Year: 2017

  • नवरोझ

    नवरोझ

    नवरोझ म्हणजे पारशी नववर्ष. नवरोझ इंग्रजीमध्ये Novruz, Nowrouz, Nooruz, Navruz, Nauroz किंवा  Nevruz अश्याप्रकारे विविध पद्धतीत लिहिले जातात.

    सांस्कृतिक दृष्टीनी महत्वाच्या असलेल्या ह्या पारशी सणासाठी अनेक देशांनी पुढाकार घेऊन ह्या सणाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ह्या देशांमध्ये भारत, इराण,पाकिस्थान, उजबेगीस्थान, अझरबैजान, किर्गीजस्थान आणि तुर्कस्थान ह्यांचा समावेश आहे.

    विशाल भौगोलिक क्षेत्रावर वसंत ऋतूच्या आगमनासाठी दरवर्षी नवरोझ हा 21 मार्चला साजरा केला जातो. नवरोझ हा स्थानिक परंपरांशी निगडित असलेला सण आहे जो पारशी स्त्रियांनी पारंपरिक पद्धतीने जातन केला आहे. नवरोझ हा जमशेदच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

    Intangible Heritage of India -Nawrouz

    हा सण  एका विशिष्ट  पद्धतीने साजरा केला जातो. ह्यात पारंपरिक गाणी, खेळ, पारशी लोकांची खाद्यसंस्कृती, रांगोळ्या, कथा ह्यांचा समावेश होतो. घोड्यांच्या शर्यती, कुस्ती सारखे खेळही खेळले जातात. ह्याशिवाय पाण्यावरून, आगीवरून उड्या मारणे, आगीवरून चालणे असे चित्तथरारक खेळही खेळले जातात. धार्मिक विधींमध्ये शांतता, मैत्री आणि शेजारधर्मासाठी, सर्व मानवजमातींमध्ये शांतात प्रस्थापित होण्यासाठी प्रार्थना केल्या जातात. घराबाहेर मेणबत्या प्रज्वलित केल्या जातात.


    2009 साली नवरोझ ह्या पारशी सणाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात केरळ मधील मुडीयट्टू म्हणजे काय ते बघूया.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO

  • सामान्यातील असामान्य – डॉ. शोभना गोखले

    सामान्यातील असामान्य – डॉ. शोभना गोखले

    पुराभिलेखविद्या आणि त्याच अनुषंगाने मी सध्या शिकत असलेला नाणकशास्त्र  ह्या विषयांच्या आधारे आपल्याला तत्कालीन सामाजिक स्थिती, राजकीय घडामोडी, धार्मिक व्यवस्था आणि आर्थिक उलाढालींची कल्पना येते. शिवाय हे लेख आणि नाणी विश्वासार्ह्य असल्याने त्यांच्या अभ्यासाचे अतिशय महत्व आहे, किमान भारतीय इतिहासासाठी तरी. पण प्राच्यविद्या शिकताना केवळ जुन्या अवशेषांची, लेखांची, नाण्यांची, मूर्तींची मदत होते असे नाही तर ह्या विषयांसाठी काम केलेल्या संशोधकांच्या शोधांचेही महत्त्व थोर आहे. अनेक विद्वानांनी अश्या विषयांवर प्रचंड काम करून आमच्यासारख्या भावी अभ्यासकांना पुढच्या संशोधनासाठी एक नवीन वाट तयार करून दिली आहे. अश्या अभ्यासकांमध्ये देखील स्त्रियांनी त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीच्या पाऊलखुणा मागे ठेवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे डॉ. शोभना गोखले.

    सुप्रसिद्ध पुरातत्वज्ञ डॉ. शोभना गोखले यांनी पुरातत्वशास्त्र, पुराभिलेखविद्या, नाणकशास्त्र ह्यांसारख्या विषयांचा दीर्घ अभ्यास करून भारताच्या इतिहासाच्या पुनर्रचनेत आणि विशेषतः प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासात खूप मोलाचा वाटा उचलला आहे, हे तर सर्वश्रुत आहेच. पण हा अभ्यास, हे चिंतन करत असताना त्यांना अनेक महादिव्यातूनच पार व्हावं लागलं आहे. डॉ. शोभना गोखले ह्याचं एक पुस्तक, ललाटलेख 1 म्हणजे त्यांच्या जीवनाचा एक अभिलेखच आहे. माझ्या दुर्दैवाने माझी आणि डॉ. शोभना गोखले ह्यांची प्रत्यक्षात कधी भेट झाली नाही, पण हो पुस्तक रूपांनी त्या मला भेटल्या. त्यांच्या सारख्या अनेक गुरुतुल्य लोकांचे कार्य जेव्हढे मोठे तितक्याच बिकट त्यांच्या अडचणीही होत्या. त्यामानाने माझ्या अडचणी शुल्लकच वाटतात मला. पण ज्या ज्या वेळी माझे मनोधैर्य खचतं त्यावेळी गोखले बाई आणि त्यांच्यासारखे इतर अनेक थोर विद्वत्त, अभ्यासंकांचे शब्द माझ्या पाठीवर हात फिरवतात आणि पुन्हा मला उभं करतात.

    शोभना बाई मुळच्या सांगलीच्या. त्याचं लहापण सुखांत आणि आनंदात गेलं. एकत्र कुटुंबपद्धती आणि एकूणच भरलेलं घर अश्या वातावरणात त्या मोठ्या झाल्या. 8 जून 1952 ह्या दिवशी बापटांची लेक गोखल्यांकडे आली. त्यांच्या लग्नानंतर त्यांनी प्राचीन भारतीय संस्कृती ह्या विषयाचे अध्ययनाला सुरुवात केली. ह्या विषयांचे तास त्याकाळी पुणे विद्यापीठ, भांडारकर प्राच्यविद्यामंदिर आणि डेक्कन कॉलेज इथे चालत. त्यामुळे अश्या तीन ठिकाणी जाऊन हा विषय त्या शिकत होत्या. शिवाय भांडारकर प्राच्यविद्यामंदिरात त्यांना अर्ध्या दिवसाची नोकरीही होती. डॉ. हसमुख धीरजलाल सांकलिया – प्रागैतिहास, डॉ. रामचंद्र नारायण दांडेकर- संस्कृत साहित्याचा इतिहास, प्रा. आर. डी. करमरकर – धर्म आणि तत्वज्ञान तर त्यांचे काका पु. वी. बापट ह्यांच्याकडून बौद्ध धर्म आणि त्याचा इतिहास आणि आर्थिक इतिहास त्या शिकत होत्या. इतर विषयांसाठी शिक्षक नसल्याने स्वयंअध्ययन त्यांनी केले. शोभना बाईंचे पती ल. ना. गोखले हे विख्यात पत्रकार होते. त्यांच्या परिचयातून ग. ह. खरे ह्यांच्याकडून त्या मुर्तीशास्त्र हा विषय शिकल्या. ह्या M.A. च्या प्रवासात त्यांच्या गरोदरपणाची गोड बातमी आली. एक वर्षाचा ड्रॉप पडला खरा पण भारत इतिहास संशोधक मंडळात बसून त्यांनी पुन्हा अभ्यास सुरु केला. डॉ. हसमुख धीरजलाल सांकलिया ह्यांच्या मार्गदर्शनाने Historical Geography and Ethnography of Madhya Pradhesh या विषयात Ph.D. केली.

