Tag: intagible heritage

  • तिळाचा इतिहास : उगम, वापर आणि धार्मिक महत्त्व

    तिळाचा इतिहास : उगम, वापर आणि धार्मिक महत्त्व

    पौष महिना सुरु झाला की लगबग सुरु होते ती मकर संक्रांतीची. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणत नात्यांमध्ये माधुर्य वाढवणारा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. आत्ता जरी मकर संक्रांतीचे स्वरूप हे सणाचे असले, तरी हे भारतीय धार्मिक व्रतांपैकी एक व्रत होते. सध्या आपण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवस हा सण साजरा करतो. दक्षिण भारतातही याच दिवशी पोंगल नावाचा सण साजरा केला जातो. संक्रांती प्रमाणे तीन दिवस चालणारा हा पोंगल म्हणजे तमिळ वर्षाचा पहिला दिवस असतो.

    भारतात सर्वत्रच आपले देशबांधव संक्रांत साजरी करतात. जम्मू-काश्मीरमध्ये शिशिर सेक्रांत, पंजाब मध्ये लोहडी, आसाममध्ये माघ बिहू, बंगालमध्ये पौष संक्रांत, गुजरातमध्ये उत्तरायण, महाराष्ट्रात मकर संक्रांत आणि तामिळनाडू मध्ये पोंगल अश्या विविध नावे आणि काही प्रादेशिक परंपरा यांचे वेगळेपण टिकवून हे उत्तरायण सर्वत्र तितक्याच आनंदाने साजरे केले जाते.

    संक्रांत याचा अर्थ सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण. २१ डिसेंबर पासून सूर्याचे उत्तरेकडे जाणे सुरु होते, म्हणजेच दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते. या काळात तीळ आणि तिळाचे पदार्थ आपल्या आहारात येतात. धर्मशास्त्रकार डॉ. पां. वा. काणे म्हणतात, त्यानुसार मकर संक्रांत हा सण प्राचीन असणे शक्य नाही. परंतु अनेक शतकापासून भारतीय आहारात आणि संस्कृतीत वेगवेगळ्या निमित्ताने येणाऱ्या तिळाचे अनेक प्राचीन संदर्भ मोठ्या प्रमाणात सापडतात. पुरात्तत्वशास्त्र, आहारशास्त्र, आयुर्वेद, चिकित्साशास्त्र, धर्मशास्त्र यांसारख्या शास्त्रांच्या आधारे तिळाचा इतिहास, उगम, वापर आणि धार्मिक महत्त्व यांचा परामर्श या लेखाच्या माध्यमातून आज मी घेत आहे.

    तिळाचा इतिहास

    तिळातील पौष्टिक सत्त्व, स्निग्धपणा आणि त्याची सहज उपलब्धता यांमुळे तिळाचा वापर अनेक ठिकाणी वेगवगेळ्या स्वरूपात आजही होताना दिसतो. अर्थात तिळाचे अनेक औषधी गुणधर्म ही आहेत, ज्याची माहिती आपण पुढे बघूच. भारतासह जगातील अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये तिळाचा वापर झाला आहे, तसे उल्लेख आणि पुरावे आपल्याला मिळतात. तिळाच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर त्याचा पहिला प्राचीन पुरावा सिंधू खोऱ्यात बहरलेल्या संस्कृतीमध्ये मिळतो.

    संशोधकांमध्ये तिळाच्या उगमस्थान निश्चितीवर अजून एकमत झाले नसले तरी, उत्खननातून प्राप्त झालेल्या भाजक्या तिळाच्या अवशेषावरून भारतीय संस्कृतीत तिळाचे प्राचीनत्व दिसते. पुरातत्त्वीय उत्खननांमध्ये पंजाब, हरियाणा, मिरी कलात (बलुचिस्थान) येथे भाजक्या आणि उकडलेल्या स्वरूपात, हडप्पाच्या प्रारंभिक ते अंतिम अश्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तिळाचे अवशेष सापडले आहेत. थोडक्यात काळाच्या भाषेत बोलायचे झाले तर इ. स. पू. ३६०० ते इ. स. पू. १७५० दरम्यान. याच काळातील इतर संस्कृतींचा आढावा घेतला तर मेसोपोटेमियामधील नोंदींमध्ये या तिळाचा उल्लेख येतो.

    अलीकडील संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, भारतातून तीळ इराणमार्गे, मेसोपोटेमियामध्ये गेले. मेसोपोटेमियमच्या उत्खननात तिळाचे अवशेष अजूनतरी सापडले नाहीत. मेसोपोटेमियन आणि सुमेरिअन  संस्कृतीच्या नोंदींमध्ये से-गी-सी हे त्यांचे स्थानिक तेल बी असल्याचा उल्लेख येतो. तिळ असा किंवा त्याच्याशी साधर्म्य दाखवणारा शब्द या नोंदींमध्ये नाही.

    भारतामध्ये तिल या संस्कृत नावाशी संबंधीत या शब्दाचे रूप पुढे तैल (तेल) असे होताना दिसते. थोडक्यात तैल म्हणजे तिलोत्पन्न म्हणजे जे तिळापासून निर्माण झाले आहे. अक्केडीअन संस्कृतीत samassammu आणि ellu हे शब्द येतात. प्रत्येक संस्कृतीतील प्रादेशिक भाषेत तिळाचे नावं सापडते. भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये एल्लू, तिल्लू, तैल, तिल असे तिळाचे वेगवेगळे नामनिर्देश आहेत. ग्रीक भाषेत sesamon किंवा sasama, अरेबिक भाषेत मध्ये simsim असा शब्द योजला आहे जो लॅटिन भाषेत sesame असा झालेला दिसतो.

    आहारातील तीळ

    आहारशास्त्राच्यादृष्टीने तिळाकडे बघताना त्याचे विविध फायदे आपल्या सहज लक्षात येतील. भारतातील खरीप आणि रब्बी लागवडीत असलेल्या सर्वांत प्राचीन धान्यांपैकी एक म्हणजेच तीळ. त्यामुळे पहिल्यापासूनच आहार आणि व्यवहारात तिळाचा मुबलक वापर आपल्याला दिसतो.

    तैतरीय संहिता, अथर्ववेद, शतपथ ब्राह्मण, जैमिनीय उपनिषद, छांदोग्य उपनिषद सारख्या प्राचीन वाङ्मयातून आहारातील एक जिन्नस, होमधान्य आणि पितृतर्पणासाठी म्हणून तिळाचा उल्लेख येतो. पायास, खिचडी सारखे पदार्थ बनवताना तिळाचा त्याच समावेश होत असे. तिळापासून बनविलेल्या तेलाचेही अनेक संदर्भ प्राचीन ग्रंथात सापडतात.

    तांदूळ आणि तिळाचे मिश्रण वाफवून तयार केलेल्या भाताला तिलोदन म्हणत आणि तो आवडीने खाल्ला जाई. तिलपर्पट म्हणजे तिळाचे पापडाचाही समवेश होता. शष्कुलीका नावाचा एक गोड पदार्थ – ज्यात बारीक केलेला तांदूळ आणि तिळाचा वापर केला जात असे. हा पदार्थ मिष्टांन्नातील एक प्रकार होता.

