लोकसाहित्य आणि भारतीय विद्या

Home \ बोधसूत्र \ लोकसाहित्य आणि भारतीय विद्या

आज जशी तंत्रज्ञान युगाने लहान मुलांच्या हातामध्ये अनेक Digitized खेळणी दिली आहेत तशी खेळणी मी लहान असताना माझ्याकडे नव्हती. किंबहुना माझ्या वयाच्या कुणाकडेच नव्हती. आमच्या घरासमोर एक आजी रहायच्या. पटवर्धन आजी. दररोज संध्याकाळी त्या त्यांच्या बाल्कनीमध्ये खुर्चीवर बसून रस्त्यावरची वर्दळ बघत चहा घ्यायच्या. पटवर्धन आजींंचा अजून एक विरंगुळा होता, तो म्हणजे माझ्यासारख्या लहान मुलांना त्या रोज गोष्टी सांगायच्या. मी खूपदा त्यांच्या बाल्कनीमध्ये आजींंच्या पुढे बसून अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. ही फक्त माझीच गोष्ट आहे असं नाही. आपल्यापैकी प्रत्येकानेच आपल्या आजीकडून खूप गोष्टी ऐकल्या असतील. कधी त्या इसापनीतीच्या गोष्टी असतील किंवा कधी पंचतंत्रातल्या असतील. देवांच्या, असुरांच्या, परींच्या असतील किंवा कोणाची मुशाफिरी असेल. आपण या कथांमधून आपलं बालपण जगलो. त्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टींनी आपलं बालपण समृद्ध केलं. त्या गोष्टी, त्या कथा, मिथक हे लोकसाहित्याचा एक महत्वाचा भाग आहे, हे समजवून सांगणाऱ्या एक दुसऱ्या आजी आहेत. ज्या माझा भारतीय विद्येमधला प्रवास समृद्ध करतायेत. दुर्गा आजी म्हणजेच दुर्गा भागवत. आपली संस्कृती, भारतीय साहित्य आणि समाज यांचा संशोधनात्मक वेध ज्यांनी आयुष्भर घेतला अश्या दुर्गा भागवत. Folklore या इंग्रजी संज्ञेला लोकसाहित्य ही पर्यायी मराठी संज्ञा पहिल्यांदा वापरली ती समाजशास्त्रज्ञ व लोकसाहित्यविशारद दुर्गाबाई भागवत यांनी. पण लोकसाहित्य म्हणजे केवळ कथा असे नाही. लोकसाहित्याची व्याप्ती मोठी आहे. लोककथा, लोकगीते, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, लोकोक्ती, लोकपुराणें याशिवाय लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, हस्तकला, क्रीडा, संगीत, वैद्यकीय आणि रूढी, श्रद्धा, परंपरा, मंत्र आणि तोडगे ही लोकसाहित्याची वैविध्यपूर्ण अंग आहेत. आज जागतिक लोकसाहित्य दिनानिमित्त लोकसाहित्य आणि भारतीयविद्या (Indology) यांचा परस्पर संबंध या विषयावर मी थोडा प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न करणार आहे.

लोकसाहित्य म्हणजे Folklore ही संज्ञा विल्यम जॉन थॉमस या ब्रिटीश लोकसंख्याशास्त्रज्ञने (Demographer) 1846 मध्ये प्रथम वापरली. वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार म्हणजे लोकसाहित्य. लोकसाहित्यातील लोक या संज्ञेचा अर्थ भारतीय आणि पाश्चिमात्य अभ्यासकांनी वेगवेगळा घेतला आहे. त्यामुळे कदाचित लोकसाहित्य म्हणजे आदमी लोकांचे साहित्य असा एक समज झाला आहे किंवा तसा होण्याचा संभाव असतो. पण एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्सेस (Encyclopedia of the Social Sciences) सारख्या विषयकोशांतून आणि डिक्शनरी ऑफ फोकलोअर(Folklore) , मायथॉलॉजी (Mythology), अँड लेजंड्स (Legends) या बृहत् व्याख्या-कोशातून Folklore च्या अर्थाची व्याप्ती आणि स्वरूप जास्त स्पष्ट होताना दिसते.

लोकसाहित्यात, लोकजीवनामध्ये समूहप्रतिभेच्या आणि समूहमानसाच्या अबोध प्रेरणेतून आपोआप निर्माण झालेले व आपोआप परंपरेने टिकत आलेले सर्व घटक समाविष्ट होतात. त्यात कथा, गीते, म्हणी, उखाणे, कोडी, लोकप्रचलित मंत्र इ. सर्व साहित्याबरोबरच लोकप्रचलित धर्मविधी, श्रद्धा, देवदेवता, रूढी, चालीरीती, धारणा, व्रतवैकल्ये, उपासना, सर्व कला, कारागिरी, क्रीडा, वैद्यक, अन्नवस्त्रादी नित्योपयोगी वस्तू व त्यांच्या उपयोगाच्या रीती या सर्वांचा समावेश होतो.

