Tag: saraswati

  • अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति

    अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति

    आज वसंतपंचमी, मकर संक्रमणानंतर माघ महिन्यात येणारी शुक्ल पंचमी. वसंतपंचमीला वसन्त ऋतूचे पहिले पाऊल पडते आणि निसर्ग आपली कूस बदलतो. निसर्गाच्या बदलत्या रूपात वसन्त ऋतू वेगवेगळे रंग भरायला सुरुवात करतो.

    प्राचीन भारतीय परंपरेत या निसर्गोत्सवा सोबतच मदनोत्सव, श्रीपंचमी आणि ज्ञानपंचमी म्हणून हा दिवस साजरा केला जात असे. आजही उत्तर-पूर्व भारतात वसंतपंचमीला सरस्वती पूजन करून विद्यारंभ केला जातो. या वसंत पर्वाची सुरुवात आपण देवी सरस्वतीच्या प्रतिमा लक्षणांमधून करून घेऊया. 

    ऋग्वेदामध्ये सरस्वतीची दोन रूपे अभिव्यक्त होतात, एक तिचे नदी स्वरूप आणि दुसरे तिचे वाक् स्वरूप. वैदिक परंपरेत सरस्वतीचा अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति म्हणजे मातांमधील श्रेष्ठ माता, नदीमधील श्रेष्ठ नदी आणि देविंमधील श्रेष्ठ देवी म्हणून उल्लेख येतो. उपनिषदांमध्ये तिचे वाक् स्वरूप अधोरेखित करून तिचे ब्रह्मैक्य सांगितले आहे. महाभारतामध्ये सरस्वती ही एका पवित्र नदीच्या रुपात अवतरते. पुराणांमध्ये सरस्वतीच्या जन्माच्या विविध कथा येतात. मत्स्य, मार्कंडेय यांसारख्या पुराणांमधून तिचे मानवी स्वरूप आकार घ्यायाला सुरुवात होते. आगम आणि लक्षण ग्रंथांमध्ये तिच्या मूर्तीस्वरूपाचा उल्लेख येतो. जैन परंपरेत तिला श्रुतदेवी म्हणजे विद्यादेवी म्हणूनच पूजन केले जाते. याशिवाय प्रज्ञप्ती, मानसी, महामानसी ही सरस्वतीची विविध स्वरूपे प्रचलित आहेत. बौद्ध परंपरेतील वज्रयानात वज्रसरस्वती, वज्रशारदा, वज्रवीणा सरस्वती ही स्वरूपे येतात. बौद्ध साधनमाला या ग्रंथात तिच्या अनेक साधना वर्णिलेल्या आहेत. मंजुश्री या ज्ञानदेवाबरोबर त्याची शक्ती किंवा सहचारिणी म्हणून ती शिल्पात दर्शवितात. बौद्ध परंपरेत सरस्वती, ज्ञानदेवता म्हणून प्रज्ञापारमिता स्वरूपातही स्विकारली आहे.  

    नदीतमे सरस्वति 

    मानवासाठी नद्या या जीवनदायिनी आहेत. या नद्यांच्या काठावर मानवाने आपल्या वसाहती केल्या, तसे सांस्कृतिक पुरावे आपल्याला पुरातत्त्वीय उत्खननात मिळतात. भारताचा विचार केला तर भारतातील सर्वात प्रथम वसाहत ही सप्तसिंधू प्रदेशात झाली. हा सप्तसिंधू प्रदेश म्हणजे पंजाब व त्याच्या आसपासचा प्रदेश असून वितस्ता (झेलम), असिक्नी (चिनाब), परूष्णी (रावी), विपाशा (बिआस), शुतुद्री (सतलज), सिंधू आणि सरस्वती या सात नदया आहेत. त्यापैकी सरस्वती ही नदी, वैदिक कालखंडामधील सिंधू प्रमाणेच मोठी आणि महत्त्वाची नदी होती. 

    Credits : Haryana Sarasvati Heritage Development Board. Paleochannel maps by ISRO.