    डेक्कन कॉलेज मध्ये काम करताना त्यांना श्रीलंकेच्या प्रवासाचा योग आला. भारतीय अभिलेखांमधील श्रीलंका आणि तिचे योगदान ह्या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. पुढे लंडन, इटली, ब्रिटन, बेल्जियम, अमेरिकेतही त्यांनी त्यांचे संशोधन सादर केले. अमेरिकेत तर भारतीय संस्कृती परिषदेत त्यांनी पंढरपूरची वारी आणि तिचा धार्मिक आणि सामाजिक अर्थ हा शोधनिबंध सादर केला.

    बाईंच्या लिखाणावरून त्यांची शिस्त आणि कामाचा ओघ लक्षात आल्याशिवाय राहत नाही. एकीकडे कुटुंब आणि दुसरीकडे नोकरी सांभाळत जीवनातला उन्ह-पावसाचा खेळ सांभाळत ह्या श्रावणसरी त्या जगल्या. कोकणामधील एक शिलालेख वाचण्यासाठी कंबरेइतक्या पाण्यातून जाऊन लेखांच वाचन त्यांनी केलं. कान्हेरीच्या गुंफांमधील शिलालेख हे उंचावर होते, ते वाचण्यासाठी शिड्यांवर चढून त्या लेखांचे ठसे बाईंनी घेतले. कान्हेरी येथील बौद्धलेण्यांजवळच्या दरीमध्ये बौद्धभिक्षूंच्या स्मारकशिळा त्यांना सापडल्या त्यावरून त्या बौद्ध आचार्यांची नावे, त्यांचे गुणविशेष इतकेच नाही तर कान्हेरीत नांदणारी एक गुरुपरंपराच त्यांच्या संशोधनातून समोर आली. नाणेघाटातील नागणिकेचा लेख आणि त्या लेखाच्या आधारे नागणिकेने केलेल्या यज्ञात हजारो कार्षापणांच्या दक्षिणा दिलेल्या दिसतात. सध्याचे वाशिम ही वाकाटकांची राजधानी होती. त्यांचे गुरु डॉ. सांकलिया ह्यांच्या सांगण्यावरून ऐतिहासिक पुराव्यांच्या शोधात त्या विदर्भातील वाशिमला गेल्या. वाकाटक राजा देवसेन याचा हिस्सेबोराळा, वाशिम येथला शिलालेख तर बाईंना वत्सगुल्मा नावाच्या लहानश्या नदीच्या काठी सापडला होता. पण ह्या लेखामुळे वाकाटक राजवंशातील महत्त्वाचा पुरावाच हाती लागला. वाकाटक राज्यांची वंशावळ आणि काल्लोलेख ह्यांवर प्रकाश पडला. कच्छमधील अंधौ इथला लेख वाचण्यसाठी वाळवंटातून, ऐन उन्हाळ्यात भर दुपारी घोड्यावरून प्रवास केला.

    मध्यंतरी इतिहास संशोधन मंडळातील एका कार्यक्रमातील बाईंची एक संग्रहित मुलाखत बघायला मिळाली. त्यामध्ये त्यांच्या भारताचे सांस्कृतिक वैभव ह्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांना ऐकायला मिळाले. 1973 साली बाई कान्हेरीला गेल्या होत्या. पायथ्याशी त्यांना एक छोटीशी खोली मिळाली होती जिच्या दरवाज्याला कडी नव्हती. अक्षरशः टेबल लाऊन दार बंद करावे लागत होते. अश्या परीस्थितीत रात्री अचानक तिथेच ऑफिसमागे राहणारे लोक ताटं वाजवायला लागले आणि बाईंना ओरडून सांगत होते ‘गोखले बाई घाबरू नका वाघ आला आहे.’ तो वाघ जाईपर्येंत बाई टेबलाला घट्ट धरून उभ्या होत्या. अश्याही कठीण प्रसंगाला त्या खरोखरच धीराने सामोऱ्या गेल्या.

    बाईंच्या शोधनिबंधांचे, संशोधांचे अभ्यासकांच्या कडून वेळोवेळी पत्र लिहून किंवा प्रत्यक्ष कौतुक होत होते. सातवाहनकालीन नाण्यांच्या अभ्यासाबद्दल त्यांना सर बिडूल्फ परितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. 2008 साली त्यांना परमेश्वरीलाल गुप्ता हे पारितोषिक मिळाले. ह्याशिवाय त्यांना  गार्गी पुरस्कार, सप्तर्षी पुरस्कार ह्यांसारखे अनेक पुरस्कार आणि अनेक मान्यांकित फेलोशिपच्या त्या मानकरी ठरल्या.

    अनेक डोंगरदऱ्या, घाटमाथे, नदीकिनारे पार करून संशोधनाचा अविरत ध्यास हा त्यांनी सोडला नाही, आणि तोही संसार आणि नाती सांभाळत. स्वतःला त्या चारचौघींप्रमाणे सामान्य म्हणवतात खऱ्या पण त्यांच्या ललाटलेखांतून मात्र एका असामान्य शोभना बाईंचे दर्शन घडते. जिज्ञासा, कल्पकता, धाडस, चिकाटी, धैर्य  आणि एक स्त्री म्हणून नात्यांमधला मार्दव जपत जीवनाची वाटचाल करणाऱ्या या नारी शक्तीला माझा सलाम.

    बाईंचा जीवनप्रवास त्यांनीच त्यांच्या शब्दांत काही काव्यपंक्तीमध्ये समर्पक साठवला आहे.

    जीवनगाथा

    विश्वमोहिनी सरस्वतीचे मंदिर
    मज वाटे क्षितिजावरती दूर
    मुग्धमोगरा मनमोहित करी
    चाफा मनगाभा भरून राही उरी

    1.
    गोखले, डॉ. शोभना . ललाटलेख (आत्मवृत्त) . काॅन्टिनेन्टल प्रकाशन; 2014.
  • चंद्रशेखर शिव

    चंद्रशेखर शिव

    आज सर्वत्र महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे. शिव भक्तांसाठी महाशिवरात्रीचे महत्त्व अधिकच आहे. माघ वद्य चतुर्दशीची रात्र म्हणजेच महाशिवरात्र, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. महाशिवरात्रीशी संबंधित अनेक कथांचा वेगवेगळ्या पुराणांमधून उल्लेख येतोच. त्या कथांच्या माध्यमातून शिवाच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शनही आपल्याला होत असते. या सर्व कथांपैकी, आज बोधसूत्रच्या माध्यमातून मी शिवाच्या एका अतिशय मनोरम आणि लोभस अश्या मूर्तीची माहिती आणि त्या संबंधीच्या कथा आपल्यासमोर आणणार आहे. या कथा वर्णनाच्या माध्यमातून शिवमूर्तीचे सौंदर्य आणि त्या मूर्तीची काही मिथके आपण बघणार आहोत. एखादी मूर्ती घडण्यासाठी या कथा किंवा काव्य महत्त्वाचे असतात. काव्यामधील संवेदना कितीही अलंकृत असल्या, तरी शिल्पाकारांनी मूर्ती घडवताना त्या भावना मूर्तीत उतरवलेल्या असतात हे आपल्याला ती मूर्ती बघून समजते.