लोकसंस्कृती आणि त्यातून निर्माण होणारे लोकसाहित्य हे संस्कृती अभ्यासातील एक महत्वाचे अंग आहे, हे आपण बऱ्याचदा विसरतो. पण भारतमध्ये लोकसाहित्याच्या अभ्यासाची सुरुवात ही ब्रिटीश राजवटीमध्ये झालेली दिसते. युरोपमध्ये 18 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये तौलनिक भाषाशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झाली. इथून भारतीयविद्या या शाखेचा प्रारंभ म्हणता येईल. कारण इथूनच पुढे तौलनिक दैवतशास्त्र, आचारशास्त्र आणि इतिहास यांची मांडणी होत गेलेली दिसते. भारतीयविद्या अभ्यासात संस्कृती अध्यायनाची ही मांडणी विविध साधनांच्या आधारे अभ्यासता येते. सर विलिअम जोन्स यांच्या नेतृत्वाखाली 1774 मध्ये कलकत्ता येथे स्थापन झालेली The Asiatic Society आणि दुसरी Royal Asiatic Society या संस्थांमधून लोकसाहित्यावर काम झाले.  पण 1872 मध्ये मुंबईत, पुरातत्त्वशास्त्रज्ञ जेम्स बर्जेस यांच्या The Indian Antiquary, A journal of oriental research नियतकालिकातून पुरातत्त्व, इतिहास, साहित्य, भाषा, तत्त्वज्ञान, धर्म, ह्यांच्या सोबत दैवतकथा (myths) आणि लोकसाहित्याचाही अभ्यास सुरु झाला. सुरवातीला केवळ मानववंशशास्त्र (anthropology) दृष्टीने होणारा अभ्यासाची क्षितिजे रुंदावून भारतीयविद्या (Indology) आणि समाजशास्त्र (sociology) या ज्ञानशाखांमध्ये लोकसंस्कृतीचा विचार आणि अभ्यास केला जाऊ लागला.

लोकपरंपरा आणि इतिहास यांत रा.चिं.ढेरे यांनी कोरीव लेख, इतिहास आणि लोकसाहित्य यांचा असलेला घनिष्ट संबंध समजावून सांगितला आहे. इतिहास लेखनातील महत्त्वाचे साधन म्हणजे अभिलेख. या अभिलेखांच्या आधारे राजकीय परिस्थिती आपण समजून घेतो. पण ढेरे म्हणतात

अनेक कोरीव लेखांत विशिष्ट स्थानांचा महिमा सांगताना स्थानमहिमापोषक पारंपारिक पुराणकथा नोंदवलेल्या आहेत. दान लेखांतून पुण्याचे आमिष निर्माण करणारे आशीर्वादश्लोक तर पापांचे भय निर्माण करणारी शापवचनेही कोरलेली असतात.

यावरून आपल्या हे लक्षात येते की सामाजिक स्थित्यंतरे होत असताना लोकजीवनाचा त्या संस्कृतीवर पडलेला प्रभाव हा अश्या साधनांच्या रूपाने अभ्यासता येतो.

भारतीय लोकसाहित्याची ही समृद्ध परंपरा प्राचीन काळापासून प्रवाहित होत आलेली आहे. प्राचीन वैदिक वाङ्‌मयात लोकसाहित्याची मूळं बघायला मिळतात. रामायण, महाभारत, पुराणे यांतील कथांचे प्रादेशिक, स्थानिक वैशिष्ट्यांसह रुपभेदात्मक आविष्कार सर्वच भाषांत आणि बौद्ध, जैन धर्मातील लोकसाहित्यातही आढळतात. भारतीय विद्येच्या अभ्यासात संस्कृतीचा अभ्यास करताना त्या समूहाचा इतिहास, त्यांच्या भूप्रदेशाचा अंदाज, समाजशास्त्र, मानवशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र, दैवतकथाशास्त्र सोबत लोकसाहित्याचा आणि त्या अनुषंगाने त्या लोकसंस्कृती अश्या सर्व शास्त्रांचा एकत्रित अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे.    

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

One thought on “लोकसाहित्य आणि भारतीय विद्या

  1. रा.चिं.ढेरेंचं मत पूर्ण पटतं. केवळ कोरीव लेखच नाही तर नित्यकर्मांमध्येही काही नियम घालून दिलेले असतात, त्यामागचं कारण आपल्याला उमगत नाही पण तसा नियम करण्यामागे काही ना काही तत्व लागू असतं हे नक्की.

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.