    शष्कुल्यः शालिपिष्टैः सतिलैस्तैलपक्वाः क्रियन्ते| – (चरक संहिता २७.२६५)

    तिळापासून बनवलेला शष्कुलीका हा पदार्थ तर बौध्द भिक्षुंनाही अतिशय प्रिय होता, असे उल्लेख चूल्लवग्ग आणि धम्मपद यांसारख्या बौद्ध साहित्यामध्ये येतात. तांदूळ, साखर आणि तीळ वापरून बनवलेल्या या शष्कुलीकाचा मोठा आकार झाला की तिला दीर्घ शष्कुलीका म्हणत. एकदा एका भिक्षूने खास ही शष्कुलीका बनवून मागून घेतली होती, ज्याची परिणीती अशी झाली की बौद्ध भिक्षुंच्या सभेत या कृत्याविषयी त्या भिक्षूला खेद व्यक्त करावा लागला.

    याशिवाय तिळाची भुकटी किंवा चूर्ण करूनही आहारात वापरण्याचा प्रघात होता. तिळाच्या या चूर्णाला तिलपीठ किंवा तिलकुट असे म्हणत. आहाराशिवाय वैद्यकीयशास्त्रातही तिळाचा आणि त्यापासून बनणाऱ्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता, असे दिसते.

    औषधी तीळ

    तिळाच्या बहुगुणत्वाचा उल्लेख सुश्रुत, चरक यांसारख्या प्राचीन संहितांमधून वारंवार येतो. आयुर्वेदामध्ये तीळ त्रिदोष म्हणजे कफ, वात आणि पित्त या तीनही दोषांवर गुणकारी सांगितला आहे.

    सर्वेभ्यस्त्विह तैलेभ्यस्तिलतैलं विशिष्यते | – (सुश्रुतसंहिता)

    सुश्रुतसंहितेमध्ये दिलेल्या तेलांपैकी – तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ आणि विशेष मानले गेले आहे.
    तिळाच्या तेलाचे महत्त्व विषद करताना चरक संहितेत असे वर्णन येते –

    तैल संयोगसंस्कारात सर्वरोगापहं परम् | – (चरकसंहिता)

    सूज, सांधेदुखी सारख्या गोष्टींसाठी चरक संहितेमध्ये तिळाच्या तेलाचा वापर सांगितला आहे. चिकित्साशास्त्रात कृष्णतिल म्हणजे काळ्या तिळाचे औषधी मूल्य अधिक असल्याचे नमूद केले आहे. शल्यचिकित्सेतही तिळाच्या तेलाचा वापर करावा असे उल्लेख येतात.

    सुश्रुत संहितेमध्ये नासिकासंधान म्हणजे नाकाच्या शास्त्रक्रियेनंतर रोगप्रतिकारक घटक म्हणून तिळाच्या तेलाचा उपयोग करीत असत. कोणताही व्रण किंवा जखमेसाठी या तेलाचा वापर होत असे. आयुर्वेद, चिकित्साशास्त्र यांच्या बरोबरीने तिळाचे सर्वाधिक महत्त्व दिसते ते आपल्या भारतीय परंपरेमध्ये. भारतीय परंपरेत तिळाचा वापर धार्मिकदृष्ट्या कशा प्रकारे होत असे याचा अंदाज धर्मशास्त्राच्या आधारे घ्यावा लागतो.

    तीळ आणि तिळाचे धार्मिक महत्त्व

    धर्म हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, त्यामुळे तिळाचा, धार्मिक व्यवहारात विशेष वावर दिसतो. दानं, तर्पण, श्राद्ध अश्या विधींना भारतीय परंपरेत एक विशेष अर्थ आहे. त्यामुळे धर्मशास्त्र आणि तिळाचे धार्मिक महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे.

    पितरांच्या हिताकरिता धर्मशास्त्रातील विधींना अनुसरून श्रद्धापूर्वक जे केले जाते त्याला श्राध्द म्हणतात. संक्रांतीलाही श्राद्ध घालण्याचा निर्देश धर्मशास्त्रात आहे. पितृतर्पण आणि श्राद्ध या दोन्ही विधींना भारतीय संस्कृतीमध्ये एक विशिष्ट स्थान आहे. सूत्रकाळापासून ते मध्ययुगीन काळखंडापर्येंत सर्वच धर्मशास्त्रीय ग्रंथांच्या कर्त्यांनी श्राद्ध संस्थेला महत्त्व दिले असल्याचे दिसून येते.

    पितॄणां प्रथमं भोज्यं तिलाः सृष्टाः स्वयंभुवा |

    तिलदानेन वै तस्मात्पितृपक्षः प्रमोदते ||

    – महाभारत, अनुशासन पर्व १३-१०१-७

    श्राद्ध आणि पितृतर्पण विधींमध्ये तिळाच विशेष वापर केला जातो. पितरांना भाताचे पिंड अर्पण केले जातात त्यात तीळ असतो. महाभारत, अनुशासन पर्वानुसार कश्यप ऋषीच्या देहातून तिळाची उत्पत्ती सांगितली आहे. श्राद्ध विधानामध्ये तिलतर्पण हे पापांतून मुक्ती प्रदान करणारे आणि सद्गती प्राप्त करून देणारे मानले आहे.

    मध्ययुगीन कालखंडातील धर्मशास्त्रावर आधारित धर्मसिंधु नावाचा एक संग्रह आहे. या ग्रंथामध्ये शनी किंवा राहूच्या प्रभाव कमी करण्यसाठी तीळ किंवा तिळाचे तेल दान करण्याचा निर्देश आहे. विधवा स्त्रियांसाठी पती, पिता आणि पितामह म्हणजे आजोबा यांच्यासाठी दररोज तर्पण सांगितले आहे.

    तर्पणं प्रत्यहं कार्ये भर्तुस्तिलकुशोदकैः |

    मनुस्मृतीमधील या श्लोकांत कलियुगामध्ये धर्माचे प्रमुख लक्षण दान सांगितले आहे.

    तपः परं कृतयुगे त्रेतायां ज्ञानं उच्यते ।

    द्वापरे यज्ञं एवाहुर्दानं एकं कलौ युगे । । मनुस्मृती – १.८६

    महाभारत, अग्निपुरण, मत्स्यपुरण आणि अनेक सूत्र ग्रंथांमध्ये दानाची महती येते. मकर संक्रांतीच्या वेळी काही विशिष्ट प्रकारची दाने करायची असतात. मत्स्यपुराणात असा उल्लेख येतो की या दिवशी तिलधेनु म्हणजे गाईची तिळाची प्रतिकृती बनवून ती दान करावी. विष्णूधर्मोत्तर पुराणात वस्त्र, तीळ, नांगराला जोडायची बैलांची जोडी दान करावी असा उल्लेख येतो.