    पूर्वजन्मातील दक्षकन्या सती हिने, हिमावन आणि मेना यांची कन्या गिरीजा म्हणून पुन्हा जन्म घेतला. ही गिरीजा किंवा पार्वती लहानपणापासूनच शिवभक्तीत लीन होती. पुढे बाल्यावस्था संपल्यावर मात्र तिने साक्षात शिवाने तिचे पाणिग्रहण करावे असा हट्टच केला आणि तो हट्ट पूर्ण करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. अश्या अनेक कथा आपल्याला शिवपुराण, स्कंदपुराण, पद्मपुराण यांसारख्या पुराणांमध्ये आढळतात. पण मला भावलेली कथा म्हणजे शिव पार्वतीच्या कठोर तपश्चर्येला प्रसन्न होतो. त्या दोघांचा विवाह निश्चित होतो आणि सुरुवात होते ती लग्नाच्या तयारीची, ती कथा. लग्नाच्या तयारीची कथा तशी कमीच आहे पण त्यातून संन्यासी शिव हळूहळू कसा आकर्षक चंद्रशेखर बनतो, याचे उल्लेख आपल्याला मिळतात.

    देवांचा देव महादेव, ज्याला आपण सदैव अंगाला चिताभस्म लावलेला, जटांचा केशसंभार असलेला, वाघाची कातडी कमरेला गुंडाळलेला, अंगावर सर्प खेळविणारा बघितला आहे. पण चंद्रशेखर शिव म्हणजे एखाद्या राजकुमाराप्रमाणे तेजस्वी आणि आकर्षक दिसणारा अश्या स्वरूपाचा आहे. हे शिवाचे मनोहारी चंद्रशेखर स्वरूप सर्वप्रथम कुषाण राज्यांच्या नाण्यांवर बघायला मिळते. लिंगोत्भव कथेच्या शिल्पंकनामध्येही चंद्रशेखर आढळतो. चंद्रशेखर मूर्तीचे तसे तीन प्रकार सांगितले आहेत. केवल चंद्रशेखर, उमासहित चंद्रशेखर आणि उमामहेश्वर आलिंगन मूर्ती. आज आपण केवल चंद्रशेखर मूर्ती बघणार आहोत.

    चंद्रशेखर शिव

    चंद्रशेखर शिव म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य. चतुर्भुज, समपाद स्थानक. तिसरा नेत्र धारण केलेल्या या शिवाचा चेहरा सतेज, प्रसन्न आणि शांत भावांनी युक्त असतो. उजवा हात अभय मुद्रेत तर डावा हात वरद मुद्रेत. मागच्या उजव्या हातात टंक किंवा परशु धारण केलेला आणि डाव्या हातात कृष्णमृग. जटामुकुट अलंकारांनी सुशोभित केलेला आणि त्यावर बारीक चंद्रकोर सजवलेली. त्या जटामुकूटात एक सर्प. चंद्रशेखर शिव हे अतिशय लोभस स्वरूप आहे ज्यात शिव दोन्ही पायांवर समान भार देऊन उभा आहे. ही त्याची समभंग अवस्थेतील मूर्ती त्याचा राजस भाव दर्शविते. व्याघ्रचर्मा ऐवजी पितांबर नेसलेला शिव ह्या मूर्तीत दिसतो.

    मूर्तीशास्त्राच्या दृष्टीकोनातून जेव्हा आपण ह्या मूर्तीकडे बघतो त्यावेळी शिल्पशास्त्र ग्रंथ, अगमग्रंथ शिवाच्या चंद्रशेखर स्वरूपाची चर्चा करतात. बारकाईने बघितल्यास त्याच्या हस्तमुद्रा, कर्णाभूषणे, अलंकार, वस्त्र, चेहऱ्यावरील भाव आपल्याला ह्या चंद्रशेखर कथेशी एकरूप करतात.

    मुद्रा आणि भाव

    ही चंद्रशेखर शिव मूर्ती चार हातांची आहे. तिचा पुढचा उजवा हात अभय मुद्रेत असतो आणि पुढचा डावा हात वरद मुद्रेत. कधीकधी पुढचा डावा हात हा कटावलंबित मुद्रेत असतो. मागचे दोन्ही हात हे कर्तरीमुख मुद्रेत असतात. मागच्या उजव्या हातात परशु आणि डाव्या हातामध्ये हरीण असते. या परशूच्या पात्याचे मुख हे बाहेरच्या दिशेला असते तर मृग शिवाच्या चेहऱ्याकडे बघणारे असते.

    नंदिकेश्वराच्या अभिनय-दर्पण या ग्रंथाच्या अनुवादात या कर्तरीमुख मुद्रेच्या उत्पत्तीची कथा आली आहे. जलंधर वधाच्या आधी शिव पृथ्वीच्या मध्यावर त्याच्या तर्जनीने कर्तरीमुख मुद्रेत एक वर्तुळ काढतो अशी ह्या मुद्रेची उत्पत्ती सांगितली आहे. पण मुर्तीशास्त्र ग्रंथांमध्ये ह्या मुद्रेची माहिती येते. अंगठा आणि अनामिका हे बरोबर तळहाताच्या मध्यावर आणून अंगठ्याने अनामिका धरलेली असते आणि तर्जनी आणि मध्यमा एकमेकांपासून लांब, कात्रीच्या स्वरूपात असतात.

    या मुद्रेचे अनेक अर्थ होतात परंतु चंद्रशेखर मूर्तीशी जर या मुद्रेचा संबंधातील अर्थ घ्यायचा झाला तर या मुद्रेचा आणि त्या मुद्रेत धारण केलेल्या आयुधांचा एक विशिष्ट अर्थ प्रतीत होतो पण त्याची चर्चा आपण भविष्यातील लेखांमध्ये करणार आहोत.

    चंद्रशेखर मूर्ती ही मुळातच सोळा वर्षीय तरुणाप्रमाणे दाखवली जाते. त्याच्या चेहऱ्यावर तरुणाईचे तेज तर असतेच, सोबत शांत, गहिरे भावही स्पष्ट दिसतात.

    अलंकार आणि आभूषणे

    शिवाच्या जटांची विशिष्ट केशरचना चंद्रशेखर या मूर्तीतून दिसते. काही जटा ह्या डावीकडे, काही उजवीकडे आणि काही मधून मागे गेलेल्या एकावर एक अश्या पद्धतीने व्यवस्थित बांधलेल्या असतात. हा जटामुकुट सर्पबंधाने बांधून अलंकरणांनी सुशोभित केलेला असतो. खऱ्या अर्थाने ह्या मुकुटाचे सौंदर्य खुलते ते बारीक पण तेजस्वी चंद्रकोरीने. खरंतर डोक्यावर चंद्रकोर धारण केलेला म्हणूनच ह्या मूर्तीला चंद्रशेखर शिव असे म्हणतात.

    कर्ण अलंकारांमध्ये, एका कानात जी कर्णभूषणे असतात त्यांना रत्नकुंडल, शंखपत्र किंवा पद्मपत्र म्हणतात. दुसऱ्या कानातील कर्णभूषणांना मकरकुंडल किंवा पत्रकुंडल म्हणतात.
    गळ्यात मोत्याचे मुक्ताहार असावेत, रत्नांनी युक्त रत्नाहार असावेत. या हारांना सुशोभित करणारी पदके असावीत. डाव्या खांद्यावरून येणारे यज्ञोपवित असावे. याशिवाय छन्नावीरा आणि उदरबंध असावे. दंडामध्ये केयूर आणि हातामध्ये कटक असावेत. बोटं अंगठ्यांनी अलंकृत असावीत आणि पायामध्ये नुपूर असावीत असे मूर्तीशास्त्र सांगते.

