त्यामध्ये अंतर्भाव होणाऱ्या विषयांच्या माहिती लक्षणावरून मिळते. पुराणांची पाच लक्षणे सांगितली आहेत, ती पुढीलप्रमाणे –

    सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च।
    वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम् ।।

    सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित ही पुराणांची पाच लक्षणे आहेत.

    1. सर्ग – सर्गामध्ये सृष्टीची निर्मिती
    2. प्रतिसर्ग – सृष्टीचा लय
    3. वंश – विविध वंशांची उत्पत्ती आणि वृद्धी
    4. मन्वंतर – प्रत्येक मन्वंतराचे वैशिष्ट्य
    5. वंशानुचरित – वंशातील प्रसिद्ध पुरुषाचे वर्णन

    पुराणांची रचना ही वर नमुद केलेल्या लक्षणांनी युक्त अशी असली तरी याशिवाय इतरही विषयांचे प्रतिपादन या पुराणांमधून येते. पुराणांमधील प्रतिपाद्य विषय हे त्या विशिष्ट पुराणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. जसे की, अग्नी, गरुड आणि नारद पुराणांतून संस्कृत साहित्य, कला, वैद्यकीयशास्त्र, व्याकरण यांची माहिती मिळते. पद्म, स्कन्द आणि भविष्य यासारख्या पुराणांमधून तीर्थे आणि व्रते यांची माहिती मिळते. लिंग,वामन, मार्कंडेय, शिवपुराण यांमधून विविध संप्रदाय यांची माहिती मिळते. 

    श्रीज्ञानेश्वरांनी अतिशय बारकाईने ही गणेशाची शब्द-प्रतिमा साकारली आहे. त्यांनी या अठरा पुराणांना मौल्यवान अशी मणी आभूषणे बनवून, या गणेशाच्या स्मृतीरूपी अवयवांना सुशोभित केले आहे. ही सुंदर मणिभूषणे या पुराणांमधून रचलेल्या छंदोबद्ध शब्दांच्या कोंदणात बसवलेली आहेत. या पुराणांमधून जे सिद्धांत आले ते म्हणजे या श्रीगणेशाच्या अभूषणातील रत्न बनून चमकत आहेत.  

    पदबंध नागर तेचि रंगाथिले अंबर
    जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे 6 ।।

    यातील शब्दांच्या बांधणीने या गणेशाचे सुंदर असे रंगविलेले वस्त्र तयार झाले आहे. या वस्त्राचे तलम पण तेजस्वी तंतू या शब्दरचनेतील विविध उपमा आणि अलंकारांच्या रूपाने झळाळत आहे.  

    देखा काव्यनाटका जे निर्धारिता सकौतुका
    त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी ।। 7 ।।

    श्रीगणेश कलेची देवता म्हणूनही पूजनीय आहे. इथेही काव्य आणि नाट्य या कला गणेशाचे अलंकार बनून त्याच्या दिव्य स्वरूपाची प्रभा वाढवत आहे. गणेशाच्या पायामधील पैंजणे म्हणजे काव्य आणि नाटक. या पैंजणातील छोटे छोटे घुंगरु रुणझुण करीत आहेत. या काव्य आणि नाटक आदि मधला अर्थ या पैंजणाच्या झंकारातून अलगत उमटत आहे. काव्य आणि नाटके ही वेदार्थाला धरून आणि त्याला अनुकूल अश्याच प्रतिध्वनीचा उद्घोष करीत आहेत, हे इथे दिसते.

    नाना प्रमेयांचि परी निपुणपणे पाहता कुसरी
    दिसती उचित पदे माझारी रत्नें भली ।। 8 ।।

    या कलांमधून उमटलेले वैदिक सिद्धांत इतके नेटके आणि कौशल्याने मांडले आहेत. हे सिद्धांत सांगणारी काव्यशास्त्रातील आणि नाट्यशास्त्रातील विविध पदे ही रत्नासमान मौल्यवान आहेत.