    शिवरहस्यात असा नियम सांगितला आहे की, शंकराने गोसव यज्ञ केल्यानंतर सर्व लोकांच्या संतोषाकरिता मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळाची उत्पत्ती केली आहे. त्यामुळे या दिवशी पुरुषांनी तिलयुक्त पाण्याने आंघोळ करावी, अंगाला तीळ लावावे, देवांना आणि पितरांना तिलयुक्त पाण्याने तर्पण करावे, ब्राह्मणांना तीळ दान करावेत, तीळ भक्षण करावेत, तिळाचा होम करावा, तिळाच्या तेलाचे दिवे शंकराच्या देवालयात लावावे आणि ब्राह्मणानी तिळतांदूळांनी शिवाची पूजा करावी.

    तिलोद्वर्ती तिलस्नायी शुचिर्नित्यं तिलोदकी |

    होता दाता च भोक्ता च षट्तिली नावसीदति || – शातातप

    तसेच

    द्वादश्यां षट्तिलाचारं कृत्वा पापात् प्रमुच्यते॥

    तिलस्नायी तिलोद्वर्त्ती तिलहोमी तिलोदकी।

    तिलस्य दाता भोक्ता च षट्तिली नावसीदति॥ – शब्दकल्पद्रुमः

    उपरोक्त श्लोकामध्ये षट्तिलाचारं म्हणजे तिळाच्या सहा विनियोगांचे वर्णन आले आहे. तिलोद्वर्ती म्हणजे अंगाला तीळ चोळणे, तिलस्नायी म्हणजे तिलमिश्रित पाण्याने स्नान करणे, तिलोदकी म्हणजे तीळ आणि पाण्याने पितरांना तर्पण करणे, तिलाहोमी म्हणजे तिळांचा अग्निहोम करणे, तिळाचे दान देणे आणि भक्षण करणे असे एकूण सहा विनियोग सांगितले आहेत.

    दान देण्याच्या उत्तम काळाविषयी निर्देश धर्मशास्त्रात येतात त्यापैकी एक उत्तम काळ म्हणजे संक्रांत. दान देण्याच्या ज्या निरनिराळ्या पद्धत्ती प्रचलित होत्या. मत्स्यपुराणानुसार दहा पद्धतींच्या दानाची एक विशिष्ट पद्धत होती, त्यांना पर्वतदान किंवा मेरूदान असे म्हणत. अश्या प्रकारचे दान करताना दानकर्त्याने ठराविक पदार्थांचे पर्वताच्या आकाराचे ढीग दान करायचे असतात. या प्रकारच्या पर्वत दानांत धान्य, मीठ, गुळ, हेम (सोने), कापूस, तूप, रत्न, चांदी, साखर यांशिवाय तिळाचा समावेश आहे. पातके म्हणजे पापनिवारणाचा एक उत्तम मार्ग म्हणजे तिलदान हा सांगितला आहे.

    थोडक्यात, भारतीय संस्कृतीमध्ये असलेले तिळाचे महत्त्व बघता त्याचा इतिहास, उगम, वापर आणि धार्मिक महत्त्व या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला पाहता आला. आजही संक्रातीच्या निमित्ताने तिळाचा वापर टिकून आहे. त्यामुळे मकर संक्रातीच्या सर्वांना शुभेच्छा देत मी हेच म्हणेन तीळगुळ घ्या आणि स्वस्थ रहा!

    Refrence

    • Om, P. (1961). Food and drinks in ancient India: From earliest times to c. 1200 A.D. Delhi: Munshi Ram Manohar Lal.
    • Kane, P. V.(1930). History of dharmaśāstra. Poona: Bhandarkar Oriental Research Institute.
    • Dorothea Bedigian, History and lore of sesame in Southwest Asia – Economic Botany, Bedigian, D. Econ Bot (2004) 58: 329. https://doi.org/10.1663/0013-0001(2004)058[0329:AR]2.0.CO;2
    • मराठी विश्वकोश
  • आपला वारसा आपली संस्कृती (भाग 1)

    आपला वारसा आपली संस्कृती (भाग 1)

    आपला वारसा, आपली परंपरा, आपली संस्कृती असे अनेक शब्द आपल्या कानावरून अनेकदा गेले आहेत. त्यामुळे वारसा हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही. पण हा वारसा म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली एखादी गोष्ट. मग ती मूर्त रूपामधली एखादी वास्तू जसे की एखादा वाडा किंवा एखादे घर असेल, मूर्ती असेल किंवा कोणताही दृश्य स्वरूपाची वस्तू असेल. किंवा ती अमूर्त रूपामधली एखादी परंपरा असेल, कला असेल, किंवा एखाद्या विषयाचे ज्ञान असेल. अगदी बोलण्याची लकब, काही सवयी आणि स्वभाव सुद्धा आपला वारसाच असतो. आपल्या वाडवडीलांनाकडून मिळालेला वारसा आपण अभिमानाने जपतो आणि आपल्या पुढच्या पिढीला तो सुपूर्त करतो. तसाच समाजाचा एक भाग म्हणून, आपल्या पूर्वसुरींनी संस्कृतीचा वारसा आपल्या हाती सोपवला आहे. परंपरेने आपल्या पिढ्यांमध्ये चालत आलेल्या वारश्यापेक्षा अनेक हजारो वर्ष चालत आलेल्या सांस्कृतिक वारश्याचे परीघ निश्चितच मोठे आहे. पण हा सांस्कृतिक वारसा, व्यक्ती म्हणून आपल्याला उन्नत करतो. सगळ्याच जुन्या गोष्टी वारसा म्हणता येतील का असं विचारलं तर त्याचे उत्तर नाही असे द्यावं लागेल. कारण वारसा म्हणजे अश्या गोष्टी ज्यांचे महत्त्व त्या व्यक्तीला, कुटुंबाला, जमातीला, परिसराला, प्रदेशाला किंवा देशाला आहे. या प्रत्येक घटकाला एकत्रित किंवा त्यापैकी कोणा एकासाठी स्वतंत्र तरी तो वारसा महत्त्वपूर्ण असला पाहिजे.

    उदा. महाराष्ट्र भागातील वारली ही एक आदिवासी जमात आहे. या जमातीचा वारली चित्रं हा एक सांस्कृतिक ठेवा आहे. ही चित्रं, त्यांच्या सण- समारंभ, त्यांच्या चालीरीती, परंपरा यांचा एक भाग आहेत. थोडक्यात त्यांच्या जीवनातले महत्त्वाचे अंग म्हणता येईल. त्यांची घरे याचित्रांनी सुशोभीत केलेली असतात. ही लोककला असल्याने त्यात त्यांच्या जीवनातले भावभावनांचे उत्स्फूर्त रंग दिसतात. ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर असताना, त्यांच्यातील एकाला या कलेचे जतन करून, त्याची माहिती जगाला देण्याचे महत्त्व वाटले. पद्मश्री सन्मानित जिव्या सोमा मशे यांनी त्यांच्या जमातीचा हा वारसा जगासमोर आणला. त्यांंने वारली चित्रांचे रोज रेखाटन करून त्यातून पर्यावरण, जैवविविधता, संस्कृती, परंपरा, खेळ आणि समाज-दर्शन घडवले. या जमातीचे अस्तित्व किंवा वेगळेपण म्हणून ही चित्रं त्यांचा सांस्कृतिक वारसा आहेत आणि त्याचे त्यांना महत्त्व वाटले. इतकंच काय तर ही चित्रशैली महाराष्ट्र आणि भारताच्या आदिवासी दृश्यकलेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरली.