    पुराणांतील चंद्रशेखर

    चंद्रशेखराच्या मूर्तीचे विशेष आपण बघितले, पण या मूर्तीत हे अलंकार कसे आले आणि मग शिव जे धारण करतो तो सर्प, व्याघ्रचर्म, चिताभस्म गेले कुठे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या कथांचा आधार घ्यावा लागतो. पुराणकथा या जरी मिथक सांगत असल्या तरी त्यांच्या सहाय्याने प्रतिमेचा, शिल्पाचा किंवा मूर्तीचा रसास्वाद घेताना अधिक आनंद होतो. त्यामुळे त्यांचे संदर्भ हे कलात्मक दृष्टीने संकल्पना समजवून घेण्यास सहाय्यक असतात. शिवपुराणामधील पार्वती खंडामध्ये या चंद्रशेखर रूपाची छोटीशी कथा येते.

    शिव-पार्वतीचा विवाह निश्चित होऊन दोन्हीकडे लग्नाची तयारी सुरु आहे. शिव परिवारात लग्नाची तयारी करण्यासाठी तशी व्यक्ती किंवा स्त्री नसल्याने सप्तमातृकाच त्यांच्या त्यांच्या परीने विविध गोष्टी शिवापुढे आणून ठेवतात. शिव त्याच्या स्वाभाविक वेषातच जायचे ठरवतो. पण अंगाला फासलेले चिताभस्म स्वतःहून चंदनात परावर्तीत होते. कानातील सर्प मनोहारी कुंडलांमध्ये तर हातातले सर्प केयुरांमध्ये परावर्तीत होतात. अंगावर खेळणारे साप विविध रत्न-मौतिक आभूषणे बनतात. चर्मवस्त्र पितांबर बनते. भालप्रदेशावरील तिसरा नेत्र शुभ तिलक बनतो. त्याच्या जटांचा मुकुट होतो, चंद्रमा स्वतः जटामुकुटात विराजमान होऊन अधिक तेजस्वी होतो आणि शिवाच्या चंद्रशेखर स्वरूपाचे दर्शन होते.

    हे छोटेसे कथा वर्णन आपल्या चेहऱ्यावर हलके स्मित उमटवून जाते. आता या वर्णनातील प्रसंग आणि मूर्ती एकत्रित पहिली की विसंगती वाटत नाही. तात्पर्य इतकेच की कथेचा भावार्थ लक्षात घेऊन मूर्तीचे परीक्षण करताना त्या मूर्तीची निर्मिती, त्या मूर्तीमधील तत्त्वज्ञान यांची ओळख पटायला लागते. मूर्तीतील कलेचा खरा आस्वाद घ्यायला सुरुवात होते.

    Illustrations are copyrighted by Dhanalaxmi M.Tile (@sketchywish) for Bodhsutra

  • रम्मन, घढवाल प्रांतातील धार्मिक नाट्य परंपरा आणि उत्सव

    रम्मन, घढवाल प्रांतातील धार्मिक नाट्य परंपरा आणि उत्सव

    रम्मन हा हिमाचल प्रदेशातील घढवाल प्रदेशातील संरक्षक देवाच्या सन्मानार्थ केला जाणारा धार्मिक सण आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस, हे कृषिप्रधान संस्कृतीतील लोकं रम्मन साजरा करतात.

    उत्तराखंडातील सलूर -डुंग्रा ही दोन जोडगावे हा सण एकत्र  येऊन करतात.  भूमियाल देवता ह्या स्थानिक संरक्षक देवता मानतात. ह्यात अनेक क्लिष्ट स्वरूपाचे विधी केले जातात.

    रामायणावर किंवा रामावर आधारित कथा, कृष्णावर आधारित कथा सादर केल्या जातात. ह्याशिवाय महाभारतावर आणि पांडवांवर आधारित कथांचा ह्यात समावेश होतो. ह्यात घढवाली आणि गोरख्यांच्या लढाईचेही प्रसंग सादर केले जातात. काही सामाजिक जनजीवनातील प्रसंगही लोकांच्या समोर सादर करतात.

    जवळजवळ 192 कुटुंब हा सण साजरा करायला एकत्र  येतात. ह्यात 18 चरित्र, त्यांना लागणारे 18 मुखवटे आणि 18 पुराणांचे समारंभपूर्वक प्रशंसा असा एकूण प्रकार असतो.   

    Intangible Heritage of India -Ramman, Religious Festival

    ह्यातील मुखवटे हे अत्यंत पवित्र  मानले जातात आणि त्यांचा यथोचित पूजा करून फक्त सादरकरत्याला घालता येतात. ह्या उत्सवाची आखणी आणि तयारी गावकरी करतात. गावातील प्रत्येक जातीच्या व्यक्तीला एक विशिष्ट्य काम नेमून दिलेलं  असते, जसे गावातील वृद्ध आणि लहान मुलं हे सादरीकरण करणार. ब्राम्हण पूजाविधी आणि इतर धार्मिक क्रियांचे संचालन करणार.  

    ह्या गावातील भंडारी जातीच्या क्षत्रियांना मनाचे स्थान आहे. त्यांना नरसिंहांचा पवित्र  मुखवटा घालण्याचा मान असतो. नरसिंह म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा पशु.  

    रम्मन हा सण म्हणजे नाट्य, संगीत, ऐतिहासिक घडामोडी, पारंपारिक लिखित आणि अलिखित काव्य आणि कथा ह्यांचा एकत्रित उत्सव. विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन हे तिथल्या निसर्गाच्या सानिध्यात तर होतेच शिवाय तिथले समाज जीवन, धार्मिक-सांस्कृतिक रीतीरिवाज, मिथक ही रम्मन सारख्या सणातून व्यक्त होतात.

    रम्मनच्या विविधते मुळेच 2009 साली ह्या सणाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात नवरोझ ह्या पारशी सणाविषयी जाणून घेऊ.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO

  • कूडियाट्टम्, संस्कृत रंगभूमी

    कूडियाट्टम्, संस्कृत रंगभूमी

    कूडियाट्टम् केरळ ह्या प्रांतामधील प्राचीन संस्कृत नृत्यनाट्य प्रकार आहे. ही भारतामधील सर्वात प्राचीन जिवंत नाटक परंपरा म्हणता येईल. कूडियाट्टम् हे नृत्य-नाट्य म्हणजे अभिजात संस्कृत आणि केरळमधील स्थानिक परंपरा ह्यांना जोडणारा एक धागा आहे.

    साधारण 9 व्या शतकात ही नृत्यशैली केरळमधील सर्व मंदिरांमध्ये बघायला मिळते. कूडियाट्टम् ची लोकप्रियता, त्याचे नाट्यमय सादरीकरण आणि प्रसार पुढे इ.स.15 शतकापर्येंत बघायला मिळतो. कूडियाट्टम् ह्याचा शब्दशः अर्थ होतो  एकत्रित अभिनय करणे. ह्या शैलीत नेत्र अभिनय आणि हस्त अभिनयाला अधिक महत्व असते.