    तेथ व्यासादिकांच्या मति तेचि मेखळा मिरवती
    चोखाळपणे झळकती पल्लवसडका ।। 9 ।।

    व्यास आदि ऋषींच्या विचारप्रांताची मर्यादा म्हणजे या गणेशाच्या कंबरेचे शेला. ‘पल्लवसडका’ म्हणजे या शेल्याच्या पदराचे पडलेले निरनिराळे पदर किंवा निऱ्या आहेत. हे निरनिराळे पदर जरी वेगवेगळ्या विचार मतांचे प्रतिनिधित्व करीत असल्या तरी त्या एकाच शेल्याच्या अविभाज्य भाग आहेत.

    स्वाध्याय सुधा सूत्र 2. हा भाग श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व या लेखाचा पूर्वार्ध आहे. याच लेखाच्या उत्तरार्धात या श्रीगणेशाचे उर्वरित तत्त्वरूपाचे चिंतन आपल्याला अवलोकन करण्यास पुढील सूत्रामध्ये उपलब्ध होईल.

    (क्रमश….)
    – वैशाख शु. 9 शके 1943, शुक्रवार (14 मे 2021)..

  • स्वाध्याय सुधा सूत्र 1. आरंभ

    स्वाध्याय सुधा सूत्र 1. आरंभ

    भारतविद्या सारखा विषय, म्हणजे खरतर अनेकविध विषयांचा एक समुच्चय. ही विद्याशाखा अंतःविषय (Interdisciplinary) म्हणजे अनेक वेगवेगळ्या ज्ञानशाखा संगठीतपणे अभ्यासण्याची, अश्या स्वरूपाची आहे. मी खरतर दृश्यकलेमुळे, प्राचीन भारतीय कलेकडे अधिक ओढली गेले. त्यातूनच आज प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य आणि प्रतिमा विज्ञान या विषयामध्ये संशोधन करते आहे. औंढा नागनाथ देवालयासारखे बृहद् देवालय अभ्यासायला घेणे, ही माझ्या वैचारिक क्षमतांना पर्वणीच ठरली. स्वाध्याय सुधा हे त्यातूनच निर्माण झालेले एक वैचारिक मंथन म्हणता येईल.  

    पूर्वपीठिका

    देवालयाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी कलेची नजर लागते हे खरे, पण देवालयाचे अंतरंग समजून घेण्यासाठी अंतःदृष्टीची आवश्यकता असते. भारतीय विद्या या विषयांत पारंगत पदवी मिळाल्यानंतर एक नवे विश्व, नवी आव्हाने समोर उभी राहिली आणि इथूनच हा प्रवाह विस्तारत गेला. मंदिर स्थापत्य आणि शिल्प यांचे स्वयं-अध्ययन सुरु झाले.

    गेली तीन वर्ष सुरु असलेला हा मंदिराचा अभ्यास मला वेगवेगळ्या ज्ञानशाखेशी ओळख करवून देतच होता. यात काही तत्त्व, संज्ञा समजण्यासाठी आणि माझ्या वैचारिक कक्षा रुंदावण्यासाठी काही शास्त्रांचा अभ्यास आवश्यक होता. त्यादृष्टीने संस्कृत, उपनिषद वर्ग, दर्शनशास्त्र, आगामशास्त्र या गोष्टी मला उपयोगी पडत आहेत. केवळ कला आणि त्या कलेतील सौंदर्य हा दृष्टीकोन न राहता त्या कलेमागील प्रयोजन, तत्त्व आणि त्यातून होणारे ज्ञान, यांचा अंतर्भाव या अभ्यासातून मला साधता येतो आहे, तोच आपल्यासमोर मांडण्याचा हा एक प्रामाणिक प्रयास आहे.  