    आपला भारत देश, हा खरोखरीच वैविध्यतेने संपन्न असा देश आहे. आपल्या देशाला नैसर्गिक संपत्ती, वनराई, जैवविविधता विपुल प्रमाणत लाभल्या आहेत. याशिवाय धर्म, कला, खाद्य-संस्कृती, पाककला, परंपरा, बोली-भाषा, लिपी, साहित्य, नाट्य, लोकसंस्कृती अश्या अनेक गोष्टींची विविधता वर्षानुवर्षे इथे एकत्रित नांदत आहे. हीच खरी आपली ओळख आहे. हाच खरा आपला संस्कृतीक वारसा आहे. भारतीय नागरिक म्हणून या वैभवशाली संस्कृतीचे आपण उत्तराधिकारी आहोत. पण अधिकारांसोबत येते ती जबाबदारी. आपले हे वैभव वैयक्तिकदृष्ट्या, प्रांतिकदृष्ट्या आणि जागतिकदृष्ट्याही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे हा वारसा सांभाळण्याची जबाबदारी आपलीही आहे.

    वारसा संदर्भात तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. जागरुकता, जतन आणि संवर्धन. आपला वारसा जाणून घेणे ही झाली पहिली पायरी आहे. ही जागरूकता आपल्याला आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींचे भान देते. या जाणीवेतून वारश्याचे जतन आणि संवर्धन करण्यास सहाय्य होते. हा वारसा खरचं इतका महत्त्वाचा असेल तर तो जपणे ही तितकेच महत्त्वाचे आहे का? हा स्वाभाविक प्रश्न आहे. त्यामुळे वारसा आपल्याला नेमकं देतो तरी काय हे समजल्यावर तो जतन करण्याचे आपण प्रयत्न करू शकतो.    

    वारसा आपल्याला काय देतो
    • ओळख

    परंपरेने आलेला वारसा असो किंवा समाजाचा एक भाग म्हणून आलेला, वारसा आपल्याला स्वतःची ओळख मिळवून देतो. आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला निश्चित मार्ग दाखवतात.   

    • जाणीव

    वारसा आपल्या जाणीव देतो. जाणीव, समाजाचा एक भाग असल्याची. जाणीव, समाजात दडलेलं वैभव बघण्याची आणि जाणीव, समाजाने आपल्याला दिलेले परत समाजाला देण्याची.

    वारसा म्हणजे आपला इतिहास. त्यामुळे भूतकाळातील चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी त्यासोबत येतात. पण इतिहासातून हेच शिकायचं, की चांगल्या गोष्टींचे अनुकरण आणि वाईट गोष्टींचे दमन.

    • प्रेरणा

    इतिहासातील राज्यांच्या शौर्यगाथा आपल्याला प्रेरणा देतात. त्याच राज्यांची धर्मनिष्ठता आणि करुणा आपल्याला सन्मार्ग दाखवतात. मौर्य सम्राट अशोकाच्या शिलालेखांतून धर्मतत्त्वांचा प्रसार केलेला दिसतो. त्याकाळी त्याने सांस्कृतिक ऐक्य साधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद तो या लेखांमध्ये करतो. प्राचीन काळात भारतामध्ये आलेल्या कुषाण, क्षत्रपांसारख्या परकीय राज्यांनीही इथल्या संस्कृतीचा स्वीकार करून आपल्या परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या गोष्टी आपल्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आहेत.

    • अस्मिता

    अस्मिता म्हणजे आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याबद्दलची आणि ते महत्त्वपूर्ण असल्याबद्दलची भावना. आपली कार्यक्षेत्र भिन्न असतात. तरी संस्कृतीच्या वेगवेगळ्या पैलूंनी, आपल्या सर्वांना एकत्रित बांधले आहे. हा एकी भाव म्हणजेच अस्मिता जी या वारसा रूपाने आपल्याला मिळते.

    वारसा किती महत्वाचा आहे हे आपल्याला आत्तापर्यंत समजले असेलच. पण कोणकोणत्या गोष्टींना वारसा म्हणायचे? हा प्रश्न तसाच राहतो. याही प्रश्नाचे उत्तर आपण बघणार आहोत, पण पुढच्या भागात.

    (क्रमशः)

    आपला वारसा आपली संस्कृती (भाग 2)

  • पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे, थाथेर

    पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे, थाथेर

    पंजाब, भारतातील उत्तर पश्चिमी भाग हा तिथल्या मेहनती लोकांसाठी आणि तिथल्या दमदार संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. अमृतसर जवळील जन्दियाला गुरु, पंजाब इथे एक विलक्षण संस्कृती बघायला मिळते जी फाळणीनंतरच्या स्थलांतराचा परिणाम आहे.

    जन्दियाला गुरु ह्या ठिकाणी काही लोकं तांबे, पितळ आणि काही मिश्रधातू ह्या पासून पारंपारिक पद्धतीने भांडी बनवण्यात कुशल आहेत. तांबे, पितळ सारख्या धातूंचे मोडीत घातलेल्या वस्तू वितळवण्यासाठी जमिनीमध्ये मोठ्या भट्ट्या आहेत.

    वितळलेल्या धातूला बाहेर काढून लोखंडाच्या साच्यात गार केला जातो. हे छोट्या छोट्या साच्यातील धातूच्या तुकड्यांना साच्यातून बाहेर काढून यंत्राद्वारे आवश्यक जाडीनुसार त्याचे थर केले जातात. ह्या भांड्यांना ठोकून अकार दिला जातो. हातोडीने विविध आकारात भांडी घडवण्याची कला ह्या लोकांना अवगत आहे.

    Intangible Heritage of India -Traditional brass and copper craft of utensil making among the Thatheras of Jandiala Guru, Punjab

    थाळ्या, परात, गोल भांडी, उभट पेले अश्या अनेक आकारात ही भांडी तयार होतात. ह्या बनवलेल्या भांड्यांना चकाकी आणण्यासाठीही पारंपारिक पद्धतीने हाताने, सौम्य अम्लांचा वापर करून नंतर चिंचेच्या पाण्याने चकाकी आणतात. नंतर मातीने भांडी चोळली जातात, इथे हे लोक त्यासाठी पायांचा वापर करतात.

    ह्या धातूपासून धार्मिक विधींसाठी उपयोगात आणली जाणारी भांडी वापरली जातात. मधुपर्खा नामक तांबे, झिंक आणि कथील ह्या धातूपासून बनविलेले मिश्र धातूंचे भांडे सुरमा (Kohl) बनवण्यासाठी वापरतात. विजयकंठा नामक तांब्याचे भांडे ज्याचा वापर प्रार्थनेच्यावेळी थाळ वाजवण्यासाठी होतो (Gong). छायापात्र नामक वाटीसारख्या लहान पत्रात तेल भरले जाते. लग्नविधीमध्ये वधु आणि वर त्यांचे प्रतिबिंब ह्यात बघतात.   