    कूडियाट्टम्, मधील पुरुषांच्या भूमिका चाक्यार जातीचे लोकं करतात. तर स्त्रियांच्या भूमिका नांगियार जातीच्या स्त्रिया करतात.

    Intangible Heritage of India – Kutiyattam, Sanskrit theater

    कूडियाट्टम् ह्या संयुक्त नृत्य-नाट्य प्रकारचा विषय हा हिंदू  पौराणिक कथांवर आधारलेला असतो. ह्याचे सादरीकरण 6 ते 12 दिवस चालू शकते. हे मंदिराच्या नाट्यगृहात सदर केले जाते. मंदिराच्या ह्या भागास कूठ्ठबलम् किंवा कूठ्ठपलम असे म्हणतात.

    ह्या सादरीकरणात मुख्य पात्र, त्याचे विचार आणि भावना ह्या केंद्रस्थानी असतात. कलाकार त्याच्या स्वतःच्या श्वासावर, शरीरावर असलेला ताबा आणि त्यासोबत चेहऱ्यावरील हावभाव ह्यांवर ते सादरीकरण होते.

    सादरीकरणाच्या वेळी नाट्यगृहात पवित्र वातावरण ठेवले जाते. मोठ्या समयांचा प्रकाश ह्या सदरीकरणाची शोभा अधिक वाढवतो. ह्या शैलीमध्ये पारंगत होण्यासाठी कलाकारांना 10 ते 15 वर्ष ह्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घ्यावे लागते.

    इ.स 19 व्या शतकानंतर मात्र ह्या प्राचीन कलापरंपरेचे आश्रयदाते कमी झाल्याने कूडियाट्टम् चे अस्तित्व धोक्यात आले. परंतु 2008 साली ह्या नृत्य-नाट्य प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. त्यामुळे आता जगभरात ह्या परंपरेला प्रसिद्धी मिळाली आहे.

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात हिमाचल प्रदेशातील साजरा केला जाणारा धार्मिक सण रम्मन विषयी माहिती बघू.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO

  • रामलीला

    रामलीला

    रामकथा मंदाकिनी चित्रकूट चित चारु।
    तुलसी सुभग सनेह बन सिय रघुबीर बिहारु ।।

    – तुलसीदास (रामचरित मानस)

    तुलसीदास त्यांच्या दोह्यात म्हणतात, रामकथा मंदाकिनी नदीप्रमाणे आहे जी सुंदर, निर्मळ आहे, ती चित्रकूट प्रमाणे चित्तवेधक आहे. तुलसीदासाचे स्नेह हेच वन आहे ज्यात श्री राम विहार करत आहे.

    रामलीला याचा शब्दशः अर्थ होतो रामाच्या लीला किंवा रामाच्या आयुष्यावर सादर होणारे खेळ. रामलीला मधील सादरीकरण हे तुलसीदासांच्या रामचरित मानसावर आधारित आहे.

    Intangible Heritage of India – Ramlila

    हे सादर करताना त्यात रामायण या  महाकाव्यातील प्रसंग नाटकीय रूपात सादर केले जातात. यात नृत्य, नाट्य, संगीत, संवाद, वर्णन यांचा समावेश असतो. रामलीला भारतामधील लोकप्रिय सांस्कृतिक ठेवा आहे विशेषतः उत्तर भारत आणि मध्य भारतामध्ये दसऱ्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी रामलीलांचे आयोजन होते.

    रामलीला हे सर्व  मानवजातीच्या ऐक्याच्या दृटीनेही महत्त्वाचे मानले जाते कारण रामलीला बघायला सर्व जाती-धर्माचे लोकं  एकत्र येतात आणि रामलीलेचा आनंद घेतात.       

    अनेक ठिकाणी रामलीला सादर केल्या जातात परंतु त्यापैकी अयोध्या , रामनगर, वृन्दावन, अलमोरा, सत्तना आणि मधुबनी येथे सादर होणाऱ्या रामलीला अधिक लक्षणीय आहेत. रामलीलेचे सादरीकरण जवळजवळ 10 ते 12 दिवस चालते. रंगमंचावरील प्रस्तुत प्रेक्षकांनाही उत्स्फुर्तपणे सहभागी होता येते, त्यामुळे लोकं त्याचा अधिकच आनंद अनुभवू शकतात.

    रामलीला ही परंपरा जवजवळ चारशे वर्ष टिकून आहे त्यामुळेच 2008 साली रामलीला या प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात कूडियाट्टम् ह्या केरळ मधील संस्कृत रंगभूमी विषयी जाणून घेऊ.

    (क्रमशः)

    Photo Credits : Shriram Bharatiya Kala Kendra

  • वेद पठण परंपरा

    वेद पठण परंपरा

    भारतीयांसाठी वेद म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहे. वेदांची पवित्रता ही सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. म्हणूनच बृह्दारण्यक उपनिषदामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद म्हणजे परमात्म्याचे निश्वास म्हटले आहेत.

    अस्य महतो मूतस्य निःश्वसितमेतद् यद् ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथर्वांगिरसः |

    – बृह्दारण्यक

    वेद, भारतीय परंपरेतील संस्कृत रचनांचे अतुलनीय कोष आहेत, दार्शनिक संवाद, मिथक आणि अनुष्ठान मंत्र ह्यांचे भांडार आहे. जगातील सर्वात प्राचीन वाङ्मयाचे नमुने म्हणून ज्याच्याकडे पहिले जाते त्या वेदांची परंपरा ही जवळजवळ साडे तीन हजार वर्ष जुनी परंपरा आहे.

    हे वेद लिखित स्वरूपात नसल्याने ते विविध प्रकाराने पठण करून मौखिक परंपरेने कुठलाही बदल न होता आपल्यापर्येंत येऊन पोहचले आहेत. हिंदूंसाठी ज्ञानाचा हा प्राथमिक स्त्रोत मानला जातो.

    Intangible Heritage of India – Vedic Chanting

    हे वेद पद्य-गद्य ऋचांचे संकलित संग्रह आहेत. गुरूकडून मौखिक स्वरूपात हे ज्ञान श्रवण करून शिष्य आत्मसाद करतो म्हणून त्याला श्रुती म्हटले आहे. ऋग्वेद म्हणजे ऋचांचा समूह, यजुर्वेद म्हणजे यज्ञाशी संबंधीत मंत्र आणि अर्पण सूत्रे, सामवेद म्हणजे ऋग्वेद आणि इतर स्त्रोतांतून आलेल्या ऋचांचे संगीतबद्ध संकलन आणि अथर्ववेद मंत्र  आणि तंत्र ह्यांवर आधारित आहे.

    ह्या सर्व वेद वाङ्मयाची पठणांची एक विशिष्ट पद्धत अतिशय कौशल्यपूर्ण शैलीवर आधारित आहे. इतकच नाही तर हे वेद आशयाच्या दृष्टीनेही महत्वाचे आहेत. भारतीय परंपरेसाठी  वेद आणि त्यांची पठण परंपरा ही पवित्र मानलेली आहेच ह्यावरून त्यांचे समाजातील महत्व  लक्षात येते.

    ही मौखिक परंपरा एका विशिष्ट पद्धतीने जतन करण्यासाठी 2008 साली ह्या पठण परंपरेला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले आहे.