    क्वचित असे वाटेल, की हा प्रपंच आज-आत्ता सुरु केला आहे, पण तसे मुळीच नाही. विचारांना स्थिर करण्यासाठीही एक बैठक लागते आणि तीही परीश्रमानेच प्राप्त होते. त्यामुळे कोणताही विषय मांडताना त्यात माझा काही विचार असतो, चिंतन असते. मंदिराच्या संशोधनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून काही ग्रंथ वाचणे, समजणे क्रमप्राप्तच होते, त्याशिवाय या मंदिराचा अर्थ मला लागला नसता असे वाटते. त्यामुळे या अव्याहत सुरु असलेल्या चिंतन प्रक्रियेत अनेक ग्रंथ माझे गुरु झाले. याशिवाय अनेक विद्वान लोकांच्या सानिध्यात मिळणाऱ्या ज्ञानदानाने माझ्या अभिव्यक्तीला सुंदर आकार प्राप्त होत आहे.

    आरंभ

    भारतविद्या म्हणजे वर म्हणाले तशी अंतःविषय विद्याशाखा, त्यामुळे कोणत्याही विषयाचे ज्ञान करून घेण्यासाठी इतर विषयांची मदत ही अनिवार्य आहे. भारतीय दर्शनशास्त्र परंपरा म्हणजे आपल्या संस्कृतीला लाभलेले हे एक वरदान आहे. शास्त्रीय दृष्टीकोनातून जीवनातील विविध तत्त्वांचे सारभूत ज्ञान ग्रहण करण्याची ही प्रक्रिया अत्यंत समृद्ध करणारी आहे. त्यादृष्टीने दर्शनशास्त्रातील काही विचार समजून घेणे मला श्रेयस्कर वाटले आणि दर्शनशास्त्राचे स्वयं-अध्ययन सुरु केले.

    दि.25 डिसेंबर 2020 रोजी, मोक्षदा एकादशीला मी भावार्थदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी समजून घेण्याच्या दृष्टीने त्यातील एक-एक श्लोक लिहिण्यास सुरुवात केली, आजही लिहित आहे. जानेवारी 2021 पासून वैदिक संशोधन मंडळ, पुणे यांच्याद्वारे घेतले जाणारे उपनिषद् वर्गांना माझी उपस्थिती लावत आहे. या वर्गांमधील तज्ञ आणि अधिकारी मंडळींच्या अनुभवातून आणि ज्ञानसंपदेतून अनेक छोट्या गोष्टी समजत आहेत. वैदिक संशोधन मंडळ, पुणे या संस्थेचे सातत्याने सुरु असलेले हे ज्ञानदानाचे कार्य खरोखरची बहुमुल्य आहे. त्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी राहीन.

    आज संपूर्ण विश्व एक वैश्विक संकटाच्या विळख्यामध्ये जखडून गेले आहे. त्यामुळे सध्याचा काळ अत्यंत बिकट आहे. एक अश्या विचित्र संकटाशी आपण सर्वच लोक झुंज देत आहोत आणि क्वचित त्यात होरपळले ही आहोत. ही माझीही व्यथा आहे. पण काळोख जितका गढद होतो तितकीच सूर्योदयाची घटिका समीप असते, हा आशावाद ठेऊन ही लेखन साधना देवी सरस्वतीच्या चरणी अर्पण करण्याचा मानस आहे.

    या वैश्विक महामारीसारख्या कठीण काळाने मला अंतर्मुख करून, माझ्या आतमध्ये बघायला शिकवले आहे, शिकवत आहे. आज माझी ही पावले बाळबोध असली तरी उद्या या पावलांमध्ये दृढता असेल, त्यासाठी नित्य स्वाध्याय मी सुरु ठेवला आहे. जवळपास तीन वर्ष या वेगवगेळ्या ज्ञान लहरींवर मी हिंदोळे घेत आहे. पण या लाटा अश्याच ओसरून जाऊ नये असे मनापासून वाटते.   

    स्वाध्याय सुधा कशासाठी ?

    स्वाध्याय सुधा हे याच स्वाध्याय अनुभवांवर आधारित आहे. श्रवण आणि मनन करून काही तत्त्वांचे माझ्यापरीने केलेले हे आत्मचिंतन म्हणजे स्वाध्याय सुधा आहे. इथे मी नम्रपणे हे सांगू इच्छिते की, मी काही सर्वज्ञ नाही. मी उपदेश करीत आहे, हे सर्व माझेच ज्ञान आहे किंवा मी ज्ञान देत आहे वैगेरे असा कोणताच अभिनिवेश नाही.