    विलुप्त अवस्थेत असलेल्या या नदीचा प्रवाह पुन्हा खळखळून वाहणार आहे. अनेक प्राच्यविद्या संशोधक, पुरातत्त्वज्ञ, भूवैज्ञानिक, जलस्त्रोत अभ्यासकांनी सरस्वती नदीच्या शोधासाठी अपार कष्ट आणि मेहनत घेऊन तीचे प्राचीनत्व, अस्तिव तीचा प्रवाह यांचा कासोशीने पाठपुरावा केला आहे. जनरल सर कनिंगहॅम यांच्या हिमालय पर्वतरांगेच्या सर्वेमध्ये सरसुती नदी असा उल्लेख येतो, इथून सरस्वती नदीच्या शोधाची चक्रे अधिक प्रभावी आणि गतिमान होताना दिसतात. पद्मश्री डॉ. व्ही एस वाकणकर यांनी सरस्वती नदीची शोध मोहीम अधिक संघटीत केली. अमेरिकन सॅटलाइट लॅण्डसॅट मदतीने सटलाइट मॅप्सवर सरस्वती नदीच्या शुष्क पात्राचे आकाशातून छायांकन करण्यात आले. वाकणकर यांच्या नंतरही हे शोध कार्य सुरूच राहिले. वेधन यंत्राव्दारे मिळविलेल्या पाण्याचे भाभा अणु संशोधन केंद्रात पृथक्करण करून समस्थानिके (आयसोटोप्स) वेगळी करण्यात आली. या सर्व प्रयत्नांमधून सुमारे आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी वाहणाऱ्या सरस्वती आपल्या जलस्रोताने विस्तीर्ण प्रदेशाला सुजलाम-सुफलाम करीत होती, असे दिसते. 

    आज पुन्हा ही सरस्वती हरियाणा मधून जवळपास १९८ किमी. पर्यंत प्रवाहित करण्याचे कार्य सुरु आहे. हा मार्ग यमुनानगर मधील आदिबद्री डॅम पासून सुरु होणार आहे. पुढे हा सरस्वतीचा प्रवाह कुरुक्षेत्र, कैथल मार्गे पंजाबमधून घग्गर नदीला जाऊन मिळणार आहे. 

    सरस्वतीचे प्राचीन महत्त्व हे तिच्या नदी स्वरूपावरून लक्षात येतेच, याशिवाय तिचे विविध परंपरेतील स्थान आणि तिची विविध शिल्पांमधून झालेली अभिव्यक्ती याचा परामर्श घेणे श्रेयस्कर ठरेल.

    देवितमे सरस्वति

    सरस्वतीला देविंमधील श्रेष्ठ देवी असे म्हणताना तिच्या स्वरूपाचे मानवाला असलेले महत्त्व सहज अधोरेखित होते. भारतीय परंपरेमध्ये देवी सरस्वती म्हणजे विद्या आणि कला यांची अधिष्ठात्री देवता मानली आहे. देवी सरस्वतीच्या स्वरूपातील सूक्ष्मता, गूढता आणि तिची श्रेष्ठता ही तिच्या तत्त्वरूपावरून अधिक स्पष्ट होते. 

    परंतु तिच्या विविध स्वरूपातील शिल्पांमधून तिचे बदलते स्वरूप जाणून घेता येते. हिंदू, जैन आणि बौद्ध परंपरेत विद्यादात्री हे तिचे स्वरूप अत्यंत लोकप्रिय झाले होते, हे तिच्या प्रतिमांवरून दिसते. 

    हिंदू परंपरेतील सरस्वती 

    हिंदू परंपरेत सरस्वतीची वाक्, वाणी, वाग्देवता, वागीश्वरी, शारदा, ईळा, भारती, धेनु अश्या विविध स्वरूपात पूजन केले जाते. परंतु प्रतिमाशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर प्रत्यक्ष शिल्पांच्या सोबतच प्रतिमालक्षणाचा उल्लेख महत्वाचा ठरतो. अपराजितपृच्छा, विष्णुधर्मोत्तरपुराण, अंशुमद्भेदागम, पूर्णकारणागम, रूपमण्डन, शिल्परत्न या ग्रंथांच्या आधारे सरस्वतीचे प्रतिमाशास्त्र अभ्यासता येते. शिल्पांमध्ये सरस्वती ही आसनस्थ बसलेली, स्थानक म्हणजे उभी आणि क्वचित नृत्य करीत असलेली शिल्पे आढळतात. ग्रंथांमध्ये श्वेतपद्मासनावर बसलेली दाखवावी असा उल्लेख येतो. विष्णूधर्मोत्तरपुराण मात्र तिच्या वीणाधारी स्थानक प्रतिमांचा उल्लेख करते. तिची कांती श्वेत असून तिची वस्त्रेही तशीच असावी. तिच्या हातामध्ये अक्षमाला, पुस्तक, पद्म असावे. यज्ञोपवीत धारण केलेल्या सरस्वतीचे शीर्ष हे जटामुकुटमंडित असावे असे मूर्तीविधान सांगितले आहे. उपरोक्त प्रतिमांमध्ये सरस्वतीचे शीर्ष हे सुंदर अश्या मुकुटाने मंडित आहे. रूपमंडन सरस्वतीच्या महाविद्या, सरस्वती स्वरूपाचे वर्णन करते. होयसळ हळेबिड येते हातात वीणा धारण करणारी नृत्य सरस्वती ही बघायला मिळते. 