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात उत्तर भारत आणि मध्य भारतामध्ये सादर होणाऱ्या रामलीला विषयी जाणून घेऊ.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO

  • अमूर्त वारसा, भारताचा

    अमूर्त वारसा, भारताचा

    एखाद्या समाजाची एक वैशिष्टपूर्ण रचना, जगण्याच्या पद्धती या एका ठराविक मूल्यांवर आधारित असतात. धर्म, तत्त्वज्ञान, राजकीय किंवा सामाजिक व्यवस्था, साहित्य, शास्त्रे, कला, नीती, कायदा आणि त्या मागची मूल्ये म्हणजे त्या विशिष्ट प्रदेशातील ती संस्कृती असते.

    भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन आणि अखंडित परंपरा असलेली संस्कृती आहे. त्यामुळे भारताप्रमाणे इतकी अखंडित परंपरा लाभलेले संस्कृती जगभरात बघायला मिळत नाही. भारतीय संस्कृतीपेक्षा प्राचीन संस्कृती निश्चित होत्या, परंतु त्या संस्कृती काळाच्या ओघात हळूहळू लोप पावत गेल्या आणि नष्ट झाल्या. त्यामुळे भारतीय संस्कृतीकडे आणि ती शिकण्याकडे, भारतीयांचाच नव्हे तर परदेशी विद्वानांचाही ओढा अधिक होता. म्हणून आपल्याला परंपरेने वारसा म्हणून मिळालेल्या ही संस्कृती म्हणजे काय हे जाणून घेणे आज आवश्यक आहे.

    Culture is the characteristic way of life inspired by fundamental values in which people live. It is the sum total of the values expressed through art, religion, literature, social institutions and behavior – K.M. Munshi

    ही सांस्कृतिक मुल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित होतात तेव्हा त्याला वारसा असे म्हणतात. हा वारसा कधी मूर्त स्वरूपात आपल्या समोर प्रत्यक्ष उभा असतो तर कधी अमूर्त स्वरूपात असतो. या लेखांत आपण भारताच्या अमूर्त वारश्याची माहिती जाणून घेणार आहोत. 

    अमूर्त वारसा म्हणजे नेमकं काय

    अमूर्त वारसा म्हणजे रूढी, परंपरा, विशिष्ट समूहाच्या प्रथा, प्रतिनिधित्व किंवा एखादी ज्ञानशाखा, कौशल्य किंवा अभिव्यक्ती. या सर्व गोष्टींचे आपल्याला अनुभवाने ज्ञान होते. हा अमूर्त वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित होत आला आहे.

    युनेस्को (UNESCO) या संस्थेने भारताच्या अमूर्त वारश्यांची एक यादी केली आहे. त्यात या लोप पावत चालेल्या कला, परंपरा, संस्कृतींची जागतिक स्थरावर नोंद झाली आहे. या अमूर्त वारश्याचे जतन होण्यासाठी आणि त्याची माहिती, त्याचे महत्त्व लोकांना समजण्यास मदत होते.

    भारताचा अमूर्त वारसा

    1. वेद पठण परंपरा

    वेद पठण परंपरा

    2. रामलीला

    रामलीला

    3. कूडियाट्टम्, संस्कृत रंगभूमी

    कूडियाट्टम्, संस्कृत रंगभूमी

    4. रम्मन

    रम्मन, घढवाल प्रांतातील धार्मिक नाट्य परंपरा आणि उत्सव

    5. नवरोझ

    नवरोझ

    6. मुडीयट्टू

    मुडीयट्टू

    7. कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य

    कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य

    8. छउ नृत्य

    छउ नृत्य

    9. बौद्ध पठण परंपरा, लडाख

    बौद्ध पठण परंपरा, लडाख

    10. संकीर्तन

    संकीर्तन

    11. पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे थाथेर, जन्दियाला गुरु- पंजाब

    पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे, थाथेर

    12. योग

    13. कुंभ मेळा

    वेद म्हणजे भारतीयांचे ज्ञानाचे भांडार. पुढच्या भागात भारतातील वेद पठण परंपरा बघणार आहोत.

    (क्रमशः)

  • प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास (भाग 2)

    प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास (भाग 2)

    भाग 1 – प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास

    भीमबेटकातील चित्रांची अभिव्यक्ती

    प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास भाग 1 मध्ये आपण बघितलं की वि.श्री. वाकणकरांना भीमबेटका ह्या शैलाश्रयांचा शोध कसा लागला. त्यांनी आणि इतर अभ्यासकांनी भीमबेटकाचा एक नवा पैलू कसा मांडला. ह्या भागात आपण ह्या शैलाश्रयांमधील चित्रांविषयी माहिती बघणार आहोत. इथली कला आपल्याला तत्कालीन माणसाविषयी नेमकं काय सांगू बघते आहे ह्याचा शोध घेणार आहोत.

    • चित्रातील रंग

    भीमबेटकातील गुहांमध्ये काढलेल्या चित्रांमध्ये जवळजवळ 16 रंगांच्या छटा मिळतात ज्या विविध खनिजांपासून बनवल्या गेल्या आहेत. तरी त्यात मुख्यत्वे लाल आणि पांढऱ्या रंगाचा अधिक वापर दिसतो. रंग बनवण्याची प्रक्रिया बघितली तर हे रंग पाण्यात घोळवून किंवा प्राण्यांच्या चरबीत घोळवून वापरले आहेत. ह्या भागात गेरू आणि चुनखडीची मुबलकता अधिक असल्याने लाल आणि पांढरा रंग जास्त वापरलेला दिसतो. हिरव्या रंगाचा वापर करताना हिरव्या रंगाच्या चकचकीत दगडाचा वापर केला आहे ज्याला Green Chalcedony म्हणतात. काही चित्र ही एकाच रंगत रंगवली आहेत ज्याला आम्ही चित्रकलेच्या भाषेत Monochromatic Color Scheme म्हणतो. तर काही चित्रांत एकापेक्षा अधिक रंगाचाही वापर दिसतो. ही चित्र काढताना ब्रश म्हणून झाडाच्या फांद्यांचा योग्य आकार देऊन वापर केलेला दिसतो आणि त्याला पुढे प्राण्यांच्या केसांचा झुपका वापरला आहे.

    • चित्रातील निरीक्षणे

    कुठलेही चित्र किंवा चिन्ह हे एका प्रकारे संदेशाचे माध्यम असते. ह्या चिन्हांद्वारा किंवा चित्राद्वारे माणसाच्या अंतरंगाचे मनोगत आपल्या समजत असते, फक्त त्याचा अर्थ आपण समजून घ्यावा लागतो. हे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला कि ही चित्रे आपल्याशी संवाद साधू लागतात. अशीच कथा आहे भीमबेटकाच्या चित्रांची. ह्या चित्रांमध्ये दैनंदिन जीवन, समाज, सामाजिक समारंभ किंवा विधी आणि एकूणच त्या काळातील माणसाचे राहणीमान दिसते. ह्या चित्रात लढाई, शिकार, समूह नृत्य, खेळ, चिकित्सा असे अनेक प्रसंग चित्रित झाले आहेत. ह्याशिवाय काही प्रगत तंत्रज्ञानाची माहिती ह्या लोकांना असावी हे दाखवणारी काही चित्र आहे. वनांचे प्रमाण अधिक असल्याने जैवविविधताही आहे त्याचे दर्शन चित्रातून होते. इथे राहणाऱ्या माणसाच्या भौतिक जीवनाचा आढावा ह्या गुंफा चित्रातून समजून घेता येतो.