    प्राचीन भारतीय चिंतन परंपरेचे स्वरूप समजून घेणे आणि आपल्या दृष्टीकोनाला अधिकाधिक चिकित्सक दृढता कशी प्राप्त होईल या दृष्टीने प्रयत्नपूर्वक घेतलेली ही मेहनत आहे. त्यादृष्टीने हे मार्गक्रमण सुरु आहे. एक सामान्य विद्यार्थिनी म्हणून माझी जाणण्याची, शिकण्याची, समजून घेण्याची इच्छाशक्ती आहे. ती कार्यरत ठेऊन जाणलेले शब्दबद्ध करावे असे वाटले. त्यासाठी केवळ हा प्रपंच आहे. हे कोणत्याही प्रकारचे धार्मिक प्रवचन नाही, अर्थात तेवढा माझा अधिकारही नाही. पण हो यांत धर्म, दर्शन, कला, संस्कृती, परंपरा अनुषंगाने चिंतन असेल. 

    स्वाध्याय सुधा म्हणजे नेमके काय ?

    स्वाध्याय सुधा या नावातच त्याचा खरा अर्थ आहे, पण तरी माझ्यादृष्टीने मी केलेला त्याचा अर्थ थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळात स्वाध्याय या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक सामान्य अर्थ म्हणजे शास्त्रांचा स्वतः अभ्यास करणे. पण इतक्यावर थांबून चालणार नाही. स्वाध्याय या संज्ञेचा अर्थ समजण्यासाठी सखोल विचार करून दर्शनशास्त्राचा आधार घ्यावा लागतो.

    पातञ्जल योगसुत्रामध्ये स्वाध्याय या संज्ञेचा गहिरा अर्थ आहे, तो योगशास्त्राच्या दृष्टीने सांगितला असला तरी इथे अधिक समर्पक वाटतो. साधनपादचा पहिलाच श्लोक ‘क्रियायोग‘ विषयी सांगतो. या क्रियायोगातील एक भाग म्हणजे स्वाध्याय. स्व+अध्याय म्हणजे स्वतःचे अध्ययन, थोडक्यात स्वतःला जाणणे. हे स्वतःला जाणणे एका विशिष्ट उदिष्ट साध्य करण्यासाठी आहे, त्यामुळे निश्चयपूर्वक जाणणे हे अधिक महत्त्वाचे मानले आहे.

    मला हा अर्थ स्वाध्याय सुधा मधील स्वाध्याय या संज्ञेचा अधिक श्रेयस्कर वाटला. आणि अर्थात सुधा म्हणजे अमृत, जे तृप्ती देते. हा स्वाध्याय म्हणजे माझ्यादृष्टीने चिंतन तृष्णेला तत्त्वज्ञान रुपी सुधा देऊन, अर्थांना नवचैतन्य देणारा अनुभव ठरल्याने स्वाध्याय सुधा हे नावं मला अधिक समर्पक वाटले.

    चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्षारंभ, या दिवशी स्वाध्याय सुधाची संकल्पना प्रसूत झाली, पण काही कौटुंबिक कारणास्तव विलंब झाला. त्यामुळे अक्षय्यतृतीया या शुभमुहूर्तावर, ही संकल्पना शब्दबद्ध करण्यास आरंभ करत आहे.

    बोधसूत्र वरील लेखन प्रपंचाला आजवर आपण वाचकांनी भरभरून प्रतिसाद आणि स्नेह दिलाच आहे. आशा करते स्वाध्याय सुधा ही संकल्पना आणि त्याच्या अंतर्गत केलेले लेखनही आपल्या सर्वांच्या पसंतीस पडेल. आपले अभिप्राय निश्चितच महत्त्वाचे असतील.

    वैशाख शु. 3 शके 1943, अक्षय्यतृतीया (14 मे 2021, शुक्रवार).