    जैन परंपरेतील श्रुतदेवी 

    तिलोयपण्णत्ती या ग्रंथामध्ये सरस्वतीच्या श्रुतदेवी या स्वरूपाचा उल्लेख येतो. इ.स.2 शतकातील मथुरा येथील कंकालीटिला येथी सरस्वतीची अभिलेखीत प्रतिमा मिळाली आहे. ती सर्वात प्राचीन मानता येते. श्रुतदेवीला जीनवाणी म्हटले जाते, त्यामुळे ती जिनेन्द्र इतकीच प्रामाणिक आणि पूज्य मानली आहे. जैन प्रतिमाशास्त्राचा विचार केला तर तिचे श्रुतदेवी ही श्वेतवर्णा, श्वेतवस्त्रधारीणी, हंसवाहिनी आणि चतुर्भुजा असते. तिच्या हातामध्ये वीणा, पुस्तक, अक्षमाला आणि पद्म असते.

    बौद्ध परंपरेतील सरस्वती  

    बौद्ध परंपरेत वज्रवीणा सरस्वती ही द्विभुजा असून ती वीणावादन करताना दाखवतात. वज्रयानाच्या काही तंत्रसाधनांमध्ये सरस्वतीच्या प्रतिमा बघायला मिळतात. वज्रसरस्वती ही त्रिमुखा, षड्भुजा आणि प्रतिलीढासनात उभी असते. तिच्या हातामध्ये पद्म, खड्ग, सुरा, चक्र, वीणा आणि मुण्ड दाखवतात. 

    वज्रशारदा ही भद्रासनात बसलेली द्विभुजा दाखवतात. तिच्या डोक्यावर चंद्रकोर असते. तिच्या दोन हातांमध्ये पद्म आणि पुस्तकं असते. इ.स.8 शतकातील बसाल्ट दगडातील वज्रशारदेची प्रतिमा Archaeological Museum – Nalanda मध्ये आहे.

    सरस्वतीचे मूळ स्वरूप हे वैदिक वाङ्मयामधून नदी देवतेपासून उत्कांत होत होत ती वाणी देवता झाली. तिच्या तीरावर वसलेल्या मानवासाठी ती मातेप्रमाणे भरण- पोषण करणारी झाली. तिच्या प्रेरणा शक्तीने ब्रह्मतत्त्वाची साधना करण्याची ज्ञानपरंपरा आकार घ्यायला लागली. सरस्वती विविध परंपरांमधून ज्ञानदेवता, कलादेवता म्हणून अभिव्यक्त होत होती. विद्यादेवता म्हणून हिंदू, जैन आणि बौद्ध या तीनही परंपरांमध्ये अग्रस्थानी राहिली. आजही विद्यारंभ करताना आपण सरस्वती पूजनाने सुरुवात करतो. म्हणूनच सरस्वतीच्या प्रतिमांमधून असो वा ग्रंथांमधील वर्णनांच्या आधारे तिचे अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति हे स्वरूप शतकानुशतके मानवासाठी तसेच अबाधित आणि पूजनीय राहिले आहे, असे दिसते.  

     

  • वसंतोत्सव- निसर्गाच्या नवलाईचा सोहळा

    वसंतोत्सव- निसर्गाच्या नवलाईचा सोहळा

    हर्ष, उल्हास, आनंद यांचे दुसरे नावं म्हणजे वसंतोत्सव. भारतीय उत्सव म्हणजे आपल्या संस्कृतीच्या लौकिक अंगाचे उत्स्फूर्त दर्शन घडवणारे क्षण. निसर्गाच्या विलोभनीय सौंदर्याची उधळण करत ऋतुराज वसंत येतो. या वसंताचे पहिले पाऊल पडते ते वसंतपंचमीला. मकर संक्रमणानंतर माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला वसंत ऋतूचे शुभागमन होते. या वसंतपंचमीचे वेगवेगळे पैलू आपल्या जीवनात चैतन्य आणि उल्हासाचे रंग भरतात. सृष्टी सौंदर्याने मोहित होऊन, विधात्याच्या सौंदर्यशक्तीच्या कल्पनेत रमणारी ही आपली संस्कृती आहे. निसर्गाच्या नव्या रूपातून मिळणारा हा आनंद मनुष्याच्या सुखाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे स्वाभाविकच, अश्या उत्सवांना एक लौकिक महत्त्व प्राप्त होते. आजच्या युगामध्ये आपण ही नवचैतन्याची दोर मागे टाकत आहोत.