    • चित्रातील तंत्रज्ञान

    भीमबेटकाच्या चित्रांमधील एक विशीष्ट म्हणजे त्या काळातही मानवाला असलेली सूक्ष्म जाणीव त्याने चित्रबद्ध केली आहे. काही नुसत्या रेखाचित्रांचा आधार घेतला आहे तर कधी खरोखरीच भरीव आकारात चित्र काढलेले आहे. नुसत्या आजूबाजूच्या दिसणाऱ्या गोष्टी काढायच्या असं नाही तर त्या काळच्या मानवाने X-ray Technique चा वापर करून गर्भवती स्त्री आणि त्याच्या पोटात बाळ आणि तिच्या समोर एक प्राणी आहे ज्याच्या पोटातही त्या प्राण्याचे बाळ आहे अशी चित्रांकने तिथे बघायला मिळतात.

    • चित्रातील जैवविविधता

    चितळ, हरीण, काळवीट, गेंडा, बिबट्या, वाघ, हत्ती, चित्ता, खारी, म्हैस, डुक्कर, नीलगाय, मोर, सांभर अश्या 29 प्रजातीच्या विविध प्राणी आणि ह्या शिवाय विविध पक्षी, मासे, पाली, बेडूक, खेकडे, विंचू हे तिथल्या जैवविविधतेची साक्ष देतात. एक महत्वाचे म्हणजे इतके असूनही इथे साप चित्रात कुठेच दिसत नाही. प्राण्यांची चित्र बघत असताना हे समजते कि मासेमारी मोठ्या प्रमाणात चालत असावी कारण त्या चित्रात मासेमारी सुरु आहेच शिवाय माश्यांच्याही विविध प्रजाती काढायचा प्रयत्न केला आहे.

    ही चित्रे आकर्षक का वाटतात असा प्रश्न जर आपल्या डोक्यात डोकावला असेल तर त्याचे उत्तर अतिशय सोप्पे आहे. ही चित्रे तशी नुसतीच रेखांकाने असली तरी चित्रात जिवंतपणा आहे. सर्व चित्रांचा प्राण आहे गती किंवा Motion त्यामुळे ही सर्व चित्रे जिवंत वाटतात. शिकारीच्या प्रसंगात अनेक लोकं प्राण्यावर हल्ला करतायेत आणि त्या भीतीने प्राण्यांची गती वाढली आहे हे जाणवते. हरणाला पाठीत बाण लागल्यानंतर स्वभाविक त्याचे मागे वळून आर्त ओरडणे चित्रित केले आहे.

    आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांचे पसरलेले पंख आणि त्या पंखांची पिसे चित्रित केली आहेत. ह्याच पक्ष्यांचा उडणारा थवा जर बारकाईने बघितला तर काही पक्षी छोटे काढले आहेत तर काही आकाराने मोठे. चित्रातून जवळ आणि लांबच्या गोष्टींचा आभास निर्माण करता यावा ह्यासाठी हे कौशल्य वापरले आहे.

    ह्या चित्रांमध्ये वेगवेगळ्या हत्यारांचा वापर केलेला आहे जसे की भाला, धनुष्य, बाण, ढाल, काठ्या इ. शिकारीच्या चित्रांमध्ये कधी एकट्याने तर कधी सामुहिक शिकार करताना दिसतात. शिवाय शिकाऱ्यासोबत क्वचित कुत्रा तत्सम प्राणीही चित्रित केला आहे. प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेले गळ, सापळे आहेत. प्राण्यांच्याही आयुष्यातील घडामोडी चित्रांत दिसतात, जसे की चित्ता हरणाच्या पाडसाच्या मागे त्याची शिकार करण्यासाठी धावतो आहे. काही म्हशी कुरण चरतायेत. उड्या मारणारी माकडं आहेत.

    • चित्रातील भौतिक संस्कृति

    मध्याश्मयुगीन चित्रांमध्ये माणसांचे अनेक समूह दिसतात ज्यात पुरुष, स्त्रिया, तरुण आणि वृद्ध चित्रित केले आहेत. त्यांचे पोशाख, दागदागिने, डोक्यावरील आभूषणे बघायला मिळतात. ह्यातील पुरुष केवळ रेखेनी चित्रित करतात तर स्त्रिया मात्र पूर्ण काढलेल्या आहेत. एखादी व्यक्ती ही आकाराने मोठी, दागिने घातलेली, डोक्यावर मुकुटाप्रमाणे उंच शिरोभूषण त्याला तुरे किंवा पक्ष्यांचे लांब पंख लावून सुशोभित केले आहे. चेहऱ्यालाही एक विशिष्ट पद्धतीचा मुखवटा घातला आहे, ह्यावरून ती व्यक्ती नक्कीच त्या गटातील महत्वाची व्यक्ती असणार हे समजते. ह्या व्यक्ती चित्रांतून कामांचे वर्गीकरणही दिसते ज्यात पुरुष शिकार करतायेत तर स्त्रिया अन्न जमा करून ते शिजवणे, दळणे किंवा कुटणे अश्या कामात अंकित केले आहेत.

    सामाजिक समारंभात अनेक स्त्रिया एकत्रित येऊन नृत्य सदर करतायेत. त्यातही एक स्त्री ही त्यांच्यातील मुख्य असणार कारण तिच्या चेहऱ्यावर विशिष्ट पद्धतीचा मुखवटा आहे आणि डोक्यावर दोन शिंगे. हे नृत्य कदाचित ह्यांच्या धार्मिक विधीशी निगडीत असण्याची शक्यता आहे.

    माणसाच्या भावभावना, संवेदना, मूल्य ही ह्या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला आज दिसतायेत. ही चित्र चित्रित करून ठेवण्याची गरज तत्कालीन माणसाला वाटली आणि त्या गुहेच्या भिंतींना चक्क त्याचा कॅनव्हास बनवून गुहाचित्रांच्या रूपात संकलित केली. त्याचे दैनंदिन जीवन, त्यातले अडथळे काही धार्मिक संकल्पना किंवा संकटे चित्रीत करणे हे केवळ त्याचे कलाप्रदर्शन नसून त्यांचा संबंध त्याच्या त्यावेळच्या काही समजुतींशी निगडीत असावा. काही चित्रे त्याच्या स्मरणातील सगळ्यात चांगले प्रसंग म्हणून त्याने ते चित्रांमार्फत जपण्याचा प्रयत्न केला असावा. काहीही असो पण तत्कालीन मानवाच्या कलात्मक वाटचालीची पहिली खुण म्हणून भीमबेटका महत्वाचे आहे. UNESCO च्या निकष क्र. 3 ज्यात भीमबेटका हे स्थान मानव आणि तेथील निसर्गामध्ये असलेला परस्पर संवाद तिथे असलेल्या गुहा चित्रांच्या माध्यमातून दर्शवतो. आणि निकष क्र. 5 ज्यात शिकारी आणि भटक्या जातीच्या जीवनशैलीचे आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्रीकरण येथे आहे. ह्यांच्या आधारे UNSECO ने 2003 साली भीमबेटकाला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले आहे.