    अल्युमिनियम आणि स्टील ह्यांच्या वाढत्या मागणी मुळे ह्या पारंपारिक व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. ह्याचे दुसरे कारण हेही आहे कि लोकांना दैनंदिन जीवनात ह्या भांड्यांची देखभाल करणे आणि ते स्वच्छ ठेवणे कठीण आहे, परंतु आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे.

    त्यामुळेच हळूहळू लुप्त होत चाललेल्या ह्या पारंपारिक कलेला 2014 साली युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.

     

    Photo Credits : UNESCO

  • संकीर्तन

    संकीर्तन

    सत् युगामध्ये विष्णूच्या ध्यानाने, त्रेता युगामध्ये यज्ञीय समर्पणाने, द्वापार युगामध्ये भगवंताच्या चरण सेवेने जे फळ प्राप्त होईल तेच कलीयुगामध्ये केवळ संकीर्तनाने साध्य होईल, हे मानणारी परंपरा म्हणजे मणिपुरमधील संकीर्तन. इ.स. 15 शतकात मणिपूरचा राजा भागचन्द्र सिंह ह्याने संकीर्तन जनसामान्यात रुजवले.

    संकीर्तन म्हणजे ज्ञानाचे माध्यम मानणाऱ्या वैष्णव पंथीय लोकांची परंपरा आहे. मणिपुरी लोक यज्ञीय समर्पण किंवा कोणत्याही विधीविधावतांना मनात नाहीत. प्रार्थना किंवा धार्मिक सण-समारंभासाठी संकीर्तन हेच महत्वाचे मानले जाते.

    संकीर्तानाचे अनेक प्रकार असले तरी त्यांची सुरुवात ही अतिशय क्लिष्ट अश्या धार्मिक विधींनी होते, ज्यात चंदन, दिवा, धूप आणि वस्त्र दानं दिले जातात. संकीर्तानाच्या सादरीकरणाची सुरुवात ही संगीत प्रस्तावनेने होते. ही सुरुवात राग चंद्रिकेत संगीतबद्ध असते.

    मुख्य कथाभाग सांगण्यासाठी कमीत कमी तीन तासांचा कालावधी लागतो. संकीर्तनाच्या कथा ह्या राधा आणि कृष्ण ह्यांवर आधारित असतात. संकीर्तन करताना सादरकर्ते नृत्यही करतात. हे नृत्य करत असताना काही विशिष्ट कल्पनांसाठी विशिष्ट संकेत योजना केली जाते त्याला कर्तालचोलम म्हणतात. वाद्यवृंद विविध प्रकारच्या ताल आणि ठेक्यांद्वारा विविधता प्रस्तुत करतात.

    Intangible Heritage of India – Sankirtana of Manipur

    स्त्रिया आणि पुरुष दोघांचेही संकीर्तन असते. त्यापैकी स्त्रियांचे संकीर्तन हे विलक्षण असून उच्च स्वरात ते गायले जाते. संकीर्तानातील विधी आणि अनुष्ठान इतके सरळ असतात कि प्रेक्षकही त्यांना नेमून दिलेल्या जागांवर बसतात आणि सादरीकरणाच्या मधे उठून जाऊ शकत नाही. प्रेक्षक हे संकीर्तन सदर करणाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यसाठी त्यांना वाकून नमस्कार करतात. कलाकार संकीर्तन सादर करण्याचे पैसे ठरवत नाहीत. लोकं स्वइच्छेने पैसे किंवा इतर गोष्टी, जे अर्पण करतात ते हे कलाकार घेतात. ही गुरु-शिष्य परंपरा आहे.

    पुरुषांच्या संकीर्तन एकूण 14 मृदुंग वादक सादरीकरण करतात. संकीर्तन मणिपुरी वैष्णव पंथी लोकांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगी गायले जाते. जसे लहानपणी कान टोचण्याचा विधी, यज्ञोपवीत धारण करताना, लग्नात वधु संकीर्तनाच्या संगीतावर तालबद्ध पावले टाकते आणि अंत्यविधी साठीही. ह्याशिवाय हिंदू कालनिर्णयाप्रमाणे सर्व सण साजरे करताना संकीर्तन केले जाते. जगन्नाथ रथयात्रेच्या वेळी संकीर्तानाची प्रस्तुती होते त्यावेळी कलाकार नृत्य आणि हाताने टाळ्या वाजून संकीर्तन सदर करतात.  

    झुलन यात्रा पावसाळ्यात साजरी केली जाते, त्यावेळी कलाकार मृदुंग आणि मंजिऱ्या संकीर्तानासाठी वापरतात. तर हिवाळ्यात सोयोन संकीर्तन केले जाते ज्यात कलाकार मृदुंगासह झांज ह्या वाद्यांचा वापर करतात. होलीपाला संकीर्तन हे वसंतऋतूमध्ये सदर करतात, ह्यात वेगवेगळ्या ढोलांचा समावेश असतो.

    मणिपूरचे संकीर्तन हे तिथल्या उत्स्फूर्त जीवनाचे प्रतिक आहे जे लोकांमध्ये एकात्म भाव टिकवून आहे. संपूर्ण समाज संकीर्तन जपण्याच्या दृष्टीने कार्यरत असतो. त्यामुळेच 2013 साली संकीर्तनाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात पारंपारिक तांबे पितळीची भांडी बनवणारे थाथेर ह्यांची माहिती घेऊया.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO

  • बौद्ध पठण परंपरा, लडाख

    बौद्ध पठण परंपरा, लडाख

    बौद्ध धर्मशाळा आणि लडाख मधील गावात बौद्ध लामा किंवा धर्मगुरू, त्यांच्या पवित्र मंत्राचे पठाण करतात. हे पवित्र मंत्र त्यांचे तत्वज्ञान, बुद्धाची शिकवण सांगणे आहे.

    लडाखमध्ये महायान आणि वज्रयान ह्या पंथाची उपासना चालते. त्यापैकी चार महत्वाचे संप्रदाय मानले जातात. हे संप्रदाय म्हणजे न्यागम, कागयुड, शाक्य आणि गेलूक.

    प्रत्येक संप्रदायाची मंत्र पठणाची एक विशिष्ट पद्धत आहे. हे संप्रदाय त्या मंत्राचे पठण कालचक्र विधी, बौद्ध धर्मातील महत्वाच्या दिवशी किंवा कृषी दिनदर्शिकेप्रमाणे म्हणायची प्रथा आहे. ह्या मंत्र पठणाचा मूळ हेतू हा आहे कि लोकांचे अध्यात्मिक आणि नैतिक कल्याण व्हावे. तसेच मानसिक शुद्धता आणि शांतता प्रस्थापित व्हावी. दुष्ट शक्तींना खुष करून घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हे मंत्र पठण करतात. ह्या मंत्र पठणाने बुद्ध, बोधिसत्व, इतर देवता आणि रिन्पोचे (धर्मगुरु) ह्यांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. हे मंत्र समूहाने म्हणायचे असतात.

    एकतर घरामध्ये किंवा बौद्ध मठामध्ये नृत्य करून हे मंत्र म्हटले जातात. हे मंत्र खाजगी घरांमध्ये किंवा अंगणात म्हणता येतात. बौद्ध मंत्र पठण परंपरा म्हणजे एक कलात्मक अभिव्यक्ती आहे जी बौद्ध अनुयायांचा बौद्ध धर्मावरील विश्वास दर्शवते.