    ऋतुचक्रातील वसंत म्हणजे ऋतूंचा राजा. ऋग्वेदामध्ये वसंत, ग्रीष्म आणि शरद हे तीन ऋतू येतात. पुढे वसंत, ग्रीष्म, शरद आणि हेमंत, शिशिर किंवा वर्षा अशी पाच ऋतूंची संकल्पना विकसित झालेली दिसते. शतपथ ब्राह्मण, यजुर्वेद यांसारख्या वाङ्मयातून ऋतू वर्णने येतात. वाल्मिकी रामायणात वसंत ऋतूची सुंदर वर्णने येतात. निसर्गाशी माणसाचे असलेले अतूट नाते या ऋतूंच्या वर्णानातून अनेकदा अभिव्यक्त होताना दिसते.

    वसंतोत्सव तीन सूत्रांमध्ये गुंफल्यासारखा आहे. वसंतपंचमीला ‘श्रीपंचमी’ म्हटले जाते. श्री म्हणजे लक्ष्मी, तिचा जन्मदिवस म्हणून श्रीपंचमीचे महत्त्व आहे. याच दिवशी ज्ञान आणि कलेची देवता, सरस्वतीचेही पूजन केले जाते. लहान मुलांचा विद्यारंभ या तिथीपासून केला जातो. ऋतूबदलांमुळे निर्माण होणाऱ्या भावभावनांचे प्रतिबिंब या उत्सवामधून डोकावते. त्यामुळे पारिवारिक समृद्ध जीवनासाठी लोकं मदन-रतीचे पूजन करतात. माघ-फाल्गुन हे शेतकऱ्यांच्या दुसऱ्या सुगीचे दिवस असतात. मातीची ऊर्जा टपोऱ्या कणसातून दिसायला लागते. आंब्याचा मोहर, त्याचा उग्र मादक वास दरवळायला सुरु होतो. शेत शिवारांमधून समृद्धीच्या लाटा वाहत राहतात आणि आपण सर्वही त्या आनंदाच्या डोहात तरंगतो. एकूणच नवचैतन्याची चाहूल लागते ती वसंतपंचीमीपासून, आणि सुरु होतो तो वसंतोत्सव.

    फाल्गुन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या वसंतोत्सवाचे अनेक उल्लेख आपल्याला प्राचीन साहित्यांतून आणि शिल्पांतून दिसतात. सुवसंतक उत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव, दोला, नाटक असे अनेक उत्सव आणि क्रीडा या वसंतोत्सवाचा एक भाग म्हणून साजरे होत असत. निसर्ग काया परिवर्तनाची अनुभूती देणारा हा वसंतोत्सव, कवी मनालाच नाही तर चित्रकार, शिल्पकार, नृत्य-संगीत-नाट्य कलाकारांना भुरळ घालणारा विषय ठरला. त्यामुळे अनेक कलाकृतींमधून या उत्सवाचे दुवे सापडतात. वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ जनसामान्य, सुवसंतक उत्सव साजरा करतात, असा उल्लेख वात्सायन कामसुत्रामध्ये येतो. या सुवसंतक उत्सवात लोकं नृत्य-संगीतात तल्लीन असतात. भास रचित चारुदत्त नाटकामध्येही कामदेव पूजन पर्वाचा उल्लेख येतो.

    कुषाण काळापासून भारताचा पूर्व आणि पश्चिम देशांशी व्यापार वाढला होता. स्वाभाविकच हा काळ म्हणजे देशामध्ये आर्थिक सुब्बता नांदत होती. त्यामुळे ऐहिक जीवनाचा दर्जा उंचावून लोकांचा कल, विलास आणि कला यांमध्ये रममाण होणारा होता. त्यामुळे या काळापासून ललितकला आणि वाङ्मय यांना बहर आला. या कलाकृतीतून तत्कालीन समाज जीवनाचे दर्शन आपल्याला घडते. कवी कुलगुरू कालिदास, श्रीहर्ष यांच्या संस्कृत नाटकांतून, काव्यांतून या उत्सवांचे वर्णन आले आहे. कालिदासकृत अभिज्ञानशाकुंतल मध्ये मदनोत्सवाचे वर्णन येते. कामदेवास आंब्याचा मोहर अर्पण करून त्याचे पूजन होत असे, असा उल्लेख येतो.