    संदर्भ:

    1. A History of Acient and Early Medival India – Singh Upinder
    2. Archaeology Survey of India 

    Photo Credits : A History of Acient and Early Medival India – Singh Upinder

  • राजसत्तेच्या सामर्थ्याचे कलात्मक प्रतिक

    राजसत्तेच्या सामर्थ्याचे कलात्मक प्रतिक

    खूप वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक गोष्ट घडली. खूप वर्ष म्हणजे जवळजवळ 70 वर्षांपूर्वी. 26 जानेवारी 1950 साली भारताची राज्यघटना अंमलात आणली गेली आणि आजच्याच दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे 26 जानेवारी 1950 साली भारताचे राजकीय चिन्हे स्वीकारले गेले.

    चिन्हे किंवा प्रतिके ही एक प्रकारची साधने आहेत, जी माणसाला त्या प्रतिकांमागाचा अर्थ समजून घेण्यासाठी अंतर्मुख होण्यास भाग पडतात. ही चिन्हे आपल्याला काहीतरी संदेश देत असतात. त्यातून अभिव्यक्त होणारा अर्थ समजून घ्यावा लागतो. तेव्हाच त्या चिन्हां मागच्या संकल्पना स्पष्ट होतात. म्हणूनच आपल्या भारताचे सध्याचे राजकीय चिन्ह आपल्याला काय अभिव्यक्त करत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल मागे, इतिहासात. साधारण इ.स.पू 4 थ्या शतकात.

    इ.स.पू. 4 थे शतक म्हणजे मौर्यकाळ. भारताच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात अनेक स्थित्यंतरे घडवणारे होते. अनेक नवे प्रवाह भारतात येत होते. भारतातील प्राचीन कलेची वाटचाल पहिली तर ही सुरुवात मानली जाते. याचा अर्थ असा नाही की या काळाआधी कलानिर्मिती झालीच नाही, परंतु त्या कलाकृती काळाच्या ओघात नष्ट झाली असल्याची शक्यता आहे. म्हणूनच कलावशेष उपलब्ध होतात ते या काळातले. त्या अनेक कला अवशेषांची सविस्तर माहिती आपण भविष्यात बघूच.

    पण आजच्या दृष्टीने महत्त्वाचा कलावशेष जो आज स्वतंत्र भारताचे राजचिन्ह आहे आणि ते म्हणजे सारनाथ येथील सिंह स्तंभशीर्ष.

    सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश यांच्या संदर्भात दिलेल्या आज्ञा ज्या दगडी स्तंभांवर कोरून ठेवलेल्या आहेत, त्यांना अशोकस्तंभ म्हणतात. ते स्तंभ त्याच्या साम्राज्यभर विखुरलेले होते. यूआन च्वांग हा सातव्या शतकातील चिनी प्रवाश्याने अशा पंधरा अशोकस्तंभांचा उल्लेख केला आहे. त्यांपैकी आज तेरा स्तंभ प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत. आणखीही काही स्तंभ असणे शक्य आहे. पण अजून ते उपलब्ध झालेले नाहीत. हे स्तंभ आज मूळ रूपात अस्तित्वात नाहीत, काहींची फक्त शीर्ष दिसतात. त्यापैकीच एक म्हणजे सारनाथचे स्तंभशीर्ष.

    सारनाथ, भारतातील एक प्रसिद्ध प्राचीन स्थळ आहे. गौतमबुद्धाने ज्ञानप्राप्ती नंतर पहिले प्रवचन दिले होते, त्या स्मरणार्थ अशोकाने इथे स्तूप आणि स्तंभ उभारले होते. या स्तंभावरती ब्राह्मी लिपीत एक लेखही कोरला होता. 1905 मध्ये झालेल्या पुरातत्वीय उत्खननात हे सिंहशीर्ष सुस्थितीत सापडले.

    स्तंभशीर्षाचे कलात्मक आणि सांस्कृतिक महत्व

    एकपाषाणी वालुकाश्म दगडातून निर्माण केलेली हि कलाकृती आजही नजरा खिळवून ठेवते. ह्या स्तंभशीर्षाला घासून चकचकीतपणा आणला आहे. याची उंची साधारण 2.15 मीटर म्हणजे 7 फुट आहे. सध्या हे सिंहशीर्ष उत्तर प्रदेशातील सारनाथ म्युझियममध्ये ठेवले आहे.

    या स्तंभशीर्षावर घंटाकृती किंवा पालथ्या कमळाच्याआकाराचे शीर्ष, त्यावर एक गोलाकार पट्टी, त्यावर पाठीला पाठ लावून उभे असलेले चार सिंह आणि त्यांच्या मस्तकावर उभे धर्मचक्र, असे या मूर्तीचे मूळ स्वरूप होते. आता हे धर्मचक्र पडून गेले आहे, पण उरलेला भाग चांगल्या अवस्थेत आहे.

    Lion Capital at Sarnath

    अतिशय रेखीव घंटाकृती शीर्षाच्या वरच्या गोलाकार पट्टीवर चार धर्मचक्रे आहेत. एका धर्मचक्राच्या आड एक प्राणी म्हणजे सिंह, घोडा, हत्ती आणि बैल यांची शिल्पे कोरली आहेत हे सर्व प्राणी अतिशय सुबक, प्रमाणबद्ध आणि डौलदार दिसतात.

    पाठीला पाठ लावून असलेले 4 सिहं, दाट आयाळ आणि वळवलेल्या झुपकेदार मिशांमुळे अतिशय रुबाबदार आणि राजेशाही दिसतात. ह्या सिहांच्या एकूणच हावभावावरून हे राजसत्तेचे सामर्थ्य दर्शवणारे दिसतात. त्याच्या पायाचे स्नायू, पंजे, नख हे सर्व खूपच यथातथ्य दाखवले आहेत.

    कलात्मक दृष्टीकोनातून ह्या स्तंभावरील चार प्राणी म्हणजे चातुर्माहाराजिक ही बौद्ध सिद्धांतावर आधारित चार जगांची संकल्पना अंकित केली आहे. चार दिशांचे चार संरक्षक राजे आणि त्यांची वाहने त्या प्राण्यांच्या रूपात अंकित केली आहेत. उत्तर दिशेला वैश्रवण ज्याचे वाहन सिंह आहे. पूर्व दिशेला धृतराष्ट्र ज्याचे वाहन हत्ती आहे. दक्षिण दिशेला विरुधक ज्याचे वाहन घोडा आहे. पश्चिम दिशेला विरुपाक्ष ज्याचे वाहन बैल आहे.

    भारताच्या राजचिन्हात मात्र पालथ्या कमळाचा आकार वगळण्यात आला आहे. मुण्डकोपनिषद मधील सत्यमेव जयते हे वचन देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहे.

    भारतातील राष्ट्रीय संस्थांनी (Government Agencies) देखील सारनाथचे प्रतिक त्यांचे प्रतिकात्मक चिन्ह म्हणून स्वीकारले आहे.

    याशिवाय आसाम, गुजरात, कर्नाटक, केरळा, मेघालय, मिझोरम, ओडीसा, पंजाब, तामिळनाडू, त्रिपुरा आणि तेलंगना ह्यांच्याही प्रांतिक चिन्हात या सिंहशीर्षाचा समावेश केला आहे.

    म्हणूनच भारताच्या सार्वभौमत्वाचे प्रतिक असलेले हे अशोकाचे स्तंभशीर्ष चिन्हाची अभिव्यक्ती, राजकीय आणि कलात्मकदृष्टीनेही तितकीच महत्त्वाची आहे.

    Photo Credits : Internet and Wikipedia