    Intangible Heritage of India – Buddhist chanting of Ladakh
    Shargangrima

    ही गेलूक संप्रदायाची पठण परंपरा आहे. ह्याचे मंत्र पठण हे भिक्षु ही करतात आणि सामान्य लोकही करतात. ह्यांच्या पठणाच्या काही कडक नियमांचे पालन करावे लागते. ह्यात आवाजाचे स्वरनियमन महत्वाचे असते. लामा ह्या मंत्राचे पठण मोठ्याने म्हणून इतर लामा आणि बौद्ध भिक्षुंकडून म्हणवून घेतात.

    Nasthan Phyagdzod

    हे मंत्र हे बुद्धाच्या 16 अर्हतांच्या साठी म्हटले जाते. बुद्धाची शिकवण समजवण्यासाठी हे 16 अर्हत पृथ्वीवर सदैव राहावेत ह्यासाठी ही प्रार्थना केली जाते. ह्यात पद्धतीत भिक्षु प्रतीकात्मक रूपात संगीत, सुगंधी द्रव्ये, नृत्य, फुले, दिवा आणि भोजन ह्या अर्हतांना अर्पण करतात.

    प्रत्येक छंदानंतर मध्ये मध्ये बासरी, झांज, ढोल आणि घंटी वाजवली जाते. भिक्षुंना ह्या मंत्र पठणासाठी गावातील घरांमध्येही बोलावले जाते. हे भिक्षु वाईट शक्तींना किंवा देवतांच्या रागाला शांत करून त्यांच्या कृपाशिर्वादासाठी घरांमध्ये पठण करतात.

    Kunrig

    शाक्य आणि गेलूक संप्रदायातील बौद्ध भिक्षु हे मंत्र पठण करतात. हे मंत्र पठण करताना ते स्वतः ज्ञानप्राप्ती करून घेतली आहे असे समजून विविध हस्त मुद्रा करतात. बुद्धाची शिकवण आणि त्याची इतर विशिष्ट लक्षणे ही ह्या मुद्रांमधून व्यक्त करतात. मंत्र पठण करताना भिक्षु स्वतःला ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी मानतात, जिथे त्यांच्या अजुबाजूला बुद्ध, बोधिसत्व, दिव्य लोकं, संरक्षक देवता, इतर देवता आणि रिन्पोचे असतात. ह्यांचे प्रमुख भिक्षु हे लोकांना आशीर्वाद देण्यासाठी समाजात फिरतात.

    Chod

    ह्या मंत्र पठणाच्या परंपरेत भौतिक शरीर हे चैतन्यापासून वेगळे होते. हे मंत्र एकांतात, स्मशानात म्हटले जातात. ह्या मंत्रांसाठी एकाग्रतेची आवश्यकता असते आणि निवडक भिक्षुंनीच ते म्हणायचे असतात. हे भिक्षु त्या मंत्र पठाणाची दीक्षा घेतात.  

    मंत्र पठण हे लडाख मधील मठांमध्ये किंवा प्रार्थना गृहांमध्ये दैनंदिन चालणारा भाग आहे, त्यामुळे मंत्र पठण हा तिथला सांस्कृतिक ठेवा आहे जो स्थानिक लोकांच्या आणि भिक्षूंच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.  

    2012 साली ह्या बौद्ध मंत्र पठण परंपरेला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.
    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात मणिपूर मधील संकीर्तनाची माहिती घेऊया.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO

  • छउ नृत्य

    छउ नृत्य

    पूर्व भारतातील एक नृत्य प्रकार म्हणजे छउ. छउ ह्या नृत्यामध्ये महाभारत आणि रामायण किंवा कधीकधी स्थानिक लोकांच्या कथा सादर केल्या जातात.

    छउ ह्याचा संस्कृत शब्द होतो, छाया म्हणजे सावली किंवा छावणी. ही नृत्यशैली वडील आपल्या मुलाला शिकवतात आणि हा वारसा पुढे प्रवाहित होतो. नृत्य लढाऊ शैलीचे असल्याने ह्यात उत्साहपूर्ण  हालचाली आणि प्रचंड ताकद आवश्यक असते, त्यामुळे मुख्यतः हे नृत्य पुरुषांसाठी आहे. ह्या नृत्य शैलीत वीररस हा प्रधान रस असतो. छाउ नृत्याच्या तीन प्रादेशिक नृत्यशैली आहेत.

    Intangible Heritage of India – Chhau Dance
    सराईकेला छउ

    सराईकेला छउ नृत्यशैली प्रामुख्याने बिहार भागात बघयला मिळते. ह्यात मुखवट्यांचा वापर केला जातो. सराईकेला छउच्या प्राथमिक सदरीकरणाला फारी-खांडा-खेला म्हणतात. ज्याचा शाब्दिक अर्थ होतो ढाल-तलवारीचे नाटकं

    पुरुलिया छउ

    पुरुलिया छउ नृत्यशैली प्रामुख्याने पश्चिम बंगाल भागात बघयला मिळते. ह्यात मुखवट्यांचा वापर केला जातो. पुरूलिया छउची नृत्यप्रस्तुती ही मुख्यतः युद्धाशी संबंधित असते.

    मयुरभंज छउ

    मयुरभंज छउ नृत्यशैली प्रामुख्याने ओरिसा भागात बघायला मिळते. ह्यात मात्र मुखवट्यांचा वापर दिसत नाही. मयूरभंज छउच्या प्राथमिक सदरीकरणाला रुक-मार-नाचा म्हणतात. ज्याचा शाब्दिक अर्थ होतो सुरक्षा आणि आक्रमणाचे नृत्य

    चैत्र पर्वात छउ नृत्याचे सादरीकरण मोठ्या प्रमाणात होते. ह्या  नृत्यात लढाऊ तंत्राशी निगडित हालचाली तर असतातच शिवाय प्राण्यापक्ष्यांचे हावभाव आणि त्यांची हालचाल किंवा गृहिणींच्या दैनंदिन कामाशी निगडित हालचाली, जसे कि झाडून घेणे, अंगणात सडा घालणे, रांगोळी काढणे इत्यादी नृत्यातून सादर केल्या जातात.

    छउ नृत्य  हे रात्रीच्या वेळी मोकळ्या आवारात पारंपरिक पद्धतीने सादर केले जाते. ह्यात मुख्यतः शहनाई, बासरी, ढोल, ढोलकी अश्या वाद्यांचा वापर होतो. छउ हा त्या समुदायाच्या जीवनातील एक अविभाज्य  घटक आहे. सर्व जाती-जमातींचे लोकं एकत्र येऊन ह्या नृत्याचा रसास्वाद घेतात. छउ नृत्य करणारे त्यांचे व्यवसाय आणि दिवसभराची कामे आटपून ह्या कलेची साधना जपत आहेत.

    2010 साली छउ नृत्य  प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. त्यामुळे छउ नृत्य शैलीची जगाला माहिती तर झालीच शिवाय हा वारसा जपला ही इथून पुढे जाईल.  

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात लडाख येथील बौद्ध पठण परंपरेची माहिती घेऊया.

    (क्रमशः)

    Photo Credits : Internet

  • कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य

    कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य

    राजस्थानमधील साप पकडणाऱ्या कालबेलिया लोकांचे पारंपारिक नृत्य आणि संगीत आहे. कालबेलिया हे भटक्या जमातींपैकी एक असून ते जिथे राहतात त्यांना डेरा म्हणतात.

    हे गरुडी लोकं त्यांच्या जवळच्या वेतापासून बनवलेल्या टोपीतून सापांना घेऊन गावातील घराघरातून दानं मागत फिरतात. कालबेलिया जमातीचे समाजात एक विशिष्ट स्थान आहे. कालबेलिया जमातीच्या लोकांसाठी त्यांची परंपरा, हा अभिमानाचा विषय आहे.

    कालबेलिया जमातीमधील स्त्रिया गाणी गाऊन आणि नाचून दानं मागतात. गाण्यांमधून आणि नृत्यातून ते लोकांचे मनोरंजनही करतात. ह्या गाण्यांचा आशय हा त्या गावातील दंतकथा, प्रेमकथा यांच्याशी निगडीत असतो. दैनंदिन जीवनातही त्यांच्या उत्स्फूर्त गाण्यांचा समावेश असतो.

    त्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये बाजरी हे मुख्य धान्य असते. बाजरीची भाकरी आणि भाजी असा त्यांचा आहार असतो.

    Intangible Heritage of India -Kalbelia folk songs and dances of Rajasthan

    पारंपारिक पेहराव आणि रंगभूषा

    वाळवंटी प्रदेशात असूनही त्यांचा पेहराव हा रंगेबेरंगी असतो. विशेष प्रसंगासाठी ह्या स्त्रिया काळ्या रंगाचा घागरा आणि चोळी घालतात. ह्या स्त्रियांच्या पोशाखावर अराश्याचे काम करतात. हे अराश्याचे काम चंदेरी दोऱ्याने केलेले असते.

    पुरुषांचा पोशाख म्हणजे पांढरा लेहेंगा आणि झब्बा आणि डोक्याला रंगेबेरंगी फेटा बांधलेला असतो.

    वाद्यांमध्ये हलगी, मंजिरे, खंजिरी आणि पुंगी हे मुख्य वाद्य असून पुरुष ह्या वाद्यांचा वापर करतात.

    कालबेलियांचा पारंपारिक नृत्यप्रकाराला मटकू म्हणतात जो त्यांच्या दैनंदिन जीवनाचाही एक भाग आहे. मटकू मध्ये स्त्रिया त्यांच्या कमरेपासून वरच्या अंगाचा आणि हातांचा वापर अधिक करतात. ह्या नृत्यप्रकारात गाणी म्हटली जात नाहीत. केवळ वाद्यांच्या ठेक्यावर स्त्रिया नृत्य करतात.  

    लूर नृत्य हे होळी सारख्या सणाच्या दिवशी स्त्रिया करतात. अतिशय प्रसन्नता आणि आनंद देणारी ही गाणी असतात. त्यांची ही संगीत आणि नृत्य परंपरा आणि त्यातली सहजता ही त्यांच्या रोजच्या रियाजामुळे दिसते.

    नृत्यामधील हालचाली ह्या सापांप्रमाणे लवचिक असतात. अनेक कसरतीचे खेळही त्यांच्या नृत्यप्रकारात समाविष्ट झालेलेल आहेत, जसे डोळ्यांच्या पापण्यांनी अंगठ्या उचलणे वगैरे. कालबेलिया जमातीच्या ह्या भटके लोक त्याचा सांस्कृतिक वारसा जपत, उत्स्फूर्तपणे त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करताना दिसतात. बदलत्या सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेत त्यांच्या समुदायाचे प्रयत्न दिसून येते.

    2010 साली कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. त्यामुळे आता जगभरात त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे.

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात पूर्व भारतातील एक नृत्यप्रकार बघूया.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO

  • मुडीयट्टू

    मुडीयट्टू

    मुडीयट्टू हा केरळ मधील मंदिरात सादर होणारा धार्मिक नृत्य, नाट्य प्रकार आहे.  देवी काली आणि क्रूर राजा दारूक यांच्या युद्धप्रसंगावर आधारित पौराणिक कथेशी संबंधित हा विधी आहे.

    हा धार्मिक विधी हा स्थानिक समुदाय एकत्र येऊन साजरा करतात. मुडीयट्टू सदरीकारंचा मूळ हेतू शुद्धीकरण आणि नवीन उत्साह जनसामान्यात राहावा हा आहे. उन्हाळी पिकांच्या कापणी नंतर एका ठराविक दिवशी गावातील लोकं सकाळी लवकर मंदिरात जमतात. हा उत्सव देवीच्या सन्मानासाठी हे लोकं करतात.

    मुडीयट्टू सादरकर्ता हा स्वतः उपास आणि प्रार्थना करून स्वतःला पवित्र करून घेतो. त्यानंतर देवी कालीची मोठ्ठी रांगोळी ही मंदिराच्या आवारात हे सादरकर्ते घालतात. त्या रांगोळीला कोलम / कलम असे म्हणतात. ही रांगोळी विविध रंगानी सुशोभित केली जाते आणि देवीला जागृत केले जाते. देवीला जागृत करण्यासाठी पारंपारिक वाद्यांसह पारंपारिक गाणी म्हटली जातात, त्यांना कलम पट्टू म्हणतात. कलम पट्टू म्हणजे डोक्यापासून पायापर्येंत वर्णन या गाण्यात असते.

    मुडीयट्टू सदरकरणारा वाद्यवृंद याला केलीयट्टू म्हणतात. हे लोकं सोपान संगीत किंवा मंदिरात म्हंटले जाणारे संगीत यामध्ये कुशल असतात. दुपारी केली जाणारी उछपूजा ही रूपक ताल आणि मल्हार रागात करतात.

    Intangible Heritage of India – Mudiyettu, ritual theatre and dance drama of Kerala

    अनेक तासांच्या मेहनतीनंतर मुडीयट्टू सदरकर्ता परंपारिक रंगभूषा आणि वेशभूषा करून तयार होतो.  मुडीयट्टू सदरकर्ता रंगभूषा आणि वेशभूषा करून तयार झाला कि त्याच्यात कालीचा प्रवेश झाला अशी मान्यता आहे. त्यामुळे आता देवी कालीच्या स्वागतासाठी संपूर्ण गावं कालीवर विड्याच्या पानांचा वर्षाव करतात. त्यांच्यावर प्रसन्न होऊन देवी काली तिच्या भक्तांवर साळीच्या दाण्यांचा वर्षाव करते. हे  धन, धान्य आणि समृद्धीचे प्रतिक मानतात. नंतर काली गावातील विविध घरांत जाऊन तिचा आशीर्वाद लोकांना देते. आणि त्यानंतर कलम म्हणजे ती देवीची रांगोळी पुसून ह्या विधीची सांगता होते.

    यानंतर नृत्य-नाट्य ह्यांचे सदरीकरण असते. रांगोळीच्या जवळील दिवा हा सादरीकरण करण्याच्या जागी आणला जातो आणि  त्याने दिपप्रज्वलन केले जाते. वाद्यवृंद वाद्य वाजून गावातील लोकांना जमा करतात आणि सदरीकरण सुरु होते. हे सादरीकरण जिथे सादर केले जाते त्याला भगवती काऊ म्हणतात म्हणजेच कालीचे मंदिर. या सादरीकरणात काव्य आणि संवाद दोन्हींचा समावेश असतो. कुली नामक पात्र कालीच्या मदतीला येते. काली आणि कुली मिळून दारूक आणि धनवेन्द्रचा पराभव करतात.  कालीच्या विजयाचे प्रतिक म्हणून मशाली घेऊन भक्त आपल्या घरी जातात.

    मुडीयट्टूमध्ये तीन लक्षणे महत्वाची ठरतात

    1. चित्र वदिव्यू –  चित्रातील पूर्णता
    2. शिल्प वदिव्यू –  पात्र पूर्णता
    3. भूत वदिव्यू –  धार्मिक पूर्णता

    याशिवाय वेशभूषेतील काटेकोरपणा, वाचिक पुष्टी म्हणजे संवाद आणि संगीतातील काटेकोरपणा, आंगिक पुष्टी म्हणजे आंगिक अभिनय, सात्विक पुष्टी म्हणजे भावनिक अभिनयातील काटेकोरपणा, नृत्य पुष्टी म्हणजे नृत्यातील काटेकोरपणा, रंग पुष्टी म्हणजे रंगमंचावरील नाटकीय प्रदर्शनातील काटेकोरपणा हे सर्व घटक महत्त्वाचे असतात.

    2010 साली या धार्मिक नृत्य-नाट्य प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. त्यामुळे आता जगभरात या परंपरेला प्रसिद्धी मिळाली आहे.

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य विषयी माहिती घेऊया.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO

  • नवरोझ

    नवरोझ

    नवरोझ म्हणजे पारशी नववर्ष. नवरोझ इंग्रजीमध्ये Novruz, Nowrouz, Nooruz, Navruz, Nauroz किंवा  Nevruz अश्याप्रकारे विविध पद्धतीत लिहिले जातात.

    सांस्कृतिक दृष्टीनी महत्वाच्या असलेल्या ह्या पारशी सणासाठी अनेक देशांनी पुढाकार घेऊन ह्या सणाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ह्या देशांमध्ये भारत, इराण,पाकिस्थान, उजबेगीस्थान, अझरबैजान, किर्गीजस्थान आणि तुर्कस्थान ह्यांचा समावेश आहे.

    विशाल भौगोलिक क्षेत्रावर वसंत ऋतूच्या आगमनासाठी दरवर्षी नवरोझ हा 21 मार्चला साजरा केला जातो. नवरोझ हा स्थानिक परंपरांशी निगडित असलेला सण आहे जो पारशी स्त्रियांनी पारंपरिक पद्धतीने जातन केला आहे. नवरोझ हा जमशेदच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

    Intangible Heritage of India -Nawrouz

    हा सण  एका विशिष्ट  पद्धतीने साजरा केला जातो. ह्यात पारंपरिक गाणी, खेळ, पारशी लोकांची खाद्यसंस्कृती, रांगोळ्या, कथा ह्यांचा समावेश होतो. घोड्यांच्या शर्यती, कुस्ती सारखे खेळही खेळले जातात. ह्याशिवाय पाण्यावरून, आगीवरून उड्या मारणे, आगीवरून चालणे असे चित्तथरारक खेळही खेळले जातात. धार्मिक विधींमध्ये शांतता, मैत्री आणि शेजारधर्मासाठी, सर्व मानवजमातींमध्ये शांतात प्रस्थापित होण्यासाठी प्रार्थना केल्या जातात. घराबाहेर मेणबत्या प्रज्वलित केल्या जातात.


    2009 साली नवरोझ ह्या पारशी सणाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात केरळ मधील मुडीयट्टू म्हणजे काय ते बघूया.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO

  • रम्मन, घढवाल प्रांतातील धार्मिक नाट्य परंपरा आणि उत्सव

    रम्मन, घढवाल प्रांतातील धार्मिक नाट्य परंपरा आणि उत्सव

    रम्मन हा हिमाचल प्रदेशातील घढवाल प्रदेशातील संरक्षक देवाच्या सन्मानार्थ केला जाणारा धार्मिक सण आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस, हे कृषिप्रधान संस्कृतीतील लोकं रम्मन साजरा करतात.

    उत्तराखंडातील सलूर -डुंग्रा ही दोन जोडगावे हा सण एकत्र  येऊन करतात.  भूमियाल देवता ह्या स्थानिक संरक्षक देवता मानतात. ह्यात अनेक क्लिष्ट स्वरूपाचे विधी केले जातात.

    रामायणावर किंवा रामावर आधारित कथा, कृष्णावर आधारित कथा सादर केल्या जातात. ह्याशिवाय महाभारतावर आणि पांडवांवर आधारित कथांचा ह्यात समावेश होतो. ह्यात घढवाली आणि गोरख्यांच्या लढाईचेही प्रसंग सादर केले जातात. काही सामाजिक जनजीवनातील प्रसंगही लोकांच्या समोर सादर करतात.

    जवळजवळ 192 कुटुंब हा सण साजरा करायला एकत्र  येतात. ह्यात 18 चरित्र, त्यांना लागणारे 18 मुखवटे आणि 18 पुराणांचे समारंभपूर्वक प्रशंसा असा एकूण प्रकार असतो.   

    Intangible Heritage of India -Ramman, Religious Festival

    ह्यातील मुखवटे हे अत्यंत पवित्र  मानले जातात आणि त्यांचा यथोचित पूजा करून फक्त सादरकरत्याला घालता येतात. ह्या उत्सवाची आखणी आणि तयारी गावकरी करतात. गावातील प्रत्येक जातीच्या व्यक्तीला एक विशिष्ट्य काम नेमून दिलेलं  असते, जसे गावातील वृद्ध आणि लहान मुलं हे सादरीकरण करणार. ब्राम्हण पूजाविधी आणि इतर धार्मिक क्रियांचे संचालन करणार.  

    ह्या गावातील भंडारी जातीच्या क्षत्रियांना मनाचे स्थान आहे. त्यांना नरसिंहांचा पवित्र  मुखवटा घालण्याचा मान असतो. नरसिंह म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा पशु.  

    रम्मन हा सण म्हणजे नाट्य, संगीत, ऐतिहासिक घडामोडी, पारंपारिक लिखित आणि अलिखित काव्य आणि कथा ह्यांचा एकत्रित उत्सव. विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन हे तिथल्या निसर्गाच्या सानिध्यात तर होतेच शिवाय तिथले समाज जीवन, धार्मिक-सांस्कृतिक रीतीरिवाज, मिथक ही रम्मन सारख्या सणातून व्यक्त होतात.

    रम्मनच्या विविधते मुळेच 2009 साली ह्या सणाला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले.

    भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात नवरोझ ह्या पारशी सणाविषयी जाणून घेऊ.

    (क्रमशः)

    Photo Credits : UNESCO