    ऋतूसंहार या काव्यातून कालिदासाने ऋतूंचा सोहळा साक्षात उभा केला आहे. या ऋतू बदलाचा पशुपक्ष्यांवर आणि मानवी भावभावनांवर होणारा परिणाम या काव्याच्या रूपाने अनुभवता येतो. वसंत हा मदनाचा सखा, त्यामुळे वसंतागमन आणि मदनोत्सव यांचे स्वाभाविकच दृढ नाते स्पष्ट होते. ऋतूसंहार या काव्यामध्ये कालिदास वसंत ऋतूला योद्ध्याची उपमा देतो. वसंत ऋतूच्या निसर्गाच्या सौंदर्याचे वर्णन पुढील श्लोकातून व्यक्त होते.

    द्रुमाः सपुष्पाः सलिलं सपद्मं स्त्रियः सकामाः पवनः सुगन्धिः ।
    सुखाः प्रदोषा दिवसाश्च रम्याः सर्वं प्रिये चारुतरं वसन्ते ।। ऋतू. (६.२)

    वसंत ऋतूमधील फुलांनी लगडलेले वृक्ष, कमळपुष्पांच्या सानिध्यात मोहक दिसणारी जलाशय, वाऱ्यासोबत पसरणारा मोहराचा मादक सुगंध, प्रणयतूर ललना, सकाळचा तेजस्वी सूर्य आणि सुखकर, रमणीय संध्या असे लालित्यपूर्ण अवलोकन कालिदासाच्या काव्यातून दिसते. वसंत वायूचे विलोभनीय अस्तित्व कालिदासाच्या काव्यातून शब्दाकार घेऊन अवतरीत होते.

    आकम्पयन्कुसुमिताः सहकारशाखा विस्तारयन्परभृतस्य वचांसि दिक्षु ।
    वायुर्विवाति हृदयानि हरन्नराणां नीहारपातविगमात्सुभगो वसन्ते ।। ऋतू. (६.२४)

    धुके नाहीसे झाल्यामुळे सुखकर वाटणारा वायू आम्रशाखा हलवीत, कोकिळांचे आलाप सर्व दिशांत पसरवित, जनांची अंतःकरणे आकर्षित करीत वाहत आहे.

    अभिजात संस्कृत साहित्यामधून अशोकोत्सव संदर्भात रोचक माहिती मिळते. अशोकोत्सव हा वसंतोत्सवाचा एक भाग म्हणून साजरा होते असे. रूपवती लावण्याच्या पदस्पर्शाने अशोक वृक्ष मोहरतो, अशी लोकमानसात प्रथा प्रचलित होती. इतकेच नव्हे तर मोहरलेल्या अशोकाचे दर्शन सुद्धा शुभ मानीत असत. याची साक्ष कालिदासकृत मालविकाग्नीमित्र या नाटकामधून होते. दोला हाही वसंत उत्सवाचा भाग होता ज्यात लोकं आनंदाने सहभागी होत. दोला म्हणजेच झोका, आपण त्याला हिंदोळा म्हणतो. प्रियजनाच्या सहवासात हिंदोळा झुलणे, माणसाच्या मनामध्ये बहरलेल्या अनुरागाचे दर्शन घडवतो.

    धार्मिक अनुष्ठानांपेक्षा हे उत्सव मनोरंजन आणि लोकरंजन म्हणून अधिक व्यक्त होत असत. त्यामुळे नृत्य, संगीत, नाटक, क्रीडा यांचा मनमुराद आनंद या उत्सवातून प्रतीत होत असे. वसंतोत्सवाचाच एक भाग म्हणून, रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते. महाराष्ट्र आणि राजस्थानात रथसप्तमी साजरी करतात. राजस्थानमध्ये रथसप्तमीला भानुसप्तमी असेही म्हणतात.

    एकूणच निसर्गाच्या रुपामध्ये वसंत आगमन, मनुष्याच्या आयुष्यात नवी उर्मी, नवा उत्साह, नवी प्रेरणा घेऊन येते. सरस्वती साधकास विद्यार्जनास सुरुवात करून ज्ञानामृताचा संचय करता येतो. श्रीलक्ष्मीच्या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे ऋतुराज वसंत म्हणजे ज्ञान, समृद्धी आणि सुखाचे त्रिवेणी सूत्र